गिलोटिनच्या पात्यावर..(त्रिकालवेध)

गिलोटिनच्या पात्यावर..
गिलोटिनच्या पात्यावर..बरोबर २२० वर्षांपूर्वी, म्हणजे १४ जुलै १७८९ रोजी, फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि त्यामुळे फ्रान्सचाच नव्हे तर बऱ्याच प्रमाणात जगाच्या ‘सिव्हिलायझेशन’चा चेहरा-मोहराच बदलला. त्या क्रांतीच्या या वर्षीच्या वर्धापनदिनी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मुख्य पाहुणे म्हणून हजर होते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या घोषणा घेऊन क्रांती झाली. राजेशाहीचा शिरच्छेद झाला. अवघी फ्रेंच जनता त्या क्रांतीत सामील झाली होती, असे सांगितले जाते. त्या क्रांतीचे एक प्रतीक होते गिलोटिन. धारदार पाते असलेल्या एका ‘यंत्रा’च्या चाकांवरून दोरखंड खेचला की ते पाते क्षणार्धात सुमारे ३० ते ४० फुटांवरून विलक्षण वेगाने खाली येत असे. ज्याचा शिरच्छेद करायचा त्याचे डोके यंत्राच्या खालच्या ‘उंबरठय़ावर’ ठेवलेले असे. यंत्राजवळ उभे असलेल्या शिपायाने निर्देश केल्याबरोबर तो दोर खेचला जाई. वेग आणि पात्याची धार यामुळे निमिषार्धात डोके धडापासून वेगळे होते असे. जो कुणी क्रांतीच्या विरोधात असेल त्याला असा ‘गिलोटिन’ करण्यात येत असे. (या शिरच्छेदयंत्राला गिलोटिन हे नाव ते यंत्र बनविणाऱ्या डॉक्टर गिलोटिन याच्या नावावरूनच पडले होते! आजही हाच शब्द विधिमंडळातील मागण्यांवरची चर्चा नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो!)हजारों ‘प्रतिक्रांतिकारकां’चा असा शिरच्छेद करण्यात आला. ती शिक्षा देणारे स्वत:ला स्वातंत्र्य-समतेची सर्वत्र प्रतिष्ठापना करणारे क्रांतिकारक समजत असत. परंतु त्या क्रांतिकारकांमध्ये अनेक गट होते. त्यातील काही गट एकमेकांच्या विरोधात होते. राजेशाही उलथून टाकल्यानंतर सत्तेची सूत्रे कुणी ताब्यात घ्यायची याबद्दल त्यांच्यात तीव्र संघर्ष होता. जो गट वरचढ ठरत असे तो प्रतिस्पर्धी गटाला ‘गिलोटिन’ करीत असे. अक्षरश: रक्ताचे पाट वाहिले आणि देशभर अराजक, हिंसाचार याचे थैमान सुरू झाले. ‘क्रांती’ १४ जुलै रोजी झाली खरी. पण त्यातून उद्भवलेला बेभान हैदोस पुढे १० वर्षे (१७९९ पर्यंत) चालू राहिला. फ्रान्सला काही प्रमाणात ‘स्थैर्य’ प्राप्त झाले ते नेपोलियन बोनापार्ट नावाच्या ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सत्तेवर कब्जा केला तेव्हा. पण ते ‘स्थैर्य’ही एक आभासच होता. नेपोलियनने त्या क्रांतीतील ऊर्जेचा उपयोग फ्रान्सचे साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी सुरू केला. सुमारे १५ वर्षे, म्हणजे १७९९ ते १८१५ नेपोलियनने युरोपात स्वाऱ्या करून आजुबाजूचे देश पादाक्रांत करण्याचा आणि जिंकलेल्या प्रदेशात त्याच्या अंकित राहतील अशा राजवटी प्रस्थापित करण्याचा सपाटा सुरू केला. अखेरीस ब्रिटिश, डच, बेल्जियम, प्रशियन-जर्मन (त्या काळी जर्मनी हा देश नव्हता. प्रशियात बहुसंख्य जर्मनवंशीय लोक होते.) अशा विविध प्रदेशातील फौजा व राजवटी एकत्र आल्या आणि त्यांनी नेपोलियनचा वॉटर्लू येथे दारुण पराभव केला. (वॉटर्लू हे बेल्जियमच्या दक्षिणेला १३ किलोमीटर आहे. अनेकांना वाटते की, ते इंग्लंडमध्ये आहे. विस्तारित लंडन महानगरात वॉटर्लू हे एक रेल्वे स्टेशन/परगणे आहे इतकेच.) त्यानंतर म्हणजे १८१५ नंतर नेपोलियनचे युरोपियन साम्राज्य लयाला गेले. विशेष म्हणजे सम्राटाच्या या पराभवानंतर आणि त्याला हेलेना नावाच्या बेटावर हद्दपार करून त्याला नजरकैदेत ठेवल्यानंतरही नेपोलियन नावाच्या दंतकथेचा दरारा युरोपभर होता. त्या नजरकैदेतच १८२१ साली हा महत्त्वाकांक्षी (पण अंतिमत: अयशस्वी) चक्रवर्ती मरण पावला. परंतु त्या घोषणेनंतर खुद्द फ्रान्समध्येही खऱ्या अर्थाने आजही स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या संकल्पना प्रस्थापित झालेल्या नाहीत- युरोपातही बहुतेक ठिकाणी नाहीत. संकल्पनांचा प्रभाव मात्र टिकला. युरोपात (मुख्यत: इंग्लंडमध्ये) कामगारवर्गाच्या चळवळींमागची प्रेरणा त्या संकल्पनांमध्ये होती. युरोपातील या कामगार चळवळींच्या आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे वाढणाऱ्या भांडवलशाहीच्या पाश्र्वभूमीवर कार्ल मार्क्‍सचे तत्त्वज्ञान आकार घेऊ लागले. फ्रेंच राज्यक्रांतीचा २२० वा वर्धापन दिन आणि ‘स्वातंत्र्य- समता- बंधुत्वा’च्या वैचारिक पर्वाची तेव्हा झालेली पहाट, हा सर्व इतिहास येथे सांगण्याचे कारण मात्र वेगळे आहे. गेल्या आठवडय़ात लेझेक कोलाकोवस्की या विचारवंताचे वयाच्या ८१ व्या वर्षी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ज्ञान-परिसरात निधन झाले. कोलाकोवस्कींनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, आदर्श प्रशासन अशा संकल्पनांवर भाष्य करताना म्हटले की, कम्युनिस्ट विचारसरणी कितीही आदर्श व आकर्षक वाटली तरी तिच्यातील अंतर्विरोध इतका तीव्र आहे की तो सुटणे शक्य नाही.‘सिव्हिलायझेशन’च्या आधुनिक पर्वाला त्या संकल्पनांनी २२० वर्षांपूर्वी जन्म दिलेला असला आणि अक्षरश: लाखो लेखक, कवी, विचारवंत, वैज्ञानिक, राजकारणी मार्क्‍सवादाने भारून गेलेले असले तरी जोपर्यंत त्या (किंवा कोणत्याही) र्सवकष भासणाऱ्या तत्त्वज्ञानात अंतर्विरोध आहेत तोपर्यंत त्या विचारसरणीला अभिप्रेत असलेला ‘नवा समाज’ आणि ‘नवा माणूस’ घडणे शक्य नाही. कोलाकोवस्कींना आव्हान देणे सोपे नव्हते. ते स्वत: वयाच्या २० व्या वर्षी कम्युनिस्ट झाले. रशियात १९१७ साली झालेल्या क्रांतीनंतर लेनिन हे विश्वव्यापी ‘आयकॉन’ झाले. तोपर्यंतचे सर्व धर्म, विचारसरणी, परंपरा यांना मुळापासून आव्हान मिळाले आणि ‘प्रश्न केवळ या जगाचा अर्थ लावायचा नाही तर जग बदलण्याचा आहे’ हे मार्क्‍सवादी वचन सर्व राजकारण-समाजकारणात वारंवार उद्धृत केले जाऊ लागले. पोलंडमध्ये १९२७ साली जन्माला आलेल्या कोलाकोवस्कींवरही त्या विचाराचा प्रभाव पडला होता.कोलाकोवस्की हे अभिजात विद्वेषी कम्युनिस्ट नव्हते. परंतु ज्या कम्युनिस्ट पक्षांनी त्या तत्त्वज्ञानाला धर्मपीठ बनवायचा प्रयत्न केला आणि कार्यकर्ते म्हणजे धर्मप्रसारक करून टाकले, त्याच्या विरोधात कोलाकोवस्कींनी प्रथम वैचारिक बंड केले. स्वत: कार्ल मार्क्‍स आणि एंगल्स यांनीच वैचारिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेला असल्यामुळे, त्यांच्या नावाने चालणाऱ्या पक्षांमध्ये स्वातंत्र्याचा संकोच झालेला पाहून कोलाकोवस्की यांनी एक प्रबंध १९५६ साली लिहिला. त्याच वर्षी खुद्द रशियातच क्रुश्चेव यांनी स्टॅलिनवादाच्या विरोधात आघाडी उघडली होती. त्यामुळे जगभरच्या कम्युनिस्टांमध्ये एक मोकळे वातावरण तयार होऊ लागले होते. मार्क्‍सवादाचे तत्त्वज्ञान, कम्युनिस्ट पक्षाची रचना आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते- नेत्यांचा व्यवहार या तीन गोष्टी एकमेकांशी निगडित असूनही वेगवेगळ्या आहेत. कोलाकोवस्कींनी मार्क्‍सवादात अंतर्भूत असलेले विचारस्वातंत्र्य आणि मानवतावाद प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचे प्रयत्न सुरू करताच पोलीश ‘कम्युनिस्ट धर्मपीठाने’ त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.कोलाकोवस्कींनी अनेक तात्विक व वैचारिक प्रश्न उपस्थित केले होते. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न होता भूतकाळ-वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांच्यातील चिरंतन धाग्याचा. मार्क्‍सवादी-लेनिनवादी, म्हणजेच पर्यायाने कर्मठ कम्युनिस्ट असे मानतात, की इतिहासाचे काही निश्चित नियम आहेत. त्यानुसारच इतिहास घडतो. (हिस्टोरिकल डिटरमिनिझम्) कोलाकोवस्कींना हे ऐतिहासिकतेचे प्रमेय मान्य नव्हते. त्याचप्रमाणे कोलाकोवस्की यांच्या मते स्वातंत्र्य आणि समता एकत्रितपणे ‘अंमलात’ आणणे अशक्य आहे. समता हे सामाजिक-सांस्कृतिक मूल्य आपसूक रुजविता येणार नाही. म्हणजेच समता प्रस्थापित करण्यासाठी समाजातील अनेक वर्गाचा व थरांचा स्वातंत्र्य-संकोच करावा लागेल. कम्युनिस्टांना अभिप्रेत असलेली कामगारवर्गीय हुकूमशाही म्हणजे तशी समता रुजविण्यासाठी अंमलात आणलेली प्रशासनव्यवस्था. ही व्यवस्था नोकरशाही, पोलीस / लष्कर आणि सर्व स्तरांवर असलेली पक्षयंत्रणा. मिलोवान जिलास या अशाच स्वतंत्र विचाराच्या मार्क्‍सवादी पण उदारमतप्रणालीच्या भाष्यकाराने या वर्गाला ‘द न्यू क्लास’ असे संबोधले होते. सत्तेची सूत्रे या वर्गाच्या हातात गेल्यावर कार्ल मार्क्‍सला अभिप्रेत असलेली समाजव्यवस्था निर्माण होणे शक्य नाही. कारण या वर्गाचे स्वत:चे हितसंबंध आणि सत्तेतील लाभार्थ तयार होतात. (हितसंबंध मोडणे किती कठीण असते हे गेल्या ४० वर्षांत आपण दोनदा पाहिले. माओंनी चीनमध्ये या ‘न्यूक्लास’च्या विरोधातच सांस्कृतिक क्रांतीचे आवाहन केले होते. त्या तथाकथित सांस्कृतिक बंडाचे काही महिन्यातच देशव्यापी अराजकात रुपांतर झाले. ती क्रांती मागे घेतली गेली. माओ १९७६ साली मरण पावल्यानंतर सांस्कृतिक क्रांतीने खलनायक ठरविलेले डेंग यांच्याकडे सत्तेची सूत्रे आली. (तीसुद्धा १९७६ ते १९७८ ही दोन वर्षे तीव्र सत्तासंघर्ष झाल्यावर) त्यांनी सुरू केलेला ‘लाल भांडवलशाही’चा प्रयोग सध्या शासकीय-पक्षीय हुकूमशाहीच्या माध्यमातून चीनमध्ये चालू आहे.सोव्हिएत युनियनमध्ये गोर्बाचेव्ह यांनी ‘ग्लासनोस्त’ म्हणजे लोकशाही आणि ‘पेरेस्ट्रॉयका’ म्हणजे पुनर्रचना १९८६-८७ साली रुजवायचा प्रयत्न केला. परिणामी १९९१ साली सोव्हिएत युनियनचे विघटन होऊन त्यातून १५ देश निर्माण झाले आणि कम्युनिस्ट राजवट संपली.स्वातंत्र्य म्हणजे फक्त निवडणुका नव्हेत हे जितके खरे तितकेच हेही खरे, की समता प्रस्थापित करण्यासाठी जर दमनयंत्रणा वापरावी लागली तर सर्वच स्वातंत्र्याचा संकोच होतो.कोलाकोवस्कींच्या मांडणीनुसार कम्युनिस्ट प्रशासकीय यंत्रणेत स्वातंत्र्य व लोकशाही संभवतच नाही. मार्क्‍स व लेनिन यांनी अनेक वेळा, फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेल्या ‘स्वातंत्र्य-समता-बंधुत्व’ या संकल्पना व मूल्यांना तात्विक स्थान दिले आहे; पण व्यवहारात आला तो स्टॅलिनवाद आणि बलदंड कम्युनिस्ट नोकरशाही. शिवाय फ्रेंच राज्यक्रांतीने ती मूल्य रुजविली नाहीतच. त्या क्रांतीने जन्माला घातला ‘गिलोटिन’वाद. त्याची परिणती झाली नेपोलियनच्या हुकूमशाहीत आणि फ्रान्सच्या साम्राज्यवादात.रशियात भांडवलशाहीची मुळे रुजण्याअगोदरच साम्यवादी क्रांती झाली आणि चीनमधली क्रांती तर मुख्यत: शेतकरी क्रांतीच होती. म्हणजेच मार्क्‍स-लेनिनप्रणीत इतिहासाचे प्रमेय चूक ठरले. सोव्हिएत युनियनमधील व्यवस्था लयाला गेल्यावर अधिक प्रगल्भ समाज व प्रशासन निर्माण होण्याऐवजी तेथेही ‘लुटारू भांडवलशाही’ आली. कोलाकोवस्कींच्या म्हणण्याप्रमाणे इतिहासाला नियम असूच शकत नाहीत- ते आपण केलेले इतिहासावरचे कलम आहे. आपण भविष्य पूर्णपणे ठरवू शकत नाही. कारण भविष्याला अस्तित्वच नाही. त्यामुळे ‘फ्युचरॉलॉजी’ हे एक अमूर्ततेचे ‘त्रिकालवेधी’ निरुपण आहे!कोलाकोवस्की यांच्याच शब्दात..“Futurology, on my definition, is a very serious science whose subject is not only nonexistent but necessarily non-existent: for the future does not exist and never will. We would not find this worrying if it did not immediately bring to our attention an analogous but more terrifting insight: namely, that the past does not exist either. The past by definition is an ocean of events that once happened; and those events are either retained in our memory, that is to say they exist only as part of our psychological reality, or reconstructed by us on the basis of our present experience- and it is only this present experience, our present reconstruction of the past, that is real, not the past as such. In other words, the entire realm of the past exists only as a portion of our (or strictly speaking, my) consciousness; the past in itself is nothing.”कुमार केतकर

1 comment:

  1. sir....hats off....great.....and thanks for such types of historical references ....

    ReplyDelete