एका भुगोलाचा इतिहास (लोकरंग)


१९७०-७१ मध्ये भारतीय उपखंडाचा भूगोल बदलायला सुरुवात झाली. त्याचबरोबर आपले राजकीय आणि सामाजिक जीवनही बदलू लागले. गेल्या ४० वर्षांपूर्वीच्या तत्कालिन घटनाक्रमांचा संदर्भ देण्याचे कारण आजच्या दक्षिण आशियातील भू-राजकीय, तसेच अन्यही राजकारणाचे धागे त्या एका वर्षांतील घटनाक्रमांत आढळून येतात. त्यावेळी अमेरिका आणि चीनने जे धोरण अवलंबिले होते, तेच आजही त्यांनी सुरू ठेवले आहे. आणि हे असेच चालू राहिले तर दहशतवादाचा भस्मासुर त्याला उदार आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचेही विघटन केल्याशिवाय राहणार नाही.
बरोबर ४० वर्षांपूर्वी भारतीय उपखंडाचा भूगोल बदलायला सुरुवात झाली. त्याचबरोबर आपले राजकीय आणि सामाजिक जीवनही बदलू लागले. दैनंदिन धबडग्यात आपल्या लक्षातही येत नाही की, आपल्या भूगोलाला इतिहास असतो.. आणि आपल्या जीवनातील सर्व अदृश्य धागे त्या इतिहासाशी निगडित असतात. तसे पाहिले तर फक्त ४० वर्षेच नव्हेत, त्यापूर्वीच्या इतिहासाचेही संस्कार दाखवून देता येतील. पण ४० वर्षांंच्या घटनाक्रमांचा संदर्भ देण्याचे कारण आजच्या बहुतेक राजकारणाचे धागे डिसेंबर १९७० ते डिसेंबर १९७१ या एक वर्षांच्या घटनाक्रमांत आढळतात. भारत-पाकिस्तान संबंधांतील ताणतणाव असोत वा काश्मीरचा तिढा, अफगाणिस्तानमधील स्फोटक परिस्थिती असो वा अमेरिकेचा दक्षिण आशियातील वाढता हस्तक्षेप, दहशतवादाची वैश्विक छाया असो वा इराणने अमेरिकेला दिलेले आव्हान, चीनचे नवे महासत्तारूप असो वा अमेरिकेतील आर्थिक अरिष्ट- अशा आजच्या सर्व घटनांचे धागे १९७०-७१ मध्ये- म्हणजे ४० वर्षांंपूर्वीच्या परिस्थितीत आढळतात. सोविएत युनियन आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धाने वेढलेल्या त्या काळाचा वेध घेतल्याशिवाय एकविसाव्या शतकातील पहिले दशक कसे संपले, हे कळणार नाही; आणि येत्या दशकाचा- किंवा पुढील ९० वर्षांंचा भविष्यवेधही घेता येणार नाही. अमेरिकेचे १९७०-७१ काळातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉ. हेन्री किसिंजर यांच्या हस्तक्षेपाने सुरुवात झालेल्या त्या संहारक राजकारणाची सांगता रिचर्ड हॉलब्रुकच्या निधनाने यावर्षीच्या डिसेंबरमध्येच व्हावी, हा तसा दुर्दैवी योगायोगच म्हणावा लागेल. अर्थातच ही ‘सांगता’ हा मध्यांतर आहे; आणि तीच आता नव्याने सुरू होणाऱ्या नाटकाची नांदीही आहे.
भारतीय उपखंडातील या ‘भौगोलिक इतिहासाची’ किंवा भू-राजकीय घटनांची शृंखला डिसेंबर १९७० मध्ये पाकिस्तानात झालेल्या निवडणुकांनी सुरू झाली. पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर सर्व प्रौढांना मतदार होण्याचा हक्क प्राप्त झाला नव्हता. तो प्रथमच या निवडणुकीत त्यांना मिळाला. (भारतात १९५२, १९५७, १९६२ आणि १९६७) अशा चार सार्वत्रिक निवडणुका आणि सर्व राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊन संसदीय लोकशाहीची मुळे पक्की रुजलेली होती.) ज्या डिसेंबर महिन्यात पाकिस्तानात निवडणुका झाल्या, त्याच महिन्यात भारतात पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशातील पहिल्या मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली; जी निवडणूक मार्च १९७१ मध्ये झाली. या निवडणुकीत ‘गरिबी हटाओ’च्या घोषणेच्या आधारे इंदिरा गांधींनी त्यांच्याविरुद्धच्या बडय़ा आघाडीचा पूर्ण धुव्वा उडवून काँग्रेसला लोकसभेत प्रचंड बहुमत मिळवून दिले. पाकिस्तानच्या पाठोपाठ तीनच महिन्यांनी भारतात झालेल्या या निवडणुकीचाही या भूगोलाच्या इतिहासावर मूलगामी परिणाम झाला आहे.
डिसेंबर १९७० मधली पाकिस्तानची निवडणूक ही १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पाच वर्षांंनी झाली होती. निवडणुकीची घोषणा त्यावेळचे लष्करशहा जनरल याह्याखान यांनी केली होती. याह्याखान यांच्याकडे सूत्रे आली होती ती जनरल अयुबखान यांच्याकडून. निवडणुकांची घोषणा करणे लष्करशाहीला भाग पडले होते, कारण लोकांमध्ये असंतोष वाढत होता. शेजारी भारतात लोकशाही रुजत असलेली पाहून पाकिस्तानमधील जनतेत, विशेषत: मध्यमवर्गात लोकशाहीची मागणी आग्रहीपणाने होत होती. पाकिस्तानमध्ये मुख्य दोनच पक्ष होते. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सर्वेसर्वा होते- झुल्फिकार अली भुत्तो आणि पूर्व पाकिस्तानात जोर होता- शेख मुजीबुर रहमान यांच्या नॅशनल आवामी लीगचा. भुत्तोंची निवडणुकीतील घोषणा होती- रोटी, कपडा, मकान! पूर्व पाकिस्तानात (म्हणजे बंगाली पाकिस्तानात) असंतोष होता, तो बंगाली भाषा, संस्कृती आणि लोक यांची उपेक्षा होत असल्याच्या विरोधात. पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून तिथल्या सत्ताधारी वर्गात प्राबल्य होते ते पंजाबी व पठाणी समाजांचे. सेनादले, नोकरशाही, पोलीस यंत्रणा, विद्यापीठे, वित्तसंस्था हे सर्व पंजाबी जमीनदारांनी अक्षरश: काबीज केले होते. पूर्व म्हणजे बंगाली पाकिस्तानला या सत्ताधारी वर्गात प्रवेश नव्हता; प्रतिष्ठा दूरच राहो.
साहजिकच मुजीबुर रहमान यांच्या आवामी लीगची मागणी होती की, त्यांना सत्तेत अधिक स्थान पाहिजे आणि बंगाली भागाला स्वायत्तता. निवडणुकीनंतर जी राज्यघटना तयार केली जाईल, तिच्यात पूर्व (बंगाली) पाकिस्तानला स्वायत्तता मिळावी, यासाठी तेथे संघर्ष चालू होता. पंजाबी- पठाणी सरंजामदार, जमीनदार, धनदांडगे एका बाजूला आणि तुलनेने गरीब असलेली बंगाली जनता दुसऱ्या बाजूला- अशी त्या निवडणुकीतली लोकस्थिती होती. धर्माच्या आधारावर निर्माण झालेल्या पाकिस्तानला इस्लामच्या नावाने ही दरी बुजवता आली नव्हती. वरवर भाषिक- सांस्कृतिक असलेल्या या संघर्षांला अशी कठोर वर्गीय बाजूही होती.
निवडणुकीचे निकालही त्यानुसारच लागले. बंगाल्यांच्या आवामी लीगला पूर्व पाकिस्तानात १६९ पैकी १६७ जागा मिळाल्या. भुत्तोंच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला पश्चिम पाकिस्तानात १४४ पैकी ८८ जागा मिळाल्या होत्या. साध्या बहुमताच्या तत्त्वावर मुजीबुर रहमान हेच पंतप्रधान व्हायला हवे होते, परंतु आवामी लीगचा हा बंगाली झंझावात पाहून पाकिस्तानची पंजाबी लष्करशाही-जमीनदारशाही हादरली. जर मुजीबुर रहमान पंतप्रधान झाले किंवा इतक्या जागांच्या जोरावर जर पूर्व (बंगाली) पाकिस्तानला स्वायत्तता द्यायचा प्रसंग आला तर इस्लामी पाकिस्तानची एकात्मताच संपेल, अशी धडकी लष्करशाहीला भरली. बंगाल्यांचे हे ‘बंड’ वेळीच मोडून काढले नाही तर आपल्या हातातून सत्ता जाईल, या भीतीने जनरल याह्याखान यांनी लष्कराला पूर्व पाकिस्तानात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
याह्याखान यांच्या त्या लष्करी कारवाईने भारतीय उपखंडाच्या भूगोलावर दुसरा आघात केला. पहिल्या आघाताने भारत आणि पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले होते. दुसऱ्या आघाताने पाकिस्तानची फाळणी होणे अपरिहार्य झाले.
ज्या दिवशी भारतात इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने निवडून आल्या, त्याच दिवशी- २६ मार्च १९७१ रोजी जनरल याह्याखानांच्या लष्कराने बंगाल्यांचा नरसंहार सुरू केला. मुजीबुर रहमान यांना पाकिस्तानी लष्कराने अटक केली आणि नि:शस्त्र बंगाली जनतेची सरसकट कत्तल सुरू केली. त्या बंगाली जनतेत अर्थातच बहुसंख्येने मुस्लिम असले, तरी लाखो हिंदूही होते. दोन्ही समाज अतिशय गरीब, उपेक्षित आणि भूगोलानेही हलाखीत ठेवलेले. पूर्व पाकिस्तानच्या सपाट प्रदेशात नद्यांची पात्रेही सतत बदलत आणि जवळजवळ दर चार-दोन वर्षांंनी होणाऱ्या महापुरात हजारो माणसे बळी पडत. परंतु लष्करी कारवाईनंतर देशोधडीला लागलेले बंगाली आश्रयासाठी भारतात येऊ लागले. आसाम, प. बंगाल, त्रिपुरा, मेघालय.. आणि नंतर मुंबई व देशाच्या इतर भागातही! दुसऱ्या महायुद्धानंतर इतक्या मोठय़ा प्रमाणावर लोकांचे स्थलांतर झाले नव्हते. सुमारे एक कोटी लोक त्या वर्षभरात भारतात आले. पाकिस्तानी सेनादलातील बंगाली अधिकारी व सैनिक यांनीही सशस्त्र बंड पुकारल्यानंतर, आणि विशेषत: ‘स्वतंत्र बांगलादेश सरकार’च्या घोषणेनंतर युद्ध संपायच्या अगोदरच नव्या भूगोलाची नेपथ्यरचना तयार झाली. इंदिरा गांधींनी अमेरिकेसहित सर्व पाश्चिमात्य देशांना आवाहन केले होते की, बंगाल्यांचा हिटलरी, पाशवी पद्धतीने नरसंहार चालू असूनही तथाकथित लोकशाहीवादी देश जनरल याह्याखानांच्या बाजूनेच उभे आहेत.
अमेरिकेत तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते रिचर्ड निक्सन आणि त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते- वर संदर्भ दिलेले डॉ. हेन्री किसिंजर. निक्सन- किसिंजरप्रणीत व्हाइट हाऊसने जनरल याह्याखान यांना अभय दिले होते. पाकिस्तानला अमेरिकेने दिलेली शस्त्रास्त्रे, विमाने वा अन्य लष्करी मदत भारताच्या विरोधातच वापरली जाते, हा अनुभव असूनही तेव्हा (आजच्याप्रमाणेच!) तेथील लष्करशाहीलाच बळकट केले जात होते. अमेरिका व ब्रिटन यांच्या दृष्टिकोनातून प्रश्न लोकशाहीचा नव्हता वा मानवतेचाही नव्हता; तर शीतयुद्धातील महासत्तास्पर्धेचा होता.
जागतिक स्तरावर सोविएत युनियन ठामपणे भारताच्या बाजूने भूमिका घेत असे. वेळप्रसंगी व्हेटोही वापरत असे. काश्मीरसंबंधातील युनोमधील सर्व चर्चामध्ये सोविएत युनियनचा भारताला पाठिंबा असण्याचे मुख्य कारण हेच होते की, स्वातंत्र्यानंतर भारताने कायम साम्राज्यवादविरोधी भूमिका घेतली होती. जेव्हा दक्षिण आशियात हा बांगलादेश मुक्तिसंग्राम सुरू झाला, तेव्हाच व्हिएतनामही अमेरिकन आक्रमणाच्या विरोधात लढत होता. त्याच वेळेस पॅलेस्टिनचा स्वातंत्र्यसंग्राम उग्र झाला होता. इजिप्तच्या नासेर यांनी इस्राएली आक्रमकतेच्या विरोधात अरब देशांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. तिकडे दक्षिण अमेरिकेत जवळजवळ सर्वच देशांत क्यूबाच्या फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा यांच्या प्रेरणेने अमेरिकन साम्राज्यवादाच्या विरोधात संघर्ष सुरू होते. आफ्रिका खंडातही पाश्चिमात्य देशांच्या वसाहतवादाविरोधात स्वातंत्र्यलढे सुरू होते. या सर्व लढय़ांना भारताचा पाठिंबा होता आणि सोविएत युनियनचाही. म्हणूनच अमेरिकेने भारतविरोधी भूमिका घेऊन सोविएत प्रभावाला शह द्यायचे ठरवले होते.
अमेरिकेने तेव्हा (वा आजही) पाकिस्तानला दिलेली सर्व आर्थिक व लष्करी मदत ही त्या शीतयुद्धाच्या कॅनव्हासवरची आहे. सोविएत युनियनचे विघटन होऊन शीतयुद्ध संपले तरी अजूनही अमेरिकेची मानसिकता तीच आहे. १९७०-७१ साली शीतयुद्ध शिगेला पोहोचले होते आणि निक्सन-किसिंजर कंपनीला जागतिक स्तरावर सोविएत युनियनला आणि दक्षिण आशियात भारताला नामोहरम करायचे होते. म्हणूनच बंगाल्यांचे शिरकाण होत असूनही अमेरिकेने पाकिस्तानच्या बाजूनेच उभे राहायचे ठरविले. चीननेही १९६२ च्या युद्धानंतर भारतविरोधी पवित्रा घेतला असल्याने त्यांचाही पाकिस्तानला पाठिंबा होता.
हेन्री किसिंजर यांनी तेव्हा केलेली मुत्सद्दी चाल आजच्या जागतिक सत्ताकारणातही आपला प्रभाव टाकते.
कम्युनिस्ट चीन हा रशियाप्रमाणेच कट्टर शत्रू असूनही, रशिया व चीन यांचे बिनसल्यापासून अमेरिकेने चीनवर नजर ठेवली होती. रशिया व चीन यांचे १९६९ साली सीमेवर युद्ध झाले, त्याच वर्षी निक्सन-किसिंजर अमेरिकेत सत्तेवर आले. परंतु तेव्हा व्हिएतनाम युद्धात अमेरिकेची पीछेहाट होत होती आणि जगभरचे वातावरण अमेरिकाविरोधाचे होते. म्हणजेच शीतयुद्धातही पीछेहाट होत असलेली अमेरिका कोंडीत सापडली होती.
किसिंजर यांनी पाकिस्तानातील बंगाली बंडाळीचा फायदा घेऊन ती कोंडी फोडण्याचे ठरविले. बांगलादेशचा स्वातंत्र्यलढा तीव्र झालेला असतानाच किसिंजर यांनी पाकिस्तानला भेट दिली आणि त्यांना पूर्ण पाठिंबा व मदत जाहीर करून तेथून गुप्तपणे चीनला प्रयाण केले. किसिंजर यांच्या या चीनभेटीने एका फटक्यात जगाचा सत्तासमतोल बदलला. तोपर्यंत रशिया, चीन आणि तिसरे जग विरुद्ध अमेरिका असे जगाच्या सत्तेचे विभाजन होते. ते एकदम अमेरिका-चीन एकत्र आल्याचा भास निर्माण झाल्यामुळे पालटले. रशियाही बचावात्मक पवित्र्यात गेला आणि पाकिस्तानने बंगाल्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचे ठरविले.
जगातील सत्तेचे ‘शतरंज के मोहरे’ असे सिद्ध असतानाच इंदिरा गांधींनी त्यांची मुत्सद्दी चढाई केली. चीन व अमेरिकेच्या मदतीमुळे आता आपल्याला भारत हात लावू शकणार नाही, अशा भ्रमात असलेल्या पाकिस्तानने ३ डिसेंबर १९७१ रोजी थेट भारताच्या विरोधात युद्ध पुकारले. इंदिरा गांधींनी डिसेंबर १९७० पासूनच- म्हणजे एक वर्षभर अगोदर या शक्यतेचा विचार केला होता. परंतु १९७१ च्या मार्चमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर इंदिरा गांधींनी त्यांच्या विचारांना मूर्तरूप दिले. त्यानुसार बंगाली मुक्तीवाहिनीला सर्व प्रकारचे सहाय्य दिले जाऊ लागले आणि पाकिस्तानने भारताविरोधात युद्ध पुकारताच भारतीय सैन्य सर्व बाजूंनी पाकिस्तानात घुसले.
डिसेंबर १९७१ च्या ३ तारखेला सुरू झालेले युद्ध अवघ्या १३ दिवसांत संपून १६ डिसेंबर रोजी बांगलादेश स्वतंत्र झाला. पाकिस्तानची फाळणी झाली. सेक्युलर भारताची फाळणी घडवून आणण्याचे धर्मवाद्यांचे व अमेरिकेचे प्रयत्न फसले. पाकिस्तान हा अमेरिकेचा लष्करी व राजकीय तळ होता. तो विस्कटून गेल्यामुळे अमेरिकेने भारताला ‘धडा’ शिकवायचे ठरविले. पाकिस्तानचा संपूर्ण पराभव होऊन जनरल नियाझींना अध्यक्ष याह्याखान यांच्या आदेशानुसार भारतापुढे शरणागती पत्करावी लागली होती. त्यामुळे पाकिस्तानी लष्करात कमालीचा असंतोष पसरला होता. त्यातूनच पाकिस्तानी सेनेतील सुडाची भावना कशी भडकत गेली, याचे उत्तम प्रतीक म्हणजे जनरल मुशर्रफ! बांगलादेश स्वातंत्र्याच्या वेळी भारत-पाकिस्तान युद्धात मुशर्रफ हे पाकिस्तानचे कंपनी कमांडर होते. त्यांचे वय तेव्हा फक्त २८ होते. पाकिस्तानला भारतापुढे शरणागती पत्करावी लागली, यामुळे मुशर्रफ कमालीचे दुखावले गेले होते आणि तेव्हाच त्यांनी एक प्रकारे ‘विडा’ उचलला- भारताला नामोहरम करण्याचा. ही भावना फक्त त्यांचीच नव्हे, तर पाकिस्तानी सैन्यात गेलेल्या त्यावेळच्या सर्व तरुणांची होती.
अलीकडेच जनरल मुशर्रफ यांनी जाहीरपणे सांगितले की, त्यांनी काश्मिरी बंडखोरांना व दहशतवाद्यांना मदत करण्याचे धोरण जाणीवपूर्वक राबविले होते. मुशर्रफ यांच्या सूडभावनेशी आणि त्या अनुषंगाने त्या धोरणाशी बहुसंख्य पाकिस्तानी सेनाधिकारी सहमत आहेत. म्हणजेच भारताविरुद्धचे दहशतवादी हल्ले थांबणे अशक्य आहे. मुशर्रफ यांच्या त्या जाहीर वक्तव्यानंतरही अमेरिका पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवीत आहे. विशेष म्हणजे दहशतवादाविरोधात पाकिस्तानचे हात बळकट करण्याचे धोरणच रिचर्ड हॉलब्रुक अमलात आणत होते. किसिंजर यांनी १९७१ साली सुरू केलेले हे धोरणच ओबामांच्या प्रशासनालाही घ्यावे लागले आहे. थोडक्यात- याचा अर्थ हा की, १९७०-७१ साली धुमसू लागलेला दक्षिण आशिया आणखी बरीच वर्षे धुमसत राहणार आहे.
बांगलादेशच्या निर्मितीमुळे दक्षिण आशियाचा भूगोल बदलला आणि इतिहासही. पण त्यातून निर्माण झालेला दहशतवादाचा भस्मासुर आता पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रांवर कब्जा करू पाहत आहे. आपल्यावर हा भस्मासुर उलटू नये म्हणून अमेरिका पाकिस्तानला दुखविणार नाही, चीनही पाकिस्तानला आटोक्यात ठेवणार नाही, आणि अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यावर पाकिस्तानातील सुडाचे प्रवासी आणि मोकाट सुटलेले तालिबानी भारतीय उपखंडाचा भूगोल पुन्हा बदलण्यासाठी विध्वंसाचा मार्ग पत्करतील. गेल्या काही वर्षांत या दहशतवादाने पाकिस्तानमध्येच हिंस्त्र हल्ले चढविले आहेत. म्हणजेच पाकिस्तानचे पहिले विघटन ज्याप्रमाणे त्यांचे लष्कर वा अमेरिका वाचवू शकले नाहीत, त्याप्रमाणेच दुसरे विघटनही वाचवू शकणार नाहीत.
परंतु या सर्व भूगोलाच्या इतिहासात सर्वाचीच कसोटी आहे. पाकिस्तानातील शांततावादी व उदारमतवादी आता हे समजून चुकले आहेत की, गेल्या ४० वर्षांत त्यांनी निर्माण केलेला भस्मासुर त्यांच्याच देशावर उलटत आहे आणि त्या भस्मासुराला भारतात पाठवूनही पाकिस्तानचे विघटन अटळ आहे. त्या अशांत पर्वाला नव्या दशकाबरोबरच सुरुवात होत आहे. संवाद आणि सामंजस्य एका बाजूला आणि बेभान सूडभावना दुसऱ्या बाजूला- अशी ही स्थिती आहे. म्हणूनच संवाद व सामंजस्याची अधिकच गरज आहे. नाहीतर..

कुमार केतकर,

रविवार १९ डिसेंबर २०१०

अस्थैर्याच्या भोवऱ्यात..


स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे सध्या केंद्रातील यूपीए आघाडी सरकार भलतेच अडचणीत आले आहे. संयुक्त संसदीय समितीकरवी या महाघोटाळ्याची चौकशी करावी, या मागणीवर विरोधी पक्ष ठाम आहेत. त्यामुळे संसदेचे कामकाज गेले काही दिवस ठप्प झाले आहे. या तिढय़ातून मार्ग निघण्याची कोणतीच चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. तशात याघडीला कॉंग्रेस पक्ष सगळ्याच बाजूंनी कोंडीत सापडलेला आहे. भरीस भर म्हणून आघाडीतील काही मित्रपक्षही विरोधकांना जाऊन मिळाल्यास देशात राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ शकते..
पुन्हा एकदा देश अस्थिरतेच्या आणि अराजकतेच्या भोवऱ्यात सापडणार की काय, अशी भीती/ शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. केंद्रातील यूपीए सरकार उर्वरित साडेतीन वर्षे निभावून नेऊ शकेल का? हा प्रश्न पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये आणि कॉर्पोरेट बोर्डरूम्समध्ये चर्चेत आला आहे. एकापाठोपाठ एक- त्याही अब्जावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस, चमत्कारिक आणि भयानक कथा रोज बाहेर येत असल्या तरी आर्थिक अरिष्ट आलेले नाही. आर्थिक वाढीचा दर कमी झालेला नाही. आणि १९९१ साली देशाचे सोने गहाण ठेवण्याची स्थिती आली होती तशी दिवाळखोरीही आलेली नाही. तरीही राजकीय अस्थैर्य घोंघावू लागले आहे. द्रमुकने कॅबिनेटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे हे केंद्र सरकारच्या स्थैर्याला आणि राजकीय व्यवस्थेलाच दिलेले आव्हान आहे. बहुतेक वेळा आर्थिक आणि राजकीय अराजक एकामागोमाग वा एकसमयावच्छेदेकरून येते. याघडीला तसे दिसत नाही. तसे पाहिले तर अजून तरी डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आलेला नाही. परंतु स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या निमित्ताने संसदेत जो महा-गदारोळ चालू आहे तो पाहता हळूहळू त्या दिशेने विरोधी पक्ष जाऊ शकतात. अर्थातच त्यासाठी सत्ताधारी यूपीए आघाडीत तीव्र तणाव निर्माण व्हावे लागतील. त्या तणावांचे पर्यवसान आघाडीला तडे पडण्यात होऊ शकते. ती सुरुवात झाली आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या सचोटीवर आणि चारित्र्यावर जरी कुणीही संशय घेतलेला नसला तरी टेलिकॉम घोटाळ्याची जबाबदारी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर आहेच. केवळ नैतिक नव्हे, तर व्यावहारिक आणि राजकीयही- असे आता उघडपणे मांडले जाऊ लागले आहे. त्याचप्रमाणे आता सोनिया गांधींच्या भोवतीही हा नैतिकतेचा आणि भ्रष्टाचाराचा घेराओ टाकला जाऊ लागला आहे. सध्या जो ‘एपिडेमिक ऑफ डिसट्रस्ट’- अविश्वासाची साथ सर्वत्र पसरली आहे, ती या अस्थैर्य व अराजकाच्या मुळाशी आहे.
या अविश्वासाच्या साथीने जेव्हा न्यायसंस्था आणि मीडिया यांनाही वेढा पडतो तेव्हा ‘सिस्टीम’ ऱ्हासग्रस्त होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अलाहाबाद उच्च न्यायालयात भ्रष्टाचार आणि अनाचार इतका वाढला आहे, की लोकांचा विश्वासच उडून जावा. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाबद्दल काढलेले हे उद्गार जर एखाद्या वृत्तपत्राने वा अन्य मीडियाने काढले असते तर त्यांच्यावर न्यायालयाच्या बदनामीचा खटला लावला गेला असता. त्याचप्रमाणे ‘नीरा राडिया टेप्स’ म्हणून जे प्रकरण सध्या गाजते आहे, त्यात बडी वृत्तपत्रे, चॅनल्स आणि नावाजलेले पत्रकार यांची नावे व त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. म्हणजेच हा ‘एपिडेमिक ऑफ डिसट्रस्ट’ आता ‘मल्टिपल ऑर्गन फेल्युअर’प्रमाणे झपाटय़ाने पसरू लागला आहे.
टेलिकॉम प्रकरणाची चौकशी जेपीसी ऊर्फ संयुक्त संसदीय समितीमार्फत व्हावी, या विरोधी पक्षांच्या मागणीला यूपीएतील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसने सुरुवातीला पाठिंबा दिल्यानंतर आघाडीला पडलेल्या चिरा दिसू लागल्या आहेत. यूपीएला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या पक्षांमध्ये मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष, लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल, इतकेच काय मायावतींचा बसपा असे पक्षही आहेत. केंद्रातील आघाडी सरकार चिरेबंदी कधीच नव्हते. विशेष म्हणजे संसदेतील बहुमतातून तसा चिरेबंदी वाडा कधीच उभा राहत नाही.
सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वी काही लेख याच स्तंभामधून मी लिहिले होते. ‘अराजकाचे पर्व’ हा त्या लेखांचा विषय होता. लोकसभा निवडणुकीत गेल्या वर्षी अनपेक्षितपणे काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या आणि कोणताही गडबड-गोंधळ, साठमारी न होता डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यामुळे ती अस्थिरतेची आणि अराजकाची भीती अवास्तव होती, असे बऱ्याचजणांना वाटले. परंतु वर म्हटल्याप्रमाणे बहुमतातून स्थैर्य निर्माण होते, हा भ्रम आहे. हे अनेक वेळा सिद्धही झाले आहे.
राजीव गांधींना १९८५ साली ५४३ पैकी ४१४ खासदारांचे जबरदस्त बहुमत मिळाले होते. इतके संसदीय बहुमत पंडित नेहरू वा इंदिरा गांधींनाही मिळाले नव्हते. पण अवघ्या दोन वर्षांनी विश्वनाथ प्रतापसिंग यांनी पक्षांतर्गत यादवीचे रणशिंग फुंकले. त्यानंतर बोफोर्सकांड सुरू झाले आणि त्याला जोडून ‘वही मंदिर बनाएंगे’ची देशव्यापी अराजकी चळवळ सुरू झाली. बोफोर्स प्रकरणाचा र्सवकष शोध घेण्यासाठी विरोधी पक्षांनी केलेल्या अशाच महाधिंगाण्यानंतर जेपीसी नेमली गेली. गेल्या २२ वर्षांत त्या चौकशीतून, न्यायालयीन खटल्यांमधून आणि तिसरी आघाडी, चौथी आघाडी आणि भाजप आघाडी यांच्या सरकारांनी सुरू केलेल्या समांतर चौकशी समित्यांमधून काहीही निष्पन्न झाले नाही. त्याचप्रमाणे गेल्या २२ वर्षांत- बाबरी मशीद १९९२ साली पाडल्यानंतर आजपर्यंत त्याच जागी मंदिरही बांधून झालेले नाही. बेबंदपणे आणि बेकायदेशीरपणे बाबरी मशीद उद्ध्वस्त करणाऱ्यांनी तितक्याच भक्तीभावाने आणि बेकायदेशीरपणे कारसेवा करून मंदिर का बांधले नाही? कारण अर्थातच मशीद उद्ध्वस्त करणे हे उद्दिष्ट होते. मंदिर हे निमित्त होते. मुद्दा हा की, जेपीसीच्या निमित्ताने त्यावेळी ज्या प्रकारचा हैदोस संसदेच्या दोन्ही सभागृहांत घातला गेला, तसाच आताही सुरू झालेला आहे. इतिहासाची पुनरावृत्ती जरी जशीच्या तशी झाली नाही, तरी ती तशीच बेबंदशाही स्वरुपात व्हावी, असा प्रयत्न भाजप आणि डाव्यांचाही दिसतो आहे. बिघडलेल्या संसदीय अंकगणितामुळे आकस्मिकपणे मध्यावधी निवडणुकाही येऊ शकतात. गेल्या वर्षी निवडून आलेल्या कोणत्याच खासदाराला पुन्हा निवडणूक नको आहे. अजून त्यांनी त्यात गुंतविण्यासाठी कोटय़वधी रुपये मिळविलेले नाहीत आणि गेल्या निवडणुकीतील खर्चाची वसुलीही झालेली नाही. परंतु संसदीय नियती ही ‘अपौरुषेय’ असते. म्हणजे ती खासदारांच्या इच्छेवर अवलंबून नसते. उदाहरणार्थ, अटलबिहारी वाजपेयींचे भाजप आघाडीचे सरकार १९९९ च्या एप्रिलमध्ये केवळ एक मताने पडले होते. किंवा त्याही अगोदर बरोबर ३० वर्षांपूर्वी १९६९ साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काँग्रेस पक्ष फुटला आणि सरकार अल्पमतात गेले. त्यानंतर दीड वर्षांनी- १९७१ साली (देशातील पहिल्या) मध्यावधी निवडणुका झाल्या. जनता पक्षाला १९७७ साली दोन-तृतीयांश बहुमत मिळूनही पक्ष फुटल्यावर १९८० साली मध्यावधी निवडणुका घेणे भाग पडले. अशा संसदीय अस्थिरतेच्या काळात डावे- उजवे- मधले असे मतभेद राहत नाहीत. १९६९ साली सर्व डाव्यांचा इंदिरा गांधींना पाठिंबा होता आणि १९७७ साली डावे पक्ष जनता पक्षाबरोबर होते!
आताही आघाडीतील मित्रपक्षांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन बाहेरून पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी हातमिळवणी केली आणि त्याच वेळेस अविश्वासदर्शक ठराव लोकसभेत आला तर सरकार अडचणीत येऊ शकते. कारण मग यूपीएला बहुमत सिद्ध करता येणार नाही आणि आता ऐनवेळेला सरकारच्या मदतीला धावून यायला ‘संसदीय जादूगार’ अमरसिंगही नाहीत. स्वत: अमरसिंग यांचीच स्थिती ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे. बिहारमध्ये फटका बसलेले लालूप्रसाद यादव आणि मुलायमसिंग यादव हे अस्सल राममनोहर लोहिया पीठात तयार झालेले अराजकवीर आहेत. मायावतींच्या नाकदुऱ्या काढणे आणि जयललितांबरोबर हातमिळवणी करणे हे किती धोकादायक असते, हा अनुभव काँग्रेसने (आणि सोनिया गांधींनी) घेतलेला आहे.
लवकरच तामीळनाडू, केरळ आणि प. बंगाल येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. या तीनही राज्यांत काँग्रेसची स्थिती चांगली नाही. केरळ आणि प. बंगालमध्ये डावी आघाडी कोंडीत सापडलेली असली तरी प. बंगालमध्ये त्याचा लाभ काँग्रेसपेक्षा तृणमूल काँग्रेसला होण्याची चिन्हे आहेत. आणि केरळमध्ये जरी काँग्रेसची परिस्थिती सुधारली तरी संसदीय आकडेमोडीच्या भाषेत त्याचा सरकारला फारसा उपयोग नाही.
म्हणजेच येत्या काळात देशातील वातावरण हे काँग्रेसविरोधी होत जाणार आहे. अशा स्थितीत जर आंध्र प्रदेशातील काँग्रेस पक्षात फूट पडली तर लोकसभेतील काँग्रेसच्या सदस्यसंख्येत घट होईल. आणि अविश्वास ठराव आलाच, तर स्वपक्षीयांकडूनच काँग्रेस अडचणीत येऊ शकेल. स्वतंत्र तेलंगणचे निखारेही आंध्रमध्ये आग लावू शकतात. म्हणजेच चहूबाजूंनी ‘पोलिटिकल लॅन्डमाइन्स’ आहेत आणि कुठेही चुकून पाय पडला तरी त्या सुरुंगांचा स्फोट होऊ शकेल.
परंतु सरकार पडले म्हणजे मध्यावधी निवडणुका अपरिहार्य होतात असे नाही. मोरारजी देसाई सरकारचा लोकसभेत पराभव झाल्यावर चरणसिंग पंतप्रधान झाले ते त्याच लोकसभेत. तसेच व्ही. पी. सिंग सरकार पडल्यानंतर त्याच लोकसभेत चंद्रशेखर यांना काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान होता आले. (चरणसिंग यांनाही इंदिरा गांधींच्या पाठिंब्यावरच पंतप्रधान होता आले होते. काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यावर चरणसिंग (१९७९) यांच्याप्रमाणेच १९९१ मध्ये चंद्रशेखर यांनाही जावे लागले.) मध्यावधी निवडणुका झाल्या त्याही ‘मध्यंतरा’तील सरकारे पडल्यानंतर! पुढे देवेगौडा यांचे सरकार पडल्यानंतर इंदरकुमार गुजराल पंतप्रधान झाले- दोन्ही वेळा काँग्रेसचे समर्थन लाभल्यानंतरच! काँग्रेसने पाठिंबा काढल्यानंतर तेही सरकार गेले. त्यानंतर १९९८ च्या निवडणुका झाल्या. भाजपप्रणीत आघाडीचे वाजपेयी पंतप्रधान झाले; पण तेही १९९९ साली एका मताच्या फरकाने पडले आणि पुन्हा निवडणुका झाल्या. त्या तुलनेत १९९९ ते २००४ आणि २००४ ते २००९ या दोन्ही वेळेस आघाडी सरकारे असूनही संसदीय अस्थैर्य आले नाही. परंतु आता मात्र त्या अस्थैर्याच्या भोवऱ्यात सरकार अडकत चालले आहे. अजूनही विरोधी पक्षांना- विशेषत: भाजपला आत्मविश्वास वाटत नसल्यामुळे त्यांची आक्रमकता बरीच संयत राहिली आहे. पण त्यामुळे अस्थैर्याचे सावट दूर होईल असे नाही.
जुलै २०१२ मध्ये नव्या राष्ट्रपतीची निवडणूक होईल. प्रतिभा पाटील यांच्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी नेपथ्यरचना आताच सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षांतर्गत चाललेला एक विचार असा होता की, तेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी निश्चित करायचे आणि पक्षाने राहुल गांधी यांचे नाव यूपीएचा मुख्य प्रतिनिधी- म्हणजेच पंतप्रधान म्हणून ठरवायचे. दुसरा पर्याय म्हणजे प्रणब मुखर्जी यांना पंतप्रधान करायचे. राहुल पंतप्रधान असतील आणि २०१४ साली त्यांच्या नेतृत्वाखाली सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर राजीव गांधींप्रमाणेच तेही प्रचंड बहुमताने निवडून येतील, असा काँग्रेसमधील काही मुत्सद्दय़ांचा कयास आहे. तो कयास आहे की भ्रम, याची कसोटी तेव्हाच लागेल. परंतु डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द पूर्ण व्हायच्या अगोदर कोणत्याही कारणाने प्रणब मुखर्जी यांच्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारी आली तर २०१४ च्या प्रचाराची सर्व सूत्रे राहुल यांच्याकडे देऊन त्यांचे भावी पंतप्रधानपद निश्चित करायचे, असा काहींचा विचार आहे.
या सर्व पर्यायी नेपथ्यरचनांमध्ये जे ‘स्थिर’ राजकारण गृहीत धरलेले आहे, त्यालाच बिहारच्या निवडणुका आणि घोटाळ्यांचे अर्थकारण यांनी सुरुंग लावला आहे. काही साक्षेपी काँग्रेस निरीक्षकांच्या अंदाजानुसार, पक्षाची विश्वासार्हता झपाटय़ाने उतरत आहे. आणि समजा, जरी २०१४ पर्यंत कसेबसे ‘दिवस काढले’ तरी त्यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा १४० जागांवर यावे लागेल. काँग्रेसला १९९८ आणि १९९९ साली इतक्याच जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच आर्थिक आणि राजकीय अस्थैर्य हे संसदीय सीमा ओलांडून अराजकाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपेल.
हे सर्व विवेचन संसदीय चौकटीच्या मर्यादेत अस्थैर्य राहील, अशा गृहितकावर आधारलेले होते. परंतु त्या चौकटीच्या बाहेरूनही ‘सिस्टीम’ला धक्के बसू शकतात. गेल्या पाच वर्षांत अर्थव्यवस्थेतील ‘वाढीचा दर’- मुख्यत: जमिनीची खरेदी-विक्री, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन उद्योग आणि खाणउद्योग यावर आधारित राहिला आहे. अलीकडे प्रकाशात येणारे सर्व घोटाळे (अगदी ‘स्पेक्ट्रम’सहित) याच उद्योगांशी संबंधित असल्याचे आढळून येत आहे. उत्पादन आणि सेवा या दोन क्षेत्रांतून देशाची संपत्ती निर्माण होणे म्हणजे अर्थव्यवस्थेला स्थैर्य येणे, असे ‘क्लासिकल’- अभिजात अर्थतज्ज्ञ मानतात. खाणउद्योगातून आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन उद्योगातून येणारी समृद्धी ही त्या अर्थाने देशाच्या संपत्तीत वाढ करीत नाही, असे हे अर्थतज्ज्ञ सांगतात. जर हे ‘मार्केट’ कोसळले, तर जी स्थिती आर्यलड वा दुबईची झाली, ती भारताची होऊ शकेल. शिवाय आज आपली अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी समांतर धनसंपत्तीवर (काळ्या पैशावर) उभी आहे, असे वित्तसंस्थांमधील काही लोक मानतात. जर आताचा आर्थिक वाढीचा दर परत ५ ते ६ टक्क्यांवर आला तर एकदम अरिष्टग्रस्त परिस्थिती निर्माण होईल. असे आर्थिक अरिष्ट १९८९-९१ या काळात आले होते. (सोने गहाण ठेवावे लागले ते त्यामुळेच.) त्याचे परिणाम समाज व राजकारण विस्कटवून टाकू शकतात.
चौकटीबाहेरून येणारे संकट अर्थातच दहशतवादाचे आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणि राज्यशकट दोन्ही झपाटय़ाने लयाला जात आहे. त्यामुळे पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ले होऊ शकतात- जसे ते जगातील राजकीय परिस्थितीमुळेही (अफगाणिस्तान, इराक, इराण, इस्रायल) होऊ शकतात.
सध्या वरवर भासणारी आलबेल परिस्थिती ही अराजकापूर्वीची क्लोरोफॉर्म देऊन आलेली भूल ठरू शकेल. कारण त्यातून बाहेर येताच आपण अस्थैर्याच्या भोवऱ्यात सापडलो असल्याचे लक्षात येईल. पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल!

कुमार केतकर
रविवार ५ डिसेंबर २०१०