टिळक आणि जीना : नुरानींच्या नजरेतून!

लोकमान्य टिळक आणि महमद अली जीना हे फक्त एकमेकांचे सहकारी वा स्वातंत्र्य चळवळीतील सहप्रवासी नव्हते, तर ‘कॉम्रेड्स इन आम्र्स’ होते; म्हणजेच सर्वार्थाने ‘भाई-भाई’ होते, हे काही अभ्यासकांना माहीत असले तरी त्याची फारशी चर्चा वा वाच्यता केली जात नाही. नि:पक्षपातीपणे सखोल संशोधन करून इतिहासलेखन करण्याबद्दल ख्याती असलेल्या ए. जी. (अब्दुल गफूर) नूरानी यांनी टिळक आणि जीना या दोघांच्या संबंधांवर लिहिलेला ‘जीना अ‍ॅण्ड टिळक- कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल’ हा ग्रंथ अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. या ग्रंथाने जीना व टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या राष्ट्रप्रेमावर, हिंदू-मुस्लीम ऐक्याबाबतच्या त्यांच्या भूमिकांवर नवा प्रकाश टाकला आहे. आज, १ ऑगस्ट रोजी टिळकांची ९० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने या वेगळ्या पुस्तकाबद्दल..
‘हिंदुस्थानच्या फाळणीचे खलनायक कोण?’ आणि ‘ही फाळणी टाळता आली असती का?’, या प्रश्नांवर शब्दश: हजारो पुस्तके, असंख्य निबंध-लेख, वृत्तपत्रीय स्तंभ लिहिले गेले आहेत. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील संवाद, चर्चा असो किंवा युद्ध, काश्मीरमधील ‘स्वातंत्र्यलढा’ असो अथवा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद, भारतातील हिंदू-मुस्लीम तणाव, दंगे वा तीव्र अपसमज या सर्वाचे मूळही फाळणीत आहे, असे बहुतेकांचे मत आहे.
फाळणी आणि स्वातंत्र्यानंतर आता साठ वर्षे होऊन गेली तरी फाळणीच्या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न नीट उकलले गेलेले नाहीत. प्रत्येक दशकात दोन्ही देशांचा सुरक्षाव्यवस्थेचा खर्च वाढतच चालला आहे आणि अणुयुद्धाचा धोकाही टळलेला नाही.
बहुसंख्य भारतीयांच्या (आणि हिंदूंच्या) दृष्टिकोनातून महमद अली जीना हे फाळणीचे खलनायक; परंतु पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून ते त्यांच्या देशाचे महानायक कायदेआझम! काही ‘तटस्थ’ भाष्यकारांच्या दृष्टिकोनातून जीना हे भारतीय उपखंडातील प्रतिनायक! गांधीजींनाही आव्हान देऊ शकणारे आणि पंडित नेहरूंनाही ‘तुल्यबळ’ प्रतिस्पर्धी ठरू शकणारे!
गेल्या काही वर्षांत संघ परिवारातील (मुख्यत: भाजपमधील) बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांना महमद अली जीनांबद्दल विलक्षण आत्मीयता वाटू लागल्याने हिंदुत्ववाद्यांमध्येच खळबळ माजली आहे. लालकृष्ण अडवाणी आणि जसवंतसिंह या दोन दिग्गज भाजप पुढाऱ्यांनी जीनांवर स्तुतिसुमने उधळली आहेत. जीना आधुनिक विचारांचे होते, उदारमतवादी होते, त्यांची जीवनशैली युरोपियन होती; इतकेच नव्हे तर ते विचारांनीही सेक्युलर होते, असेही प्रतिपादन केले गेले आहे. हिंदुत्ववादी परिवारातील हा ‘नवविचार’ बाजूला ठेवला तरी मुंबईतील आणि उर्वरित भारतातील अनेकांना जीनांचे आकर्षण वाटत आले आहे. हे जीना-प्रशंसक मुस्लीम जातीयवादी नाहीत (वा नव्हते), फाळणीचे समर्थक नाहीत आणि नेहरू-गांधींचे विरोधकही नाहीत.
अनेक व्यासंगी, साक्षेपी आणि चिकित्सक भाष्यकार व इतिहासकारांनी या ‘खलनायका’तील नायकाचा शोध घेतला आहे. किंबहुना नायकाच्या भूमिकेत राजकारण करू लागलेल्या या नेत्याचा एकदम खलनायक कसा झाला, याबद्दलही या विद्वानांनी अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषण आणि जीनांचे मनोविश्लेषणही केले आहे. विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत जसे गांधीजी व नेहरू हे राजकीय क्षितिजावर तळपत होते, तसेच जीनाही आपले स्वयंभू व्यक्तिमत्त्व व आपला स्वतंत्र ठसा उमटवू लागले होते. जीनांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता, त्यांचा नि:स्पृह वकिली बाणा, त्यांचे अमोघ वक्तृत्व, त्यांची भाषा आणि व्यक्तिमत्त्व यामुळे ते या पिढीतील स्वातंत्र्यलढय़ात आघाडीवर होते. राजकीय डावपेच, स्वाभिमान आणि लोकांचा (फक्त मुस्लीमच नव्हे, तर हिंदूंचासुद्धा!) पाठिंबा यामुळे ते लोकमान्य टिळकांपासून ते सरोजिनी नायडूंपर्यंत सर्वाना आपलेसे वाटत. त्यांच्या राष्ट्रप्रेमाविषयी (एकत्र हिंदुस्थान) आणि त्यांच्या जाज्ज्वल्य ब्रिटिश साम्राज्यविरोधाविषयी कुणालाही शंका नव्हती. फाळणीचा तर तेव्हा मुद्दाच नव्हता. आणि जीना हे तर हिंदू-मुस्लीम एकजुटीचे तेजस्वी प्रतीक होते, असे अनेक काँग्रेस नेत्यांचे त्यावेळी मत होते.
बहुसंख्य भारतीयांना जीना माहीत आहेत ते त्यांनी पाकिस्तानची मागणी केल्यापासून ते फाळणीपर्यंत! म्हणजे एकूण सात-आठ वर्षांचा काळ! फाळणीनंतर (स्वातंत्र्यानंतर) सहा महिन्यांच्या आतच गांधीजींची हत्या झाली. त्यानंतर आठ महिन्यांच्या आत म्हणजे ११ सप्टेंबर १९४८ रोजी जीनांना दीर्घ आजारानंतर मृत्यू आला. म्हणजेच भारतीय उपखंडातील दोन देशांचे दोन राष्ट्रपिते भारत व पाकिस्तान यांच्या निर्मितीनंतर दीड वर्षांच्या आत काळाच्या पडद्याआड गेले. तरीही त्या दोघांबद्दल आणि भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल चर्चा-वाद, प्रबंध चालूच आहेत.
परंतु लोकमान्य टिळक आणि महमद अली जीना हे फक्त एकमेकांचे सहकारी वा स्वातंत्र्य चळवळीतील सहप्रवासी नव्हते, तर ‘कॉम्रेड्स इन आम्र्स’ होते; म्हणजेच सर्वार्थाने ‘भाई-भाई’ होते, हे काही अभ्यासकांना माहीत असले, तरी त्याची चर्चा वा वाच्यताही फारशी केली जात नाही. जणू काही स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या तीन दशकांचा इतिहास जीनांशिवाय लिहिला जाऊ शकतो!
नि:पक्षपातीपणे, यथार्थ संशोधन करून, शैलीदारपणे इतिहासलेखन- विशेषत: अर्वाचीन इतिहास लिहिण्यासाठी ज्यांची जगभर ख्याती आहे, अशा ए. जी. (अब्दुल गफूर) नूरानी यांनी टिळक आणि जीना या दोघांच्या संबंधांवर एक ग्रंथ लिहिला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन तीन महिन्यांपूर्वी कराचीमध्ये झाले तेव्हा अनेक व्यासंगी अभ्यासक, प्राध्यापक, राजकीय व्यक्ती, ज्येष्ठ पत्रकार हजर होते. वयाची जवळजवळ आठ दशके पार केलेल्या नूरानी यांनी स्वातंत्र्य व फाळणी दोन्ही जवळून पाहिली आहे. कट्टर भारतीय मुसलमान असूनही ते हिंदुद्वेष्टे, पाकिस्तानद्वेष्टे, जीना वा गांधी-नेहरूंविरोधी असे अजिबात नाहीत. अभ्यास करताना कोणताही पूर्वसमज मनात बाळगायचा नाही, मन खुले ठेवतानाच तात्कालिक स्थिती, संदर्भ, व्यक्ती यांचे उत्तम भान ठेवायचे आणि जितके जमेल तितके मूळ दस्तावेज पाहायचे, असे अस्सल संशोधकाचे निकष त्यांनी पाळले आहेत. त्यामुळे हा ग्रंथ केवळ भारतीय उपखंडाच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारा नाही, तर एका विशिष्ट कालखंडावर लक्ष केंद्रित करून इतिहासाचे नवे पैलू उलगडून दाखविणारा आहे. त्याचप्रमाणे टिळक व जीना यांच्या व्यक्तिमत्त्वावर, राजकीय शैलीवर आणि त्यांच्यातील अनोख्या संबंधांवर अनपेक्षित असा प्रकाश टाकणारा आहे.
सर्वसाधारणपणे पुणे करार, लखनौ करार, टिळकांचे जीनांनी घेतलेले वकीलपत्र, जीनांचे काँग्रेसमधील त्यावेळचे स्थान यासंबंधात जुजबी लेखनसंदर्भ घेतले गेले असले तरी त्या दोघांच्या संबंधांना ‘कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल’ असे संबोधण्याचे धाष्टर्य़ आजवर कुणीही केलेले नव्हते. नूरानी यांच्या ग्रंथातील जी परिशिष्टे आहेत, त्यात यासंबंधातील सर्व दस्तावेज मिळवून ते त्यांनी प्रसिद्ध केले आहेत.
टिळक आणि जीना यांचे त्यावेळचे संबंध पाहता असे वाटू लागते की, तोच ‘कॉम्रेड्स’चा धागा टिकला असता तर इंग्रजांना फाळणीचे कारस्थान रचता आले नसते आणि फाळणीही झाली नसती! हिंदू-मुस्लीम संबंध बऱ्याच अंशी सुदृढ राहून ‘अखंड हिंदुस्थान- अखंड भारत’ निर्माण झाला असता! जगातील एक प्रभावी, महाकाय देश निर्माण झाला असता आणि ‘महासत्ता’ होण्याची नुसती स्वप्ने पाहण्याची वेळ आपल्यावर आली नसती!
नूरानींच्या या ग्रंथाचे तसेही अनेक फायदे आहेत. एका भारतीयाने लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन कराचीच्या ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने केले आहे. हे पुस्तक आता भारतात विकले जात असल्याने भारतात जीनांना- आणि त्याहीपेक्षा पाकिस्तानमध्ये फाळणीपर्यंतच्या जीनांना आणि अर्थातच टिळकांना समजून घेता येणे सोपे जाणार आहे. फाळणी झाली त्यावेळी टिळकांना जाऊन तब्बल २७ वर्षे झाली होती. याचाच अर्थ तेव्हाही अखंड हिंदुस्थानातल्या पाकिस्तानात टिळक हे नाव मागे पडले होते. तेव्हाच्या नव्या पिढीलाही- टिळकांनी काय केले, त्याहीपेक्षा जीनांनी आधीच्या काळात अखंड हिंदुस्थानसाठी- म्हणजेच स्वराज्यासाठी आणि टिळकांसाठी काय केले, हे माहीत असायची शक्यता नाही. आता तर ती शक्यता अधिकच अंधुक झाली आहे. काही थोडेफार संशोधक आणि कराची विद्यापीठात असलेले इतिहास संशोधक सोडले तर हा इतिहास त्यांच्या दृष्टीने पूर्ण नवा आहे.
टिळक आणि जीना यांचे संबंध किती दृढ होते, ते टिळकांवर भरण्यात आलेल्या राजद्रोहाच्या तिसऱ्या खटल्यात जीनांनी जो त्यांच्यासाठी प्रखर युक्तिवाद केला त्यावरून स्पष्ट होते. या खटल्यात टिळक संपूर्ण निर्दोष सुटले. अन्यथा त्यांना आणखी काही वर्षे तुरुंगात खितपत पडावे लागले असते. या खटल्याचा सर्व इतिवृत्तान्त या पुस्तकात देण्यात आला आहे. टिळकांवर भरण्यात आलेल्या राजद्रोहाचा हा खटला त्यांनी अहमदनगर आणि बेळगावमध्ये केलेल्या भाषणांसाठी होता. आणि जीनांना मराठी येत नसतानाही त्यांनी या मराठी भाषणांबद्दल टिळकांवर खटला कसा काय भरला जाऊ शकतो, असा मुद्दा उपस्थित केला होता. आधीच्या खटल्यांमध्ये टिळकांनी ज्याप्रमाणे प्रत्येक शब्दाचे बारकावे आणि त्याचे अर्थ खुलासेवार स्पष्ट केले, त्याचप्रमाणे याही खटल्यामध्ये जीनांनी मराठी स्टेनोग्राफरला जेरीला आणून त्याची लघुलिपी कशी विश्वासार्ह ठरू शकत नाही, याविषयी न्यायमूर्ती सर स्टॅन्ले बॅचलर आणि न्यायमूर्ती शहा यांच्या न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद केला. हा खटला टिळक हरले असते तर..?
टिळकांविषयी जीनांना किती श्रद्धा वाटत होती, हे शब्दांत सांगता नाही येणार! विशेष हे, की ते टिळकांच्या बरोबरीने गांधीजी आणि गोखले यांच्याविषयीही तितकेच सश्रद्ध होते. गांधीजींबरोबरचे त्यांचे संबंध बिघडले तो कालखंड टिळकांचे निधन झाल्यानंतरचा! नूरानी यांनी एडविन एस. मॉन्टेग्यू यांच्या ‘इंडियन डायरी’मध्ये असलेले काही उतारे दिले आहेत. २७ नोव्हेंबर १९१७ च्या नोंदीत ते म्हणतात की, भारतीय समाजावर सर्वाधिक प्रभाव असणारी सध्याची एकमेव व्यक्ती म्हणून टिळकांचा उल्लेख करावा लागेल. ते राष्ट्रीय हीरो आहेत. त्यावेळच्या संयुक्त प्रांताचे लेफ्टनंट गव्हर्नर हेसुद्धा टिळकांना असणारी लोकप्रियता पाहून भारावून गेले होते. मंडालेहून सुटका होऊन येताच टिळकांनी काँग्रेसच्या कार्याला वाहून घेतले तेव्हा त्यांची लोकप्रियता शिखराला पोहोचली होती. याचे श्रेय मुस्लीम लीगसमवेत टिळकांनी घडवून आणलेल्या २१ ऑगस्ट १९१६ च्या ‘लखनौ करारा’कडेही जाते. या करारावर जेव्हा हिंदूंकडून अतिरेकी स्वरूपाची टीका होऊ लागली, तेव्हा त्यांनी दिलेले तडफदार उत्तर आजच्या काँग्रेस नेत्यांनाही देता येणे शक्य नाही. ते म्हणाले होते की, ‘केवळ मुसलमानांना स्वराज्याचे अधिकार देण्यात आले तरी त्याचे आम्हास काही वाटणार नाही. कारण त्यानंतर या लढय़ाचे स्वरूप आजच्याप्रमाणे तिरंगी राहणार नाही.’ हे त्यांचे धीरोदात्त रूप तेव्हा पाहायला मिळाल्यानेच हसरत मोहानीसारखा प्रख्यात शायर (‘चुपके चुपके रात-दिन’ गझल फेम!) टिळकांच्या प्रेमात पडला. त्याने त्यावेळी लिहिलेले मूळ उर्दू काव्यही आपल्याला या ग्रंथात वाचायला मिळते. हा कवी म्हणतो..
‘ऐ तिलक ऐ इफ्म्तख़ारे जज्म्बए हुब्बे वतन
हक़ शनासो, हक़पसंदो, हक़ यक़ीनो हक़ सुख़न।।
तुझसे क़ायम है बिना आज्मादिये बेबाक की
तुझसे रौशन अहले इख़्लासो वफ़ा की अन्जुमन।।
सबसे पहले तूने की बर्दाश्त ऐ फ़ज़्र्‍ान्दे हिन्द
ख़िद्मते हिन्दोस्ताँ में कुल्फ़ते कैदे महन।।
ज़ात तेरी रहनुमाए राहे आज्मादी हुई
थे गिरफ्म्तारे ग़ुलामी वरन: याराने वतन।।
तूने ख़ुद्दारी का फूंका ऐ तिलक ऐसा फ़ुसूँ
यक क़लम जिससे ख़ुशामद की मिटी रस्मे कुहन।।
नाज़्‍ा तेरी पैरवी पर हस्रते आज़ाद को
ऐ तुझे क़ायम रखे तादेर रब्बे ज़ुलमनन’।।
(थोडक्यात- देशभक्तीच्या अभिमानस्वरूपा, देशाच्या सुपुत्रा, तुला भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जावे लागले. समाजाला तू आहेस म्हणून, अन्यथा असंख्य जिवांना गुलामगिरीच्या जोखडाखाली राहावे लागले असते. तू जो काही आत्मसन्मान लाभू दिला आहेस तो अपूर्व असा आहे. स्वतंत्र प्रज्ञेचा हा हसरत तुझ्या पावलांवर पाऊल टाकून पुढे वाटचाल करणार आहे. आपल्या कार्यसिद्धीसाठी शक्तिशाली परमेश्वर तुला दीर्घायुरारोग्य देवो!)
विशेष हे, की टिळकांचा एखाद् दुसरा चरित्रकार सोडला तर कुणीही हसरत मोहानी यांच्या या श्रद्धेविषयी मनापासून फारसे लिहिलेले नाही.
लखनौ कराराने ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना एका अर्थाने जबर धक्का बसला होता. काँग्रेस आणि मुस्लीम लीग स्वराज्यप्राप्तीसाठी अशा पद्धतीने एकत्र येतील असे त्यांनी स्वप्नातसुद्धा पाहिले नव्हते. त्याआधी जेव्हा या कराराचे स्वरूप ठरवण्यासाठी मुस्लीम लीगचे अधिवेशन मुंबईच्या ताजमहाल हॉटेलमध्ये १९१६ च्या नववर्षदिनी भरायचे घाटत होते तेव्हा ब्रिटिशांनी ते कसे उधळून लावता येईल, याकडे बारकाईने लक्ष पुरविले होते. त्यावेळी जीनांनी सुधारणांसाठीचा एक मसुदा तयार करून सभेपुढे ठेवला आणि त्यास मौलाना अबुल कलाम आझाद यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर एप्रिलमध्ये काँग्रेस महासमितीची बैठक होऊन त्यात संमत केलेला ठराव मुस्लीम लीगकडे पाठविण्यात आला. हे सहकार्य पद्धतशीर होते. दोन समाज एकत्र राहावेत म्हणून ते होते. मुस्लीम लीगच्या लाहोरच्या बैठकीत तर टिळक प्रमुख पाहुणे म्हणून हजर असल्याचे इतिहास सांगतो. गोहत्याबंदीचा ठरावही लाहोरच्या या ऐतिहासिक अधिवेशनातलाच! काँग्रेसमध्ये जहालांचे स्थान पक्के करण्यासाठी जीना आणि टिळक यांनी एकत्रितरीत्या काम केले ती दोन वर्षेसुद्धा १९१५ आणि १९१६ हीच होत!
मंडालेच्या अटकेतून सुटून आल्यावर टिळकांजवळ एवढी ऊर्जा कशी आली होती, हे आजही गूढ वाटते. त्या काळातले टिळक आणि जीना आपल्याला कळतात ते सदाशिवराव बापटांच्या आठवणींमधून किंवा टिळकांसमवेत काम करणारे न. चिं. केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्यासारख्यांच्या लिखाणातून! विशेष हे, की त्यांच्या आणि खुद्द टिळकांच्या लिखाणातून आपल्याला जीना कळतात. बापटांच्या आठवणींचे भाषांतर तेव्हा बॅ. जयकरांनी करून ठेवले नसते तर कदाचित महाराष्ट्राबाहेरचे इतिहासकार एका समृद्ध ठेव्याला मुकले असते. हे नुरानींच्या या पुस्तकावरूनही जाणवते.
टिळकांचे १९२० मध्ये निधन झाल्यावर बरोबर सात वर्षांनी, आपण मुस्लिमांसाठीच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या बाजूने नाही, पण त्यामागे मुस्लीम लीगचे बहुमत आजही आहे, हे त्यांनी मान्य केले होते. डॉ. एम. ए. अन्सारी यांना अल्लामा इक्बाल यांनी १९३५ च्या नववर्षदिनी लिहिलेल्या पत्रातही ‘आता हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र काम करण्याची वेळ आली आहे,’ असे म्हटले होते. ‘बॉम्बे क्रॉनिकल’चे त्यावेळचे संपादक सईद अब्दुल्ला ब्रेलवी यांनीही आपले मत नोंदवले होते. त्यात त्यांनी जीना यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला काय वाटते, ते स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की, जीनांनी त्याही वेळी आपण उभयपक्षी (हिंदू आणि मुस्लीम) मान्य होईल असा कोणताही तोडगा काढण्यास तयार आहोत, असे म्हटले होते. याचाही अर्थ- जीना तोपर्यंत खूपच बदलले, असा जो लावण्यात येतो तो खरा नव्हे, असे सांगणारा आहे. या पुस्तकात असणारा सारा पत्रव्यवहार पाहता आणि अस्सल कागदपत्रांच्या आधारे दिलेली उपयुक्त माहिती लक्षात घेता इतिहासाच्या अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरणारा आहे. काँग्रेसने टिळकांपासून मुस्लिमांचे लांगूलचालन सुरू केले, असा दावा करणारे संघ परिवारवादी काहीही म्हणोत, फाळणी वाचवायचे प्रयत्न टिळकांपासूनच सुरू झाले आणि ते अगदी १९४६ पर्यंत- म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत- आणि जीनांच्या बाजूने चालू होते. अगदी जीनांना पंतप्रधान करून आणि मंत्रिमंडळ निवडीचे अधिकार देऊन हा गुंता सुटावा यासाठीचे ते प्रयत्न होते. त्यात यश येते, तर इतिहासाचे रूप नक्कीच पालटले असते. नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते.
‘जीना अ‍ॅण्ड टिळक : कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल’ लिहिणारे ए. जी. नूरानी हे सर्वोच्च न्यायालयातील वकील म्हणून ख्यातकीर्त आहेत. ते घटनातज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. ‘हिंदू’पासून ‘डॉन’पर्यंत त्यांचा लेखनप्रवास आहे. ते ‘फ्रंटलाइन’मध्येही लिहितात. ते ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल वीकली’चे स्तंभलेखक आहेत. अगदी शेवटच्या- म्हणजे फाळणी होण्यापूर्वीच्या टप्प्यातही जीनांना मुस्लिमांचे अधिकार शाबूत ठेवून महासंघही चालला असता, असे नूरानींचे मत आहे. अर्थात त्यांना काय घडवायचे होते आणि काय घडले, हा प्रश्न अलाहिदा!
आंतरराष्ट्रीय राजकारणाचा व्यूहात्मक अभ्यास करणारे असेही म्हणू शकतील की, जर फाळणी झाली नसती आणि ‘इस्लाम-अधिष्ठित पाकिस्तान’ निर्माण झाला नसता तर कदाचित मूलतत्त्ववादी व दहशतवादी इस्लामी पंथ तयार झाला नसता, किंवा जन्माला आला असता तरी आजच्यासारखा फोफावला नसता! म्हणजेच आज दिसणारे पाकिस्तान-अफगाणिस्तान-अमेरिका किंवा पाकिस्तान-चीन-भारत असे अस्वस्थ सत्ता-त्रिकोण निर्माण झाले नसते. इस्लामी मूलतत्त्ववादाचा उगम व विकास जरी अरब राष्ट्रांत झाला असला तरी एकेकाळी अरब संस्कृती व ‘सिव्हिलायझेशन’ हे युरोपपेक्षाही प्रगत होते आणि तो प्रगत अरब संस्कृतीचा स्रोत अधिक प्रभावशाली ठरून धर्मवादी व प्रतिगामी इस्लामी राजकारणाचा पराभव झाला असता! हिंदुस्थानच्या फाळणीमुळे सनातनी इस्लामला भारतीय उपखंडात मुळे रोवता आली, हे तर कुणीही मान्य करील!
‘जीना अ‍ॅण्ड टिळक- कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल’, लेखक : ए. जी. नूरानी, प्रकाशक : अमीना सईद, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, कराची; पृष्ठे : ४६६ अधिक छायाचित्रे,
किंमत : ७९५ पाकिस्तानी रुपये.

कुमार केतकर - रविवार, १ ऑगस्ट २०१०

बातम्यांचे 'मार्केट'!

ई-टीव्ही मराठीवर बातम्यांचे प्रसारण सुरू झाले त्याला अलीकडेच दहा वष्रे पूर्ण झाली. ई-टीव्हीनंतर २४ तास चालणाऱ्या अन्य मराठी वृत्तवाहिन्याही सुरू झाल्या. आणि आता त्या चांगल्या स्थिरावल्याही आहेत. या वृत्तवाहिन्यांच्या काळात ‘बातमी’चे बदललेले स्वरूप, वाहिन्यांमुळे वृत्तपत्रांमध्ये आणि एकूणच बातम्या देण्याच्या पद्धतीत झालेले बदल आणि या नव्या माध्यमाच्या मर्यादा यावर एक दृष्टिक्षेप-
बातमी म्हणजे काय? ज्ञानेश्वरांच्या काळात वर्तमानपत्रे वा टीव्हीच्या वृत्तवाहिन्या नव्हत्या. तेव्हा जर अशी माध्यमे असती तर प्रचंड गदारोळ माजू शकला असता. ज्ञानेश्वरांनी जिवंतपणे घेतलेली समाधी ही ‘लीड स्टोरी’ झाली असती. तेव्हा छपाईचा शोध लागला नसल्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’वर उलटसुलट प्राध्यापकी चर्चा वर्तमानपत्रांतून झाली नाही. कुणी सांगावे, खुद्द ज्ञानेश्वरांच्या मराठी शब्दयोजनेवर कडाडून टीकाही झाली असती आणि काही स्वयंभू विद्वान संपादकांनी ज्ञानोबांनाच चार शब्द सुनावले असते. टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या जिवंत समाधीचे ‘लाइव्ह’ चित्रण केले असते. त्या काळात अशी समाधी घ्यायला बंदी वगैरे नसावी. नाहीतर तत्कालिन पोलिसांनी ज्ञानेश्वरांना अटकच केली असती! आणि ‘ज्ञानेश्वरांच्या अटकेमुळे सर्वत्र खळबळ’ किंवा ‘समाधीचा प्रयत्न फसला’ अशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये वा वाहिन्यांवर झळकल्या असत्या. सुदैवाने (किंवा दुर्दैवाने!) तेराव्या शतकात प्रसारमाध्यमे नव्हती. त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी छपाईचा प्राथमिक शोध लागला आणि त्यानंतर आणखी सुमारे दीड-दोनशे वर्षांनी युरोपातील पहिली-वहिली वृत्तपत्रे प्रसिद्ध झाली.
शेक्सपियरच्या काळात आणि नंतर क्रॉमवेलच्या काळात पत्रकवजा ‘बातमीपत्रे’ प्रसिद्ध होऊ लागली होती. पण साक्षरता कमी. (बातम्यांचा मुख्य प्रसार ‘मौखिक’ म्हणजे ‘वर्ड ऑफ माऊथ’मार्फत होत असे. गावगप्पा हे तत्कालिन मौखिक वर्तमानपत्र!) वृत्तपत्र छापून प्रसिद्ध केले तरी वाचता येणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती.
क्रॉमवेल (ज्याने इंग्लंडमधील पहिली लोकशाही क्रांती घडवून आणली, राजाचा ‘न्याय्य’ पद्धतीने शिरच्छेद घडवून राजेशाही कायमची नष्ट झाल्याचे घोषित केले. परंतु १३ वर्षांनंतर पुन्हा राजेशाही प्रस्थापित झाली! असो.) आणि शिवाजीमहाराज हे थोडय़ाफार वर्षांच्या फरकांनी समकालीन. सुदैवाने (किंवा दुर्दैवाने!) महाराजांच्या काळातही वृत्तपत्रे नव्हती व वाहिन्याही नव्हत्या. वाहिन्यांनी त्यांच्या राज्याभिषेकाचा महागौरव सोहळा थेट प्रक्षेपित केला असता आणि त्यानंतर त्यांची विशेष मुलाखत घेऊन ‘भविष्यातील महाराष्ट्र’ कसा असेल, याबद्दल प्रश्नही विचारले असते. (अर्थातच महाराजांना महाराष्ट्राची आज झालेली दुर्दशा तेव्हा सांगता आली नसती. आणि आपल्या नावाने सर्व राजकीय पक्ष त्यांचे सत्तेचे राजकारण करतील, हाही अंदाज त्यांना आला नसता. त्यांना वाटले असते की, त्यांच्या स्वराज्याचे आदर्श तरी निदान पाळले जातील!)
मुद्दा हा की, ‘बातमी’ म्हणजे काय, याची व्याख्या काही प्रमाणात जरी तशीच राहिली असली तरी प्रथम दैनिके आणि नंतर वृत्तवाहिन्या आल्यावर ती व्याख्या बदलत गेली आहे आणि ‘आयपॅड’, ‘आयपॉड’, ‘कींडल’ व त्यानंतर येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीनंतर अधिकच बदलत जाणार आहे.
गणपती दूध प्यायल्याची ‘बातमी’ (सप्टेंबर १९९५) इतक्या वेगाने पसरली, की महाराष्ट्रात व देशातच नव्हे, तर थेट लंडन-न्यूयॉर्कमध्येही खळबळ माजली. कारण तिकडच्या ‘प्रगत’ अनिवासी भारतीयांनी भराभर दूध विकत आणून घरातल्या गणपतीला पाजायला सुरुवात केली. खरे म्हणजे तेव्हा मोबाइल फोन्सचे आजच्यासारखे वैश्विक जाळे नव्हते. ‘एसएमएस’ करण्याचा त्यामुळे प्रश्नच नव्हता. ‘इंटरनेट’सुद्धा इतके ‘वर्ल्डवाइड’ नव्हते. तरीही काही तासांत ती (अर्थशून्य) बातमी जगभर पसरली आणि लोक आपणहून त्या बातमीवर (आजपर्यंत) चर्चा करीत राहिले. (सुदैवाने) तेव्हा वृत्तवाहिन्या नव्हत्या, नाहीतर बिचाऱ्या गणपतीला किमान आठवडाभर सर्व चॅनल्सवर दूध पीत बसावे लागले असते. शेकडो बुवा-बाया त्यानिमित्ताने मुलाखती द्यायला आले असते आणि या चमत्काराच्या ‘वैज्ञानिक’ आणि ‘आध्यात्मिक’ बाजू वाहिन्यांनी लोकांसमोर मांडली असती. चॅनल्स अशा ‘चमत्कारां’ची बातमी शोधतच असतात. काही वर्षांपूर्वी ‘गंगा अवतरली’ ही ‘बातमी’ पसरल्यामुळे अनेकांनी गलिच्छ खाडय़ांमधून तांबे-बाटल्या भरून पाणी आणले आणि प्यायले होते. त्या चमत्काराचा ‘आँखो देखा हाल’ दिसल्यामुळे लाखो लोक ते पाणी प्यायला समुद्राकडे वा जवळच्या खाडीकडे वळले होते.
‘बातमी’ला प्रत्यक्ष वा सत्य घटनेचा आधार लागतो, असे आपण सर्वसाधारणपणे मानतो. परंतु ‘अफवा’ वा एखादी ‘गावगप्पा’ वा ‘गॉसिप’ यासुद्धा आता ‘न्यूज’ वा ‘ब्रेकिंग न्यूज’ या सदरातच जमा झाल्या आहेत. शिवाय बातमी ‘प्रथम’ कुणी दिली, यालाही अवास्तव महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘बातमी’ महत्त्वाची की कुणी प्रथम दिली, हे महत्त्वाचे?
हे ‘प्रथम’ बातमी देण्याचे प्रकरण आता इतके हाताबाहेर गेले आहे की, कोणतीही शहानिशा न करता बातमीरूपी अफवा वा गावगप्पा जरी हाती लागली तरी ती आता थेट चॅनलवर येऊन आदळते! मग ती बातमी ‘अभिषेक बच्चनचे लग्न अगोदरच झाले होते’ ही असो वा विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय सावंत पडले- ही असो. या दोन्ही बातम्या काही तासांतच खोटय़ा ठरल्या. पण तेवढय़ा काळात त्यांनी सर्व वाहिन्यांवर हंगामा माजवला होता. अभिषेक प्रकरणात तर एक तोतया पत्नी कम् पूर्वप्रेयसी चॅनलवर आणून तिची मुलाखतही घेण्यात आली होती.
वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या आता तर ‘बातमी’, तिच्यावरची प्रतिक्रिया, त्या प्रश्नाविषयी (म्हणजे बातमीतून उपस्थित होणाऱ्या मुद्दय़ाविषयी) एखाद्या प्रतिष्ठिताचे मत आणि त्या मताला होणारा विरोध- हे सर्व ‘न्यूज’ म्हणवूनच खपवतात. त्यामुळे सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या विवाहाला तर भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील संघर्षांचे रूप प्राप्त झाले होते. अक्षरश: २४ तास या ‘बातमी’ला चर्चा- परिसंवादाचे स्वरूप आले होते. आणि ते ‘न्यूज’ वा ‘ब्रेकिंग न्यूज’च्या माध्यमातून खपविले जात होते.
‘बातमी’ आणि एखाद्या विषयावरचे एखाद्याचे मत या तशा भिन्न गोष्टी आहेत. परंतु एखादा मंत्री, विरोधी पक्षाचा पुढारी, विचारवंत, सेलिब्रेटी, अभिनेता यांच्या वावदूक मतांना वा त्यांच्या ब्लॉग्जवरील निर्थक भाष्यांनाही आता ‘बातमी’चा दर्जा प्राप्त झाला आहे. साहजिकच बातमी व मत यांत काही सीमारेषाच न उरल्यामुळे निखळ बातमी व त्या बातमीमुळे उपस्थित होणाऱ्या मुद्दय़ावर नि:पक्ष मतप्रदर्शन हे आता अर्थशून्य ठरू लागले आहे.
वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या कोणत्याही विषयावर कुणाचेही मत तितक्याच ‘गांभीर्याने’ आणि तत्परतेने घेत असल्यामुळे कोणत्या विषयावर कोणाचे विचार ग्राह्य असू शकतात, कोणत्या ‘मता’चा काय प्रभाव पडायला हवा, याचेही भान सुटले आहे. कुणीतरी अतिरेकी (वा अतिउत्साही) आणि बेजबाबदार पत्रकार वा चॅनलवाला काहीतरी प्रक्षोभक (आणि असंबद्ध) बोलतो, किंवा कुणा पुढाऱ्याच्या कुठल्यातरी भडकावू भाषणाची ध्वनीचित्रफित दाखवतो आणि त्यामुळे दंगाही पेटतो.
लोकशाही व्यवस्थेत माध्यमस्वातंत्र्य असायला हवे, याचा अर्थ कुणालाही काहीही, केव्हाही, कसेही, कुठेही जाहीर विधान करून ते प्रसृत करण्याचा अधिकार- असा नाही. ‘अमुक अमुक केले नाही तर एखादी संस्था पेटवून देऊ’, किंवा ‘अमुक-तमुक व्यक्तीला गावात येऊ देणार नाही’ अथवा ‘त्याला रस्त्यात चपलेने मारू’- ही व याहूनही अधिक उग्र विधाने वृत्तवाहिन्यांद्वारे प्रसृत केली गेली आहेत. यात बातमी काय? त्याच्या या विधानांमुळे जातीय वा भाषिक दंगल पेटली तर ती दंगलच मग बातमी होते. पण त्या दंगलीला कारणीभूत ठरलेले ते अनाठायी विधान हे बातमी म्हणून दिले गेल्यामुळे असा गंभीर प्रसंग उद्भवलेला असतो. माध्यमांमुळे (वृत्तपत्रेसुद्धा! केवळ वाहिन्या नव्हेत!) आता वेगळ्याच प्रकारचे सामाजिक- मानसिक- सांस्कृतिक ताणतणाव निर्माण होऊ लागले आहेत.
मार्शल मॅक्लुहान या जगप्रसिद्ध माध्यमतज्ज्ञाने सुमारे ५० वर्षांपूर्वी जेव्हा म्हटले की, ‘जग आता एक खेडे झाले आहे’ (वर्ल्ड नाऊ इज ए ग्लोबल व्हिलेज!), तेव्हा त्याला असेही सुचवायचे होते की, माध्यमांमुळे आता जगाचा चव्हाटा- असेच माध्यमांना रूप येणार आहे. गंमत म्हणजे मॅक्लुहान यांनी जेव्हा ते भाष्य केले तेव्हा मोबाइल नव्हते, इंटरनॅशनल टीव्ही चॅनल्स आणि त्यांचा २४ तास उपग्रह संचार नव्हता. इंटरनेट नव्हते. आणि आयपॅड- आयपॉडही नव्हते. परंतु मॅक्लुहानसारख्या द्रष्टय़ा विचारवंताला हे तेव्हाच लक्षात आले होते की, चव्हाटय़ावरून गावगप्पा- अफवा- स्कॅण्डल्सना आता जागतिक स्वरूप येणार आहे!
एकेकाळी असे मानले जात होते की, माध्यमप्रसारामुळे लोकशाही समर्थ व्हायला मदत होईल आणि विविध साहित्य-कलांचा वैश्विक प्रसार होऊन जग अधिक सांस्कृतिक समृद्धी प्राप्त करू शकेल. प्रत्यक्षात मात्र माध्यमांमार्फत तंटेबखेडे, बेदिली, अशांतता, गुन्हेगारी, जातीय-धर्मीय कटुता आणि समाजजीवनात अरेरावी आणि बेदरकारी वाढताना आपण पाहत आहोत.
माध्यमांवर नियंत्रण करणेही आता पूर्णत: अशक्य होत आहे आणि अधिकाधिक अशक्य होत जाणार आहे. भविष्यकाळात कोणताही हुकूमशहा, कोणतेही सरकार, कोणतेही प्रशासन, कोणतीही न्यायव्यवस्था माध्यमांवर नियंत्रण करू शकणार नाही. त्याचप्रमाणे सर्व माध्यमसंस्था एकत्रितपणे (आणि नि:पक्षपातीपणाने) ‘सेल्फ रेग्युलेशन’ ऊर्फ आत्मनियंत्रण करायला तयार होणार नाहीत. याचं एक कारण म्हणजे- माध्यम बाजारपेठेतील स्पर्धा! प्रत्येक चॅनलचे मुख्य उद्दिष्ट स्पध्रेत टिकून प्रतिस्पध्र्यापेक्षा अधिक नफा मिळवणे हे आहे/ असते. त्यामुळे नियंत्रणाचे निकष स्वीकारले तरी सर्व चॅनल्स ते निकष दीर्घकाळ पाळण्याची शक्यता अजिबातच नाही. दुसरे कारण आहे- तंत्रज्ञानाचा विलक्षण वेगाने होणारा विकास!
पूर्वी प्रसारमाध्यमांना ‘मास मीडिया’ म्हणजे ‘लोकमाध्यम’ म्हणून संबोधले जात असे. वस्तुत: त्यात ‘लोकां’चा फारसा सहभाग नसे. रेडिओ व दूरचित्रवाणी सरकारी नियंत्रणाखाली असल्यामुळे जे सरकार सत्तेत असेल, त्याने ठरविलेले निकष हेच नियंत्रणाचे निकष होते. पुढे उपग्रह आले. खाजगी चॅनल्स आले. केबलवाले आले. डिश अ‍ॅन्टेना आल्या. मोबाइल फोन आले. या मोबाइल्सवर चॅनल्स दिसायची सोय झाली. मोबाइल फोन्सद्वारे चलत्चित्र पाठविण्याची सोय झाली. व्हिडिओकॅम अधिकाधिक स्वस्त आणि पोर्टेबल होत गेले, त्यावरील चित्र व ध्वनी अधिक स्पष्टपणे प्रसृत होऊ लागले. आणि हळूहळू प्रत्येक व्यक्ती स्वतच्या चॉइसप्रमाणे कार्यक्रम पाहू लागली. ज्याप्रमाणे ‘फोटोशॉप’मुळे मूळ छायाचित्राला सोयीनुसार बदलता येऊ लागले, त्याचप्रमाणे प्रत्येक ‘मोबाइल फोन युजर’ स्वतला पाहिजे त्याप्रमाणे कार्यक्रम आता ऑर्डर करू शकणार आहे. आज (गेल्या फक्त चार वर्षांत) ‘यू-टय़ूब’ने तर माध्यमांच्या सर्व भौगोलिक, सांस्कृतिक, कायदेशीर सीमारेषा तोडलेल्या आहेत. आणखी ‘फोर जी’ वा ‘फाइव्ह जी’च्या उत्क्रांतीनंतर प्रत्येकजण स्वतचे वर्तमानपत्र आणि स्वतचा चॅनल स्वतच्या मोबाइलवर पाहू शकेल! ‘सिटीझन जर्नालिस्ट’ या संकल्पनेमुळे तर आता प्रत्येकजण पत्रकार आणि प्रत्येकजण वाचक, तसंच प्रत्येकजण चित्रपटकार आणि प्रत्येकजण दर्शक होऊ शकणार आहे. ही अतिशयोक्ती नाही, तर लवकरच येणारी तांत्रिक वस्तुस्थिती आहे.
माहिती-माध्यमक्रांतीचा स्फोट इतका ‘विश्वव्यापी’ असेल, याची कल्पना ना विज्ञान-तंत्रज्ञान तज्ज्ञांना आली होती, ना माध्यमकर्मींना! पण यापुढच्या काळात त्या स्फोटातून निर्माण होणाऱ्या अराजकी शक्तींशी सामना करीत करीतच पुढचा प्रवास करावा लागणार आहे.
परंतु सर्व निराशाजनकच आहे, असेही नाही. याच तंत्रज्ञानाच्या विकासातून, अराजकी शक्तीतूनही नवीन निकष जन्माला येणार आहेत. लोकशाही आणि सांस्कृतिकतेलाही अधिक प्रगल्भ व्हावे लागणार आहे. त्यासाठी सुज्ञांना, विचारी लोकांना आणि विविध प्रकारच्या पत्रकारितेत काम करणाऱ्यांना नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हावे लागणार आहे!

कुमार केतकर , रविवार १८ जुलै २०१०.