अथांगातील तांडव

अथांगातील तांडव
बरोबर ७० वर्षांपूर्वी ऑर्सन वेल्स या विख्यात हॉलीवूड दिग्दर्शक व अभिनेत्याने अमेरिकन रेडिओवरून एका कादंबरीचे वाचन केले होते. ऑर्सनचा आवाज, त्या आवाजाचे शब्दवेधी कंप आणि त्याची नाटय़मयता हे सर्व इतके विलक्षण होते, की त्या कादंबरीचा काही भाग वाचून होताच, सबंध अमेरिकेत एकच घबराट पसरली. लोक भयभीत स्थितीत रस्त्यावर येऊन सैरावैरा पळू लागले. ज्या कथेच्या वाचनाने ही सार्वत्रिक घबराट पसरविली होती तिचे नाव होते- ‘द वॉर ऑफ द वर्ल्डस्!’ एच. जी. वेल्स या जगप्रसिद्ध भविष्यवेधी लेखकाची ती कादंबरी. मंगळावर वस्ती करणाऱ्या ‘माणसांनी’ अवकाशयानातून पृथ्वीवर आक्रमण केले आहे आणि त्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे, अशा अर्थाचा कथाभाग ऑर्सन वेल्स यांनी आपल्या भेदक आणि वास्तव शैलीत वाचून दाखवला होता. तो आवाज इतका प्रत्यक्षदर्शी होता, की रेडिओवरून ते ऐकणाऱ्या सर्वाना वाटले, की ते साक्षात त्या आक्रमणाचेच वर्णन आहे. त्या काळात टेलिव्हिजन नव्हता. वृत्तपत्रे आणि रेडिओ हीच प्रसारमाध्यमे. रेडिओचा विस्तारही तसा नवाच. लोकांना वाटले की ते आक्रमणाचे थेट प्रक्षेपण ऐकत आहेत आणि त्यामुळे घबराट पसरली.
एकूण वातावरणातही काहीशी भयाकुलता असल्यामुळे आणि युद्धाच्या शक्यतेची जागतिक स्थिती असल्यामुळे लोकांची मने कातर झाली होती। दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभाच्या अगोदर काही महिने ही कादंबरी रेडिओवरून वाचली गेली होती. युरोपात हिटलरचा उदय झाला होता. त्याच्या वल्गना जग पादाक्रांत करायच्या होत्या. अतिशय बलाढय़ असे सेनादल त्याने उभे केले होते. प्रखर आणि हिंस्र जर्मन राष्ट्रवादी महत्त्वाकांक्षेमुळे जग महायुद्धाच्या वणव्यात लोटले जाईल की काय, अशी भीती व चर्चा सर्वत्र होती. अशा त्या कातरवेळी ऑर्सनचा आवाज रेडिओवरून काळीज कापत-कापत घराघरांत घुसला होता. तसे पाहिले तर ती कादंबरी १८९८ सालची होती. म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस. आणि रेडिओवरचे कादंबरीवाचन झाले १९३८-३९ साली. दुसरे महायुद्ध सुरू झाले ते त्यानंतर काही महिन्यांनी; परंतु १८९८ ची कादंबरी १९३८ साली जिवंत वाटावी (आजही ती कादंबरी क्लासिक्स्च्या बेस्टसेलर्समधील एक आहे.) यावरून लेखकाचे द्रष्टेपण आणि शैलीचा प्रभाव याचा प्रत्यय येऊ शकेल. एच. जी. वेल्स यांची ‘द टाइम मशीन’ ही कादंबरी तर त्याही अगोदरची (१८९५). त्या कादंबरीवर पुढे हॉलीवूडने चित्रपट प्रदर्शित केलेच, पण गेल्या १५-२० वर्षांत स्टिव्हन स्पिलबर्गने दिग्दर्शित केलेल्या ‘बॅक टू फ्युचर’ या तीन चित्रपट मालिकांचा मुख्य आशयही ‘द टाइम मशीन’च्या कथानकावरच आधारलेला होता. वेल्सला इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळ यातील भन्नाट संगतीने झपाटलेले होते. म्हणूनच ‘आऊटलाइन ऑफ हिस्टरी’ या पुस्तकात इतिहााचा वेध घेणाऱ्या या लेखकाने ‘द शेप ऑफ थिंग्ज् टू कम’ हे पुस्तकही लिहिले होते. वेल्स जेव्हा हे लेखन करीत होता तेव्हा ‘फ्युचरॉलॉजी’ ही ज्ञानशाखा म्हणून रूढ झालेली नव्हती. वेल्सच्याही अगोदर बरीच वर्षे ज्युल्स व्हर्न या फ्रेंच लेखकाने ‘जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ’ आणि ‘अराउण्ड द वर्ल्ड इन ट्वेण्टी डेज’ अशा कादंबऱ्या लिहिल्या होत्या. विमानाचा शोध लागण्याच्या अगोदर ३० वर्षे व्हर्नच्या साहसी पात्रांनी जगाला ८० दिवसांत प्रदक्षिणा घालण्याचा विडा उचलून तो पारही पाडला होता. आता तसा जगप्रवास करायला ८० तासही लागत नाहीत आणि अवकाशयानाने तर ती यात्रा पुरी करायला आठ तासही खूप झाले. या व अशा अनेक लेखकांना ‘त्रिकाल वेधी’ द्रष्टेपणाने झपाटले होते. अगदी अलीकडे मरण पावलेले ऑर्थर सी क्लार्क हेसुद्धा त्याच ‘त्रिकाल वेधी’ परंपरेतले. ऑर्थर सी. क्लार्क यांची ख्याती शब्दश: ‘दिगंतात’ पसरली ती त्यांच्या 2001-Space Odyssy या चित्रपटामुळे. त्यांनाही अंतराळ प्रवास, विश्वशोध, इतर ग्रहांवरील जीवसृष्टीचा वा अधिक प्रगत व प्रगल्भ माणसाचा शोध या गोष्टींनी झपाटलेले होते. कार्ल सगान या खगोलशास्त्र व विज्ञानलेखकाचाही तोच ध्यास होता. अथांग अंतराळात तसा शोध घेण्यासाठी सोडलेल्या ‘व्हॉयेजर’ या यानाचे ते एक प्रवर्तक होते. याच ‘व्हॉयेजर’मधून पृथ्वी ग्रहाची माहिती, येथील संस्कृती, माणसाची विज्ञानगाथा एका ध्वनिफितीद्वारे अंतराळात पाठविली गेली आहे. कधीतरी, कुठेतरी, त्या अनादि अनंत विश्वात कुणाला तरी ती मिळेल अशी सगान यांना आशा होती. तो व्हॉयेजर प्रकल्प आणि त्याबरोबर पाठविलेले पृथ्वीचे गीत-संगीत ‘ े४१े४१२ ऋ ३ँी एं१३ँ’ या नावाने प्रसिद्ध झालेल्य ग्रंथात संकलित केले गेले आहेत. आपल्याकडेही डॉ. जयंत नारळीकर , चिंतामणी देशमुख व लक्ष्मण लोंढे, अरुण साधू, डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे आदींनी यासंबंधात संकल्पनाविलास करणारे उत्कृष्ट विज्ञानलेखन केले.या अंतरिक्ष भ्रमणातून आणि आकाश-अवकाश निरीक्षणातून माणसाला एका अनामिक संकटाची शक्यता आणि भीतीही वाटते. उल्का पडताना पाहिलेल्या माणसाला फार पूर्वीपासून असे वाटत आले आहे की, कुठचा तरी धूमकेतू, गुरुत्त्वाकर्षणाच्या कक्षेतून बाहेर सटकलेला आणि भरकटलेला लहानमोठा ग्रह-उपग्रह अनपेक्षितपणे पृथ्वीवर येऊन आदळेल आणि सर्वत्र एकच हाहाकार माजेल॥ नाहीतरी आपली सूर्यमालिका अशी तुकडे तुकडे होऊन नाही का विस्तारत गेली? मग एखादा धूमकेतू पृथ्वीवर आदळून आपल्या ग्रहाची शकले झाली तर? अमेरिका, रशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, भारत, चीन या सर्व देशांनी त्यांच्या दुर्बिणी, उपग्रहातून सोडलेले रेडिओ-टेलिस्कोप आणि विविध प्रकारच्या उपकरणांद्वारे टिपलेल्या ध्वनीलहरी व प्रकाशलहरी यांच्या मदतीने अशा वांड व ‘दिशाहीन’ धूमकेतूचा शोध चालू ठेवला आहे. आकस्मिकपणे पृथ्वीवर आदळून अशा धुमकेतूने अपघात घडवून आणला तर माणसाने निर्माण केलेली सिव्हिलीझेशन/ सायन्सची प्रतिसृष्टी नष्ट होईलच, पण एकूण जीवसृष्टीच (बहुतांश तरी) लयाला जाईल. म्हणून अशा भरकटणाऱ्या धूमकेतूंचा कसोशीने वेध घेतला जात असतो.माणसाप्रमाणेच पृथ्वीला, आपल्या सूर्यमालिकेला, या विश्वालाही नैसर्गिक वा असा अपघाती मृत्यू येऊ शकतो ही भीती फार पूर्वीपासून असली तरी त्या भीतीचे वैज्ञानिक शक्यतेत रूपांतर झाले ते गेल्या शे-दीडशे वर्षांत. पृथ्वीवर अनेक ठिकाणी महाविवरे आहेत, प्रचंड मोठे तलाव आहेत, बऱ्याच प्रकारच्या ‘कॉस्मिक’ खुणाआहेत, ज्या हे दर्शवितात की असे आघात-अपघात पूर्वी झाले आहेत. त्यातून कित्येक संस्कृती जन्माला येऊन नष्ट झाल्या असाव्यात, उत्क्रांती प्रक्रियेला छेद देणारे (?) जीव निर्माण होऊन कायमचे नष्ट झाले असावेत असे तर्कवितर्क यासंबंधात केले गेले आहेत. एका थिअरीप्रमाणे डायनोसॉरस पर्व असेच नष्ट झाले असावे. काहींच्या मते ‘डायनोसॉरस पर्व’ सुमारे लाख-सव्वा लाख वर्षे हळूहळू लयाला जात होते, तर इतर काहींच्या मते ते अशा अपघातामुळे एका फटक्यात नष्ट झाले. (‘जुरासिक पार्क’ या चित्रपटात डायनोसॉरसच्या डीएनएद्वारे त्यांना पुन्हा निर्माण करता येऊ शकते हा संकल्पना-सिद्धांत मांडला आहे. ती सर्वस्वी फँटसी नाही.) म्हणूनच काही ‘कॅटॅस्ट्रोफीवादी’ ऊर्फ विनाशवादी वैज्ञानिक असे मानतात की ही जीवसृष्टी (माणसासहित) नष्ट झाली तर आश्चर्य वाटायला नको (आणि दु:खही करायला नको- अर्थात तसा विनाश झाला तर दु:ख करायला कुणी उरलेलेच नसेल हा भाग वेगळा!)परंतु माणसाची प्रज्ञा ही या सर्व विचारांच्या केंद्रस्थानी आहे. किंबहुना हे विश्व आहे, तेच आपल्याला त्याची जाणीव आहे म्हणून आहे. प्रज्ञावान माणूसच नसेल तर विश्व असले काय, नसले काय वा कसेही असले यात काय फरक पडतो? या विश्वातील तारे, ग्रह, उपग्रह, कृष्णविवरे, तारकासमूह जर ‘निर्जीव’पणे आणि प्रज्ञाहीन अवस्थेत फिरत राहिले, विस्तारत राहिले, फुटत राहिले तर राहीनात का? म्हणूनच आपण आहोत त्यामुळे या विश्वाला अर्थ आहे आणि विश्वाचा अर्थ-अन्वयार्थ लावणे ही आपली ‘नैतिक’ जबाबदारी आहे. म्हणजेच माणूस व त्याची संस्कृती-प्रगल्भता, अर्थात ज्ञान-विज्ञान-प्रज्ञान टिकविणे हे आपले प्रथम कर्तव्य असायला हवे. समाजजीवनात न्याय, समता, स्वातंत्र्य असावे या विचारांनासुद्धा अर्थ प्राप्त होतो तो त्याच दृष्टिकोनातून. कारण माणसाच्या प्रज्ञेत विश्वज्ञानाचे सर्जनशील सामथ्र्य आहे. तसेच सार्वत्रिक विनाश घडवून आणण्याचे विध्वंसक सामथ्र्यही आहे. आपल्याला ठरवायचे आहे, प्रज्ञेला ‘दिशा’ कोणती द्यायची?रशियन व अमेरिकन वैज्ञानिकांनी काही वर्षांपूर्वी एक प्रकल्प संयुक्तपणे हाती घेतला आहे. त्या प्रकल्पाचे उद्दिष्ट मुख्यत: ही पृथ्वी धूमकेतूसदृश आघात-अपघातांपासून वाचविणे हा आहे. त्या पाठीमागे आहे त्यांचादुर्दम्य आत्मविश्वास आणि विज्ञानाची झेप. त्यातूनच लक्षात आले की, २१ ऑगस्ट २१२६ रोजी (आजपासून ११७ वर्षांनी- म्हणजे निदान आपल्याला चिंता नाही!) ‘स्विफ्ट टट्ल’ नावाचा एक धूमकेतू पृथ्वीवर येऊन आदळणार आहे. तासाला सुमारे ६० हजार मैल किंवा सेकंदाला १० मैल या वेगाने येणारा हा धूमकेतू म्हणजे तीन हजार अब्ज किलो वजनाचा बर्फाळ खडक आहे आणि ध्वनीच्या वेगापेक्षा ७० पटींनी अधिक वेगवान गतीने तो पृथ्वीवर येऊन आदळणार आहे. तो पृथ्वीच्या जवळ आला की लगेचच कदाचित वादळी वारे, सामुद्री लाटा, अंधारलेपण असे होऊ शकेल. निमिषार्धात १० हजार भूकंप अवघ्या पृथ्वीवर व्हावेत इतका महाजबरदस्त असा तो धक्का असेल. उंच इमारती तर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतील आणि भले मोठे पर्वतही भुईसपाट होतील. समुद्रात तर इतक्या मोठय़ा लाटा उसळतील की जणू ते पाण्याचे महापर्वत वाटावेत.. हिमालयाएवढे वा त्याहूनही उंच असे जलपर्वत. काही ठिकाणी जमीन मुळापासून उखडली जाईल आणि सुप्त ज्वालामुखी जागृत होतील. खडक वितळू लागतील. ज्या ठिकाणी धूमकेतू आपटेल त्या ठिकाणी प्रचंड मोठे विवर निर्माण होईल, इतके खोल की ज्यूल्स व्हर्नच्या ‘जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ’ची आठवण व्हावी. (पण तशी आठवण काढायला कुणीच असणार नाही आणि असा एक धूमकेतू पृथ्वीवर येऊन आदळला ही बातमी छापणे वा दूरचित्रवाणीच्या कोणत्याही वाहिनीवर ‘लाइव्ह’ दाखवायचा प्रश्नच येणार नाही. धूमकेतूने माजवलेल्या महा-हाहाकाराची ‘एक्सक्लूसिव’ दृश्ये आपल्याकडे आहेत असे कोणताही चॅनल म्हणू शकणार नाही!) एकूणच सर्वत्र इतकी प्रचंड उष्णता निर्माण होईल की जंगले पेटतील, वणव्यांनी वेढलेल्या भागात सूर्याला आव्हान देणारी उष्णता व प्रकाश मानता येईल. सर्व जीवसृष्टी- झाडे, प्राणी, पक्षी, मासे- काही सेकंदात नष्ट होतील. या हाहाकारातून पुन्हा पृथ्वी ‘नॉर्मल’ व्हायला हजारो वर्षे लागतील. त्यानंतर पुन्हा जीवसृष्टी निर्माण होईल की ती पृथ्वीची अखेर असेल? हा प्रश्न १५-२० वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांमध्ये चर्चेला होता. परंतु जर धूमकेतू येणारच असेल तर आपल्याला अंतराळयानातून काही क्षेपणास्त्रे सोडून त्याची दिशा बदलता येईल का? तो धूमकेतूच क्षेपणास्त्रांनी उडवून टाकून तो पृथ्वीवर आदळायच्या आत त्याचे तुकडे तुकडे करता येतील का? एखादे अण्वस्त्र-क्षेपणास्त्र त्या धुमकेतूवर सोडून तो अंतराळातच नष्ट करता येईल का? अशा चर्चा सुरू झाल्या. काही वैज्ञानिक म्हणू लागले की, तेवढी आणीबाणी येणारही नाही कदाचित. कारण पृथ्वीच्या अगदी जवळ येऊन तो निघून जाईल. त्याची कक्षा बदलल्याचे दिसत आहे! परंतु हा धूमकेतू पृथ्वीवर आदळला नाही तरी किमान १० हजार धूमकेतूसदृश उल्का आपल्या सूर्यमालिकेच्या परिसरात भटकत आहेत. म्हणजे मुद्दा आपला धर्म, देश, भाषा यांचे संरक्षण करण्याचा नाही तर पृथ्वीचेच र्सवकष रक्षण करण्याचा आहे. ते अशक्य नाही. कारण माणसाला विश्व-व्यवहारातच हस्तक्षेप करण्याचे सामथ्र्य प्रज्ञा-विज्ञानाने दिले आहे. गरज आहे ती वैश्विक विचाराची आणि विवेकाची!

कुमार केतकर

No comments:

Post a Comment