शब्दावाचुनि कळले सारे.?

जगात कुठेही जन्माला आलेले लहान मूल ‘एकाच भाषेत’ रडते. पहिले जवळजवळ सहा महिने कोणतेही लहान मूल जरी ‘बोलले’ तरी ‘बा-बा-बा’ किंवा ‘मा-मा-मा’ वा तत्सम एकाक्षरी ध्वनीद्वारे बोलते. मग ते मूल आफ्रिकेत जन्माला आलेले असो वा अमेरिकेत, आदिवासी असो वा मुंबईतील मध्यमवर्गात जन्माला आलेले, हिंदू असो वा मुस्लिम, मुलगा व मुलगी, गोरे वा काळे- जन्माला आल्यानंतर पहिले सहा-सात महिने ‘बा-बा-बा’ वा ‘मा-मा-मा’ वा ‘डा-डा-डा’ या पलिकडे त्यांची ‘भाषा’ जात नाही. म्हणजे निदान तेवढा काळ आणि त्या वयाच्या मुलांची जागतिक भाषा एकच असते!लहान मुलं आपल्या आई-वडिलांशी किंवा जो/जी कुणी त्यांच्याभोवती असतात, त्यांच्याशी संवाद मात्र करत असतातच. हसून, रडून, किंचाळून, विविध प्रकारचे आवाज काढून ते काही ना काहीतरी सांगत असतात, मागत असतात, तक्रार करीत असतात, रागावत असतात वा आनंद व्यक्त करीत असतात. डेस्मॉन्ड मॉरिस यांनी त्यांच्या ‘बेबीवॉचिंग’ या संशोधन-निरीक्षण ग्रंथात म्हटल्याप्रमाणे लहान मुलांच्या रडण्याचे ‘सूर’ व ‘ताल’ तसेच तीव्रता व क्षीणता यावरूनही त्यांना काय पाहिजे, नको हे कळते. किंबहुना कोणतेही शिक्षण नसताना जगातल्या प्रत्येक आईला आपल्या त्या मुलाच्या सर्व ध्वनींचे व हावभावांचे अर्थ कळतात. शब्दांपलिकडल्या त्या संवादाला भाषा असतेच. (परंतु ती वा तशी भाषा एकूणच प्राणीविश्वात आहे. ‘नॅशनल जीओग्राफिक’, ‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’ वा ‘डिस्कव्हरी’ हे चॅनल्स पाहणाऱ्यांना हे माहीत आहे की, वाघ-सिंह, ससा-कासव किंवा अगदी चिमणी, कावळे वा घार, गरुड असे सर्व प्राणी-पक्षी आपापल्या पिलांना व बछडय़ांना आवश्यक ते सर्व ‘शिक्षण’ देतात. अगदी घरटे कसे बांधायचे, येथपासून ते शिकार कशी करायची, येथपर्यंत! म्हणजेच त्यांच्यातही ‘संवाद’ असतो! पण ज्याला आपण शब्दरुप, भाषा म्हणतो, ती फक्त माणूस नावाच्या प्राण्यालाच अवगत आहे.या ‘भाषे’चा म्हणजे विशिष्ट भाषेचा नव्हे, शोध कुणा वैज्ञानिकाने वा तत्त्वचिंतकाने लावलेला नाही. जगात नक्की किती भाषा व बोली आहेत, २७०० की तीन हजार की सहा हजार याबद्दल असलेले मतभेद हे भाषा, लिपी, बोली, व्याकरण, शुद्धलेखन यासंबंधातील आहेत. बी.बी.सी.च्या अभ्यासानुसार, २७०० आणि इतर बऱ्याच भाषातज्ज्ञांच्या संशोधनानुसार- सहा हजार! पण कुणीही भाषांची संख्या सहा हजारांवर असल्याचे म्हटलेले नाही. जगाची लोकसंख्या सुमारे ६२० कोटी. परंतु म्हणून त्याची सरासरी काढता येणार नाही. कारण चिनी भाषा बोलणाऱ्यांची (सर्व फरक व बोली विचारात घेऊन) संख्या जगात सुमारे १३० कोटी आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ एक-चतुर्थाश. इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांची संख्या ४० कोटींच्या आसपास, स्पॅनिश सुमारे ३० कोटी, हिंदी २५ कोटी, अरेबिक २० कोटी, रशियन १६ कोटी, पोर्तुगीज १४ कोटी, जपानी १२ कोटी, जर्मन ११ कोटी आणि आपली मराठी १० कोटी! (हे आकडे जगातील लोकसंख्या डेटाबेसवरून अपडेट करून घेतलेले आहेत. त्यामुळे त्यात थोडाफार फरक असू शकतो- पण थोडाफारच.)बहुतेक भारतीय भाषकांची संख्या युरोपातील अनेक भाषा बोलणाऱ्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. उदाहरणार्थ, इटालियन सहा कोटी, तर तामिळ सात कोटी. फ्रेंच आठ कोटी तर बंगाली (बांगला देश धरून) सुमारे २० कोटी!केवळ भाषा हा निकष मानून आणि लोकसंख्येच्या आधारे आपल्या देशाचा विचार केला तर भारत हा देश खरोखरच अगाध आहे आणि अजूनही एकत्व टिकवून आहे! मुद्दा हा की, जन्माला आलेल्या मुलांची जागतिक भाषा- निदान पहिले सहा-सात महिने एकच असते. काही भाषासंशोधक असे मानतात की, मूल जन्माला येतानाच विशिष्ट भाषेचा ‘प्रोग्राम’ ऊर्फ ‘आज्ञावली’ घेऊन येते. परंतु त्या भाषेचा शब्दरूप उच्चार, अर्थपूर्ण वाक्यरचना आणि संवाद या गोष्टी विकसित आणि उत्क्रांत होत जातात. स्टीव्हन पिंकर हा सध्या जगातला एक प्रकांड भाषातज्ज्ञ, संशोधक आणि मेंदू व कॉन्शियसनेस या विषयावर प्रयोग व चिंतन करणआरा विद्वान म्हणून ओळखला जातो. मॅसेच्युसेट्स विद्यापीठातील या प्राध्यापकाने ‘द लँग्वेज इन्स्टिक्ट- हाऊ द माइंड क्रिएटस लँग्वेज’ हा ग्रंथ लिहून एकच खळबळ माजवून दिली होती.मूल साधारणपणे वर्षांचे झाले की ते एकाक्षरी ध्वनीसंवादाच्या पुढे जाऊ शकते. (जी मुले जन्मत:च मुकी व कर्णबधीर असतात, त्यांचा संवाद मात्र हातवारे, हावभाव, वस्तू वा खेळणी इत्यादीच्या मदतीने होऊ लागतो आणि पुढे मुख्यत: त्यांची संवादभाषा तीच राहते. आता जगात त्या भाषेलाही एक स्वतंत्र ‘हावभावाचे व्याकरण’ वा संदेश पद्धती दिली जात आहे.)मूल वर्षांचे होते तेव्हा त्याला त्या ध्वनींमधून शब्द तयार होतात, ते जाणवू लागते. ‘बेबी, इकडे बघ. मी कोण आहे?- आई! आणि हे कोण? बाबा- बा बा!’ या संवादाला शब्द-भाषारूप देण्यासाठी इतरही बरेच हावभाव करून, टाळ्या वाजवून मुलाचे लक्ष वेधून घ्यावे लागते. त्या मुलाला कळतात ते विशिष्ट रुपातून येणारे ध्वनी. त्याला ‘इकडे बघ’ हे हावभावावरून, ‘हे कोण?-बाबा’ हे अंगुलीनिर्देश केल्यामुळे समजते. त्यापैकी कोणत्याच शब्दाचा अर्थ जरी त्या मुलाला कळला नाही तरी त्यातील ‘भाव’ समजतो. या लोकांच्या सहवासात आपण सुरक्षित आहोत, आपल्याला दूध-पाणी वगैरे मिळते, आपण रडलो, ओरडलो तर हीच माणसे आपल्याकडे पाहतात, जवळ घेतात- या सर्व ध्वनी, स्पर्श, चव, गंध, नजर यांच्या मदतीने शब्द, भाव, अर्थ आणि संदर्भ त्या मुलाला लागतात. खऱ्या अर्थाने शब्दरूप- अर्थपूर्ण भाषेचा जन्म तेव्हा-म्हणजे मूल दीड-दोन वर्षांचे झाल्यानंतर होतो, असे म्हटले तरी चालेल.स्टीव्हन पिंकर तर म्हणतात की, वर्ष-दीड वर्षांच्या आतले मूल आणि घरात पाळलेला कुत्रा यांची संवाद क्षमता साधारणपणे एकाच प्रकारची व गुणवत्तेची असते. आपण जेव्हा कुत्र्याला- ‘टॉमी, उठ तिथून. जा तिकडे. तिकडे जा. जा बघू’, असे म्हणतो तेव्हा त्याला सरावाने व हावभावाने इतकेच कळते की, आपल्याला ‘टॉमी’ म्हणून संबोधतात आणि उरलेल्या शब्दांचा अर्थ टोनवरून व हावभावांवरून तो ओळखतो. शब्द, भाषा न समजताही भाव, भावना हे सर्व हावभावांवरून अतिशय उत्कटतेने कुत्रा, मांजर, गाय, घोडा, हत्ती, इतकेच काय- वाघ, सिंह आणि पक्ष्यांनाही कळते.परंतु त्यांच्याबरोबरच्या संवादातून भाषा जन्माला येत नाही, संवादक्षमता वाढत नाही, विचार तयार होत नाहीत, आजूबाजूच्या परिस्थितीचे र्सवकष भान येत नाही. माणूस (अशिक्षित माणूससुद्धा!) भाषारूप संवादक्षमता प्राप्त झाली की मानसिक उत्क्रांतीच्या एकदम वरच्या टप्प्यावर ‘क्वान्टम जंप’ घेऊन पोचतो.माणसाला शब्द-भाषा क्षमता प्राप्त झाली नसती तर आपल्यात आणि इतर प्राणीसृष्टीत फारसा फरक पडला नसता. आपण सर्व ‘टारझन’ राहिलो असतो! काही जरा ‘हुशार टारझन’ आणि काही ‘ढ टारझन’ इतकाच काय तो फरक!एकूण जीवसृष्टी कशी उत्क्रांत झाली, याचा शोध माणसाने घेतला. अगदी १० लाख वर्षांपूर्वीचे, ५० लाख वा एक कोटी वर्षांपूर्वीचेही अवशेष, हाडे वा प्राचीन ‘फॉसिल्स’ वा बर्फात थिजलेले ठसे सापडले व त्याआधारे जीवसृष्टीचा इतिहास आपण सांगू शकलो. उत्क्रांतीचा सिद्धांत सांगताना डार्विनने विविध प्राणिमात्रांचा अभ्यास केला. ‘माणूस’ हा टप्पा माणसाने केव्हा गाठला, याचेही कालमापन आपण आज बऱ्यापैकी अचूकपणे करू शकलो आहोत.फांद्यांपासून, दगडांपासून, हाडांपासून बनविलेली स्वसंरक्षणाची अणकुचीदार शस्त्रे, अगदी प्राचीन भांडी-कुंडी अशा गोष्टी शोधून, इतकेच काय, जुन्या कवटय़ा, हाडांचे सापळे तपासून माणसाचे ‘वय’ (आयुष्यमान नाही, तर माणूस जन्माला आल्यापासूनचे आपल्या मानववंशाचे वय) आपण ठरवू शकलो आहोत.पण ध्वनीविशेषांची मर्यादा ओलांडून माणूस पहिले-वहिले मोडके-तोडके शब्द कधी वाणीबद्ध करू लागला, त्यातून शब्दसंकुल कसे करू लागला, वाक्यरचना आणि शब्दांची संवादी योजना करू करू लागला, याबद्दलचे संशोधन अजून बरेच प्राथमिक अवस्थेत आहे. जुने हाडांचे सापळे वा कवटय़ा सापडू शकतात, पण जुने शब्द कसे सापडणार? ते तर केव्हाच- म्हणजे बोलता बोलताच हवेत विरून जात होते. (शब्द बापुडे केवळ वारा!) त्यामुळे प्राचीन माणूस बोलायला लागल्यापासून ते त्या भाषेला संकेत संवादाचे रुप प्राप्त होईपर्यंत नक्की किती वर्षे गेली असावीत, हे अजूनतरी निश्चितपणे सांगता आलेले नाही.शिवाय शब्दांची वा भाषेची आणखीही एक भानगड आहे. आपण जे बोलतो आहोत त्या शब्दांचे, ध्वनींचे, उच्चारांचे नेमके तेच अर्थ ऐकणाऱ्याला समजले तर संवादी भाषेचा जन्म होतो.समजा, एक अतिप्राचीन माणूस त्याच्या कळपातील दुसऱ्या माणसाला असे सांगत असेल की, ‘अजून काही काळ चालल्यानंतर तेथे जलाशय आहे. तेथे आपण पाणी प्यायला जाऊ या.’ तर ऐकणाऱ्याला त्या शब्दध्वनींमधून किमान हे कळायला हवे की, ‘पाणी’ ‘जवळच’ ‘एका जलाशयात’ आहे.अगदी सुरुवातीला निर्माण झालेले शब्द असे गरजेतून आलेलेच असणार. खाण्या-पिण्याची, सुरक्षेची, हवा-पाण्याची, अगदी आवश्यक व प्राथमिक संवादी गरज भागविण्यापुरतीची ती शब्दयोजना असणार.बहुतेक शरीरावश्यक अभ्यासक सांगतात की, माणसाचा घसा, जीभ, पडजीभ, दात, ओठ या गोष्टी बोलण्यासाठी नव्हे, तर शरीरावश्यक गरजा भागविण्यासाठी (इतर प्राण्यांप्रमाणे) निसर्गाने दिल्या होत्या. ज्याप्रमाणे वानरावस्थेतला पहिला माणूस चार पायांवर चालायचा आणि आरोळ्या ठोकायचा! पण तो निसर्गनियम तोडून माणूस दोन पायांवर चालायला लागला, अंगठा व चार बोटे एकत्र आणून मूठ वळवू लागला आणि त्याचे भाग्य फळफळले. त्याचप्रमाणे घसा, जीभ, दात इत्यादी मौखिक गोष्टींचा उपयोग करून तो ध्वनीच्या पलिकडे जाऊन शब्द बनवू लागला.वर म्हटल्याप्रमाणे उत्क्रांतीच्या टप्प्यातील ही ‘क्वान्टम जंप’ होती. त्या शब्दातून भाषा निर्माण व्हायला आणखी काही हजार वा लाख वर्षे गेली. त्या भाषेला चित्रलिपी मिळाली फक्त २२ हजार वर्षांपूर्वी! परंतु तेव्हाही संवाद-भाषा तितकी उत्क्रांत झालेली नव्हती.भाषातज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, संवाद-शब्द-भाषा- लिपी आणि त्यांचे अर्थ व संदर्भ हा सगळा खेळ जास्तीत जास्त पाच-सात हजार वर्षांचा आहे. काही कट्टरपंथी ज्यू म्हणतात, त्यांची हिब्रू भाषा सर्वात प्राचीन- सात-आठ वर्षांची! काही आग्रही व अभिमानी भारतीय म्हणतात, संस्कृत त्याहूनही जुनी! तर काही चिनी अस्मितावादी म्हणतात, त्यांची भाषा १५ हजार वर्षे वयाची आहे. हे सर्व ‘भाषिक’ वाद चालूच राहतील. संशोधनाला अस्मितेचे परिमाण लाभले की असे होणे अपरिहार्य आहे.पण अशा सुमारे सहा हजार अस्मिता आज जगात आहेत. या सर्व सहा हजार भाषांमध्ये कवी कविता करीत आहेत. लोक एकमेकांशी बोलत आहेत. भांडत आहेत. आता मोबाइलवरून आणि सात समुद्र ओलांडून ‘टेलि-कॉन्फरन्स’ करीत आहेत, टीव्हीवरून ६२० कोटी लोकांपर्यंत सर्व प्रकारच्या घटना, बातम्या पोचवायचा प्रयत्न करीत आहेत. (अजून सर्वाकडे टीव्ही वा मोबाइल पोचलेला नाही; पण पुढील ३०-४० वर्षांत पोचणार आहे.)भाषेचा आणि भाषांचा हा वैश्विक महाकोलाहल समजून घ्यायचा असेल तर निदान एक साधी गोष्ट ध्यानात हवी- ती ही की, जन्माला आलेली जगातील सर्व मुले पहिले वर्ष- सहा महिने एकाच भाषेत रडतात आणि बोलतात. त्यांच्यात भाषिक, सांस्कृतिक संघर्ष होत नाहीत. ती मुले मोठी झाल्यावरच बिघडतात!
कुमार केतकर

किती शब्द बनवू गा - अब्द अब्द मनी येते।।

मोबाइल फोन्स आल्यापासून १० वर्षांत लोकांची बडबड किमान १०० पटींनी वाढली आहे। पुढल्या २५-३० वर्षांत जगातील, त्यावेळच्या १० अब्ज लोकांपैकी सुमारे सहा अब्ज लोकांकडे मोबाइल फोन असतील. अर्थातच आणखी काही वर्षांनी त्या मोबाइलमध्येच टेलिव्हिजन, कॉम्प्युटर्स, ऑफिस, वर्तमानपत्र, करमणुकीचे कार्यक्रम, सर्व मालिका, हजारो चित्रपट, बँकिंग सर्व प्रकारचे अर्थव्यवहार असे बरेच काही असेल.मोबाइल फोनमध्ये राहण्याची व्यवस्था करता येणार नाही आणि मोबाइलमधून कार वा विमानाचा प्रवास करता येणार नाही हे खरे, पण निवासाच्या आणि प्रवासाच्या गरजाही बदललेल्या असतील. आजच वर उल्लेखिलेल्या बऱ्याच सोयी मोबाइल फोनमध्ये आहेत. पुढील २५-३० वर्षांत त्या सुमारे सहा अब्ज (६०० कोटी) लोकांना उपलब्ध होऊ शकतील. तरीही एक गोष्ट सिद्ध झालीच आहे- ती म्हणजे लोकांची एकूण बडबड १०० पटींनी वाढली आहे. मोबाइलवरून, कॉम्प्युटर चॅट्समधून वा थेट.प्रत्यक्ष वा फोनवरील संवाद/ गप्पा/ भांडणे असोत वा एसएमएस/ ट्विटर/ चॅट असो; मेल असो वा प्रदीर्घ लेख, ब्लॉग असोत वा मल्टिमीडिया कॉन्फरन्सेस्- त्या सर्वाचे मुख्य माध्यम असते भाषा. शब्द. बोली. स्वरयंत्र- नियंत्रित ध्वनी. (मुके-बहिरे बोलू व ऐकू शकत नाहीत, पण वाचू व लिहू शकतात आणि आंधळे पाहू शकत नाहीत, पण बोलू-ऐकू आणि ब्रेलद्वारे वाचूही वा लिहू शकतात- म्हणजेच त्यांचेही माध्यम शब्द-भाषा हेच असते.)यापैकी स्वरयंत्र-नियंत्रित ध्वनी अनेक प्राणी-पक्षी-सामुद्री जीव यांच्याकडे असतात. पण बोली, शब्द, भाषा आणि त्यांचे एक अर्थपूर्ण संवादी संकुल हे फक्त माणसालाच अवगत आहे. भाषाशास्त्रज्ञांच्या मते जगात एकूण २७०० ते ३५०० नोंदविल्या गेलेल्या ‘भाषा’ आहेत. काही भाषा आहेत की फक्त बोली, याबाबत वाद आहेत. (आपल्याकडे याच चालीवरचा वाद मराठी व कोकणीसंबंधीचा होता.) ज्यांना स्वायत्त असे समाज संवादाचे स्थान आहे, अशा सुमारे २० हजार बोली वापरात असाव्यात. कित्येक भाषा अनेक बोली माध्यमातून व्यक्त होतात, पण त्यांना लिपी नसते. बहुतेक भाषा संशोधक मानतात की, दर २५-३० किलोमीटर्सवर बोली, भाषेचा हेल, उच्चार यात फरक पडतो. अगदी ढोबळ उदाहरण घ्यायचे तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील कोकणी बाज वेगवेगळे आहेत, ज्याप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापुरी बाज वेगवेगळे आहेत. शिवाय ‘सदाशिवपेठी’ मराठी आणि ‘मालवणी’-कोकणी मराठीच असल्या तरी त्यांच्या अस्मिता सार्वभौम आहेत. तीच गोष्ट विदर्भात, खानदेशात, मराठवाडय़ात. अशी विविधता आणि अस्मिता जगभर सर्वत्र आहे. अर्थातच भारताइतक्या बोली, भाषा, लिप्या आणि अस्मिता जगात कुठेच नाहीत. म्हणूनच भारताचे एकत्व आपल्या वैविध्यातून व्यक्त होते, असे पंडित नेहरू म्हणत असत.तर या सर्व बोली, भाषा व लिप्यांद्वारे जगभरचे सगळे लोक सतत बोलत असतात. ज्यावेळेस ते बोलत नसतात तेव्हा ते टीव्हीचे कार्यक्रम पाहात-ऐकत असतात, एसएमएस वा ट्विटरद्वारे ‘कनेक्टेड’ असतात किंवा वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके वाचत असतात. शब्दांचा इतका महास्फोट यापूर्वी कधीही झालेला नव्हता. हे सर्व सुमारे तीन हजारच्या आसपास भाषांमध्ये अखंड चालू आहे.शब्द हे संवादाचे, भावनाविष्काराचे, विचाराचे तसेच इतिहास व भविष्य यांना जोडणारे माध्यम आहे- परंतु तितकेच ते विसंवादाचे, गैरसमजुतीचे, संघर्षांचे व युद्धाचेही माध्यम आहे. गेल्याच महिन्यात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानबरोबर केलेल्या संयुक्त मसुद्यातील एका शब्दामुळे देशभर आणि लोकसभेत केवढा तरी गदारोळ झाला होता. इतिहासकार, पत्रकार, राजकारणी मंडळी तर इतका शब्दच्छल करतात की, अखेरीस त्यांच्या चर्चेतील आशय नष्ट होऊन शब्दच स्वतंत्रपणे आटय़ापाटय़ा खेळत बसतात.बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘पिपांत मेले ओल्या उंदिर’ या कवितेतील प्रत्येक शब्दावर (त्यातील प्रतिमा-प्रतिकांवर) ६३ वर्षांत इतके मंडन-खंडन, चिंतन-लेखन, वाद-वितंडवाद झाले आहेत की, ते पाहून शब्दांचे अचाट सामथ्र्य जसे लक्षात येते तसेच, एकच शब्द किती प्रकारचा विसंवाद घडवून आणू शकतो, हेही ध्यानात येते. (नुकतेच प्रा. एस.एस. नाडकर्णी यांनी संकलन-संपादन केलेले ‘पिपांत मेले ओल्या उंदिर’ हे उत्कृष्ट, उद्बोधक आणि उपयुक्तही पुस्तक अरुण जाखडे यांच्या ‘पद्मगंधा प्रकाशन’ने प्रसिद्ध केले आहे. शब्द आणि भाषा प्रत्येक व्यक्तीला किती अथांग भाव व विचारविश्वात नेऊ शकते, याचा एक विलक्षण साहित्य-शोधच प्रा. नाडकर्णी यांनी घेतला आहे.) तर मुद्दा आहे शब्दांचा. माणूस प्राणी बोलायला लागला (निरनिराळ्या ठिकाणी- निरनिराळ्या बोलींमधून) त्याला साधारणपणे दीड लाख वर्षे झाली, असे मानववंशशास्त्रज्ञ मानतात. (त्यांना ‘बोली’ म्हणण्यापेक्षा ‘स्वरयंत्र- नियंत्रित ध्वनी’ इतपतच स्थान होते.) त्या ध्वनींमधून संवादी-संदेशवाहक शब्द निर्माण व्हायला आणखीही बरीच वर्षे गेली असावीत. त्या शब्दांना प्राथमिक चित्रलिपीचे रूप २२ हजार वर्षांपूर्वी आले असे मानले जाते, परंतु त्या चित्रलिपीतून रीतसर अक्षरे, शब्द, स्थूल अशी वाक्यरचना हे सर्व जास्तीत जास्त पाच ते सहा हजार वर्षांपूर्वीचेच आहे.त्यावेळच्या जीवनशैलीत शब्दांचा व भाषेचा उपयोग फक्त व्यावहारिक होता. भावना, विचार, तत्त्वचिंतन, वाद, मतभेद, गैरसमज हे सर्व होण्याइतकी भाषा प्रगल्भ झालेली नव्हती. त्यामुळे एकूण शब्दसंख्याही अतिशय कमी होती- मग ते शब्द चिनी असोत वा अन्य कुठच्या तरी सिव्हिलायझेशनमधील. अंदाजानुसार ती एकूण शब्दसंख्या चार-पाचशेच्या वर नसावी.‘द स्टोरी ऑफ इंग्लिश’ या बी.बी.सी.ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, दोन हजार वर्षांपूर्वी ज्युलियस सिझर ब्रिटनमध्ये साम्राज्य विस्तारासाठी अवतरला तेव्हा इंग्रजी ही भाषाच नव्हती, परंतु बहुतेक सुशिक्षित (आणि अशिक्षितही!) मंडळींना वाटते की, ज्युलियस सिझर, क्लिओपात्रा इतकेच काय येशू ख्रिस्तही इंग्रजीतच बोलत असणार. वस्तुत: प्राचीन इटलीची भाषा लॅटिन हीच रोम प्रजासत्ताकाची, रोमन साम्राज्याची आणि रोमन कॅथलिक चर्चची आणि नंतरच्या काळात युरोपची सांस्कृतिक भाषा होती. अगदी १५०० वर्षांपूर्वीही इंग्रजी भाषा फक्त काही पाच-सात हजार माणसांना येत होती. ‘इंग्रजीचा प्रभाव’ वगैरेचा प्रश्नच नव्हता. इतकेच काय, शेक्सपियर (१५६४-१६१६) त्याची नाटके लिहीत होता तेव्हा फार तर ५० ते ७० लाख लोक इंग्रजी भाषा बोलू शकत होते. (साक्षरता कमी असल्याने या ‘इंग्लिशमेन’ पैकी बहुसंख्य लोक लिहू-वाचू शकत नव्हते, परंतु नाटके समजण्याइतकी आकलनशक्ती समाजात होती, त्यामुळेच ती नाटके टिकली. आजही शेक्सपियरची नाटके समजून घेण्यासाठी हजारो- विद्यार्थी त्यावर डॉक्टरेट करीत असतात.)इंग्रजी भाषेचा विस्तार, प्रसार आणि प्रभाव मुख्यत: चारशे वर्षांंतला आहे. म्हणजेच त्यांच्या साम्राज्य विस्ताराबरोबर तो झाला आहे. त्या साम्राज्याचा आणि भाषेचा इतका अचाट प्रभाव होता की, खुद्द ब्रिटनमधील आयरिश, स्कॉटिश आणि वेल्श भाषा इंग्रजीने निष्प्रभ करून टाकल्या. इंग्रजीचा हा प्रभाव पडण्यापूर्वी युरोपात प्रतिष्ठा होती ती फ्रेंच भाषेची. काही प्रमाणात जर्मन भाषेचीसुद्धा. फ्रेंच भाषेला तर दरबारी, उच्चभ्रू, सांस्कृतिकतेचेही स्थान होते. परंतु सतराव्या शतकापासून इंग्रजी भाषेचा प्रभाव पडू लागल्यानंतर इंग्लिश आणि फ्रेंच यांच्यात जो सांस्कृतिक-भाषिक संघर्ष व स्पर्धा सुरू झाली ती आजतागायत चालू आहे. आजही फ्रेंचांना इंग्रजी भाषेविषयी विलक्षण मत्सर व असूया आहे. दोन-तीन दशकांत रडत-खडत का होईना, फ्रेंचांनी इंग्रजी भाषेचा जागतिक दबदबा मानायला सुरुवात केली आहे आणि इंग्रजी भाषेचे वर्गही सुरू केले आहेत. (चीनही असाच स्वत:ला प्राचीन व भाषिक प्रगल्भता मानणारा देश. त्यांची भाषा तर सुमारे साडेतीन हजार वर्षे इतकी प्राचीन, चिनी साहित्यही तीन हजार वर्षांपूर्वीचे. विशेष म्हणजे किमान अडीच हजार वर्षांत त्यांच्या चित्रलिपीत फारसा फरक पडला नाही. हजारो चित्राक्षरे असल्यामुळे बऱ्यापैकी गोंधळही होता. पुढे माओंच्या काळात क्रांतीनंतर सुमारे दोन हजार चित्राक्षरे निश्चित केली गेली आणि त्या सुधारित लिपीमुळे साक्षरता आणि शिक्षण व त्यामुळे साहित्य-कलांचा प्रचंड विस्तार झाला. परंतु अशा स्वाभिमानी चीननेही आता इंग्रजी भाषेची वैश्विकता व अपरिहार्यता मान्य केली आहे. (सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिनी कॉम्रेडस्नी शेक्सपियरची नाटके, एकूण इंग्रजी साहित्य वगैरे जाळून टाकले होते. चिनी व कम्युनिस्ट या दोन्ही परंपरांवर पाश्चिमात्य आक्रमण असता कामा नये, अशी अतिरेकी भूमिका त्यामागे होती.)चिनी भाषेप्रमाणेच संस्कृत भाषाही (वेद आणि उपनिषदांची) सुमारे साडेतीन हजार वर्षांंपूर्वीची आहे आणि संस्कृत व्याकरणही सुमारे दोन हजार वर्षे शास्त्रशुद्ध स्थितीत आहे. बहुतेक भारतीय भाषा संस्कृत ही मूळ भाषा मानतात, ज्याप्रमाणे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आदी भाषा लॅटिन ही मूळ भाषा मानतात. संस्कृत आणि प्राकृत (साहित्य- तत्त्वचर्चेची संस्कृत आणि सामान्य संवादाची प्राकृत असे ढोबळ वर्णन केले जाते.)सिव्हिलायझेशन आणि भाषिक उत्क्रांती व विकास यांचा जसा जवळचा संबंध आहे, तसाच संबंध मानवी मनाचा अमर्याद वेग आणि त्याचे सतत विस्तारणारे क्षितिज यांचाही आहे. चिनी आणि संस्कृत भाषेचा प्रभाव आणि ‘सिव्हिलायझेशनल इम्पॅक्ट’ हासुद्धा पूर्वी त्यांच्या आजूबाजूच्या सर्व भागात होता, परंतु अनेक कारणांमुळे त्यांचा विस्तार पुढे थांबला. याचा अर्थ असा नव्हे की मूळ भाषिक संस्कार पुसला जातो. भाषेबद्दल तसे होत नाही, परंतु व्यवहार, राजकारण, साहित्य-कलांवरचा भाषिक प्रभाव क्षीण होत जातो. (जे सध्या सर्व भारतीय भाषांना जाणवू लागले आहे.) इंग्रजी भाषेने साम्राज्य विस्ताराबरोबरच जी विलक्षण लवचिकता दाखविली, त्यामुळे अजूनही त्यांचा प्रभाव वाढतो आहे.‘सिव्हिलायझेशन’ला जेव्हा विज्ञान-तंत्रज्ञानाचे परिमाण लाभले आणि अर्धशतकात कॉम्प्युटर, मोबाइलचे सांस्कृतिक दागिने त्याबरोबर आले, तेव्हापासून भाषेने ‘क्वाण्टम जंप’ घेतली आहे. जगातल्या सर्व भाषांचे मूळ तेच राहिले तरी आविष्कार आता झपाटय़ाने बदलत जाणार आहेत. एकाच पिढीत दोन सांस्कृतिक- भाषिक जीवनशैली तयार होणार आहेत. आणखी २५-३० वर्षांनी ज्ञानेश्वरीपासून ते मर्ढेकरांपर्यंत सर्व ‘सेफ वा लॉकर्स’मध्ये जाणार आहे. म्हणजे एका वर्गाला त्याबद्दल आस्था, आदर, श्रद्धा राहील, पण त्याचा विस्तार खुंटणार आहे.विशेष म्हणजे संवादाची भाषा मराठी वा मिंग्लिश (म्हणजे मराठी अधिक इंग्लिश) असेल, पण साहित्य-कला-विज्ञान-तंत्रज्ञान यांची इंग्रजीच होत जाईल. मीडियाला तर तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. ज्याला ‘इंटेलेक्च्युअल डिसकोर्स’ किंवा वैचारिक चर्चा म्हणतात, त्या निखळ मराठी वा बंगाली वा कन्नड भाषेत अशक्य होत जाणार आहेत. कारण तशा चर्चांसाठी आवश्यक ती ‘लिंग्वा फ्रँका’ म्हणजे परिभाषा आता इंग्रजीतच होत जाणार.साहजिकच जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या भाषेत सांगायचे तर समाजात प्रचंड भाषिक विषमता आणि पर्यायाने माणसांमध्ये ‘लिंग्विस्टिक स्किझोफ्रेनिया’ म्हणजे ‘भाषिक दुभंगलेपण’ येणार आहे. मीडियाला, विशेषत: टीव्ही चॅनल्सना या दुभंगलेपणावर मात करण्यासाठी प्रेक्षकांच्या आकलनशक्तीचा ल.सा.वि. काढत टीआरपी सांभाळावा लागणार आहे. असा लघुत्तम साधारण विभाज्य एका बाजूला आणि बहुभाषिक सुविधा व आर्थिक स्थिती असलेला महत्तम साधारण विभाज्य (म.सा.वि.) दुसऱ्या बाजूला अशी समाजाची आणि साहित्याची विभागणी होत जाणार आहे. सध्या मराठी वा कोणती भारतीय भाषा विस्तारते आहे?दोन महिन्यांपूर्वी ऑक्स्फर्ड डिक्शनरीने दहा लाखावा शब्द त्यांच्या कोशात समाविष्ट केला- तो होता ‘स्मलडॉग मिलिऑनेर’ने जगभर नेलेला ‘जय हो!’ ४०० वर्षांत इंग्रजी भाषेतील शब्दसंख्या सुमारे ५० हजारांवरून १० लाखांपर्यंत गेली आहे. फ्रेंच भाषेत एक लाख आणि जर्मन भाषेत दोन लाख शब्द आहेत.अर्थात केवळ शब्दसंख्या हेच भाषेचे वैभव नसते. शेक्सपियरच्या संपूर्ण साहित्यात फक्त १५ हजार शब्द येतात, असे शेक्सपियर संशोधक सांगतात. (तेव्हा प्रचलित असलेल्या शब्दसंख्येच्या सुमारे एक तृतीयांश) परंतु त्याने त्या शब्दांमधून उभे केलेले समांतर विश्व आज त्या भाषेत १० लाख शब्द झाले तरी आपला प्रभाव टिकवून आहे. म्हणजेच भाषेचे वैभव, त्यातील सौंदर्य, त्यातील विचार आणि त्याची प्रभाव टाकण्याची क्षमता केवळ शब्दसंख्येवर अवलंबून नाही. त्या त्या समाजाचा सार्वत्रिक अनुभव, त्या समाजातील व्यक्तींची झेप, समाजातील विज्ञान आणि एकूणच वैचारिकता यावर त्या त्या भाषेतील सामथ्र्य व समृद्धी अवलंबून आहे. ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, दासबोध हे चारशे ते सातशे वर्षे त्याच्या जोरावर टिकून राहिले. मर्ढेकर ६० वर्षे टिकून आहेत आणि डॉ. द.भि. कुळकर्णींना ‘अनन्यता मर्ढेकरांची’सारखा विचारसंपन्न ग्रंथ आज प्रसिद्ध करावासा वाटतो. विजया राजाध्यक्षांना त्यांचे मर्ढेकरांबद्दलचे संशोधन चालूच ठेवावेसे वाटते, यावरून त्यातील वैचारिक ताकद लक्षात येते. परंतु मुद्दा हा आहे की, ५० वर्षांत (मुख्यत: ३० वर्षांत) म्हणजे महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर मराठी साहित्य- कलासृष्टीने कोणते कळस मराठी सांस्कृतिकतेवर चढविले? त्यामुळे मोबाइल फोन्सवरती किती बडबड चालू असते आणि कॉम्प्युटर चॅट किती उत्साहाने चालतात यावरून समाजाची वैचारिकता कळणार नाही, त्यासाठी वेगळेच ‘सिव्हिलायझेशनल ट्रेण्डस्’ निर्माण करावे लागतील.

कुमार केतकर

‘यू टू स्कॉलर्स!

त्या बिचाऱ्या क्लिओपात्राचे थडगे उपसायला सुरुवात व्हायच्या आतच आता काही इतिहास संशोधकांची नजर शेक्सपियरच्या समकालिनांच्या ‘समाधीं’कडे लागली आहे. क्लिओपात्राचा मृत्यू २०३८ वर्षांपूर्वीचा. तिच्या मृत्यूबद्दलचे गूढ आहे, ते ती कशामुळे मरण पावली याबद्दलचे. खून की आत्महत्या? तिने स्वत:ला नागदंश करून घेतला, की विष प्राशन केले? आणि अर्थातच ती एक मदनिका होती, की सर्वसामान्य रूपाची राणी- याचा शोध ते इतिहासकार घेणार आहेत. शेक्सपियरबद्दलची इतिहासकारांची ‘डिटेक्टिवगिरी’ वेगळ्या स्वरूपाची आहे. गेली शे-दोनशे वर्षे काही साहित्य-इतिहास संशोधक असे मानत आले आहेत, की अवघ्या जगावर इतका दीर्घकाळ प्रभाव टाकणारी ती नाटके विल्यम शेक्सपियरची नाहीतच! ती आहेत सर फ्रॅन्सिस बेकनची. सर फ्रॅन्सिस हे तत्कालीन उच्चकुळातले आणि समाजातील लब्धप्रतिष्ठित; परंतु बऱ्याच संशोधनानंतर हा दावा खोटा ठरला. तरीही संशयात्मे होतेच. त्यांच्यापैकी काही मंडळींनी असे शोधप्रबंध मांडले, की शेक्सपियरच्या नाटक व कवितांमध्ये जी वृक्षांची व फुलांची नावे येतात, ती त्याच्या वास्तव्याच्या परिसरात नव्हतीच. मग त्यावर बराच खल झाला आणि शेक्सपियरच्या घराचा पत्ता ‘चुकीचा’ नोंदविला गेल्यामुळे हा घोळ झाला, असे सिद्ध करण्यात आले; पण नाटके शेक्सपियरचीच असल्याचा निर्वाळा देण्यात आला. आजही स्ट्रॅटफोर्ड या शेक्सपियरच्या गावी संशोधन चालूच असते. ते गाव म्हणजे आता जागतिक पर्यटकांचे एक सर्वात महत्त्वाचे ठिकाण आणि साहित्यिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. अवघे गाव हेच ‘शेक्सपियर म्युझियम’ आहे आणि ब्रिटिश सरकारला तेथे येणाऱ्या पर्यटकांकडून लक्षावधी पौण्डांचे उत्पन्न होते. शेक्सपियर ज्या ‘स्ट्रॅटफोर्ड ग्रामर स्कूल’मध्ये गेला ती शाळा, त्याने ज्या नाटय़गृहात त्याचे पहिले नाटक केले ती जागा, त्याने ज्या नाटक कंपनीसाठी काम केले व जेथे सर्वाधिक प्रयोग केले ते थिएटर हे सर्व व इतर बरेच काही अतिशय व्यवस्थितपणे जपून ठेवले आहे. त्या नाटय़गृहात आजही दररोज शेक्सपियरचे एक तरी नाटक चालू असतेच. शेक्सपियरच्या ‘अभिनय परंपरे’त वाढलेले हजारो नट स्ट्रॅटफोर्ड, लंडनने जागतिक रंगभूमीवर आणले आहेत, हॉलीवूडला ‘पुरविले’ आहेत. पीटर ओदूल असो वा लॉरेन्स ऑलिव्हिया- कितीतरी.खरे म्हणजे ती नाटके म्हणजे इतक्या थोर कलाकृती आहेत, की त्यांचेच एक स्वतंत्र स्थान जगाच्या सांस्कृतिक जीवनात आहे. त्या नाटकांमधील पात्रे, त्यांचे स्वभाव, त्यांचे संवाद, नाटकातील प्रसंग आणि पेचप्रसंग, त्यांची वेधक कथानके हे सर्व काही वैश्विक व अजरामर असल्याचे मानले जाते.शेक्सपियरने शंभराच्या आसपास नाटके लिहिली असावीत, पण त्यापैकी ३९ पूर्ण व मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. त्याने शेकडो ‘सॉनेट्स्’ (१४ ओळींच्या ‘सुनीत’ शैलीत) आणि कित्येक कविता लिहिल्या. वयाच्या ५२ व्या वर्षी शेक्सपियर मरण पावला. (१५६४-१६१६), पण या तशा अल्पायुष्यात त्याने केलेली साहित्यनिर्मिती व तिच्याद्वारे माणसाच्या वृत्ती-प्रवृत्ती, स्वभावशैली, मनोव्यापार आणि माणसांच्या परस्पर संबंधांवर टाकलेला प्रकाश इतका विलक्षण आहे, की आजही वैज्ञानिक, न्यूरॉलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ त्याचे संदर्भ देऊनच आपले ‘प्रबंध’ मांडतात. कोणत्याही राजकारण्याने, योद्धय़ाने, सत्ताधीशाने इतका प्रभाव आणि इतका दीर्घकाळ टाकलेला नाही. जगातील भाषेत त्याची नाटके आली आहेत वा रूपांतरे झाली आहेत. त्यांच्यावर संगीतिका, नृत्यनाटिका, चित्रपट, टी. व्ही. शोज् इतकेच काय महासंगीत सभाही झाल्या आहेत.समजा, या ‘हिस्टरी-लिटरेचर डिटेक्टिवज्’च्या संशयात्म्यांनी हे सिद्ध केले, की ती नाटके शेक्सपियरची नव्हतीच मुळी, तर त्यामुळे काय होईल? शेक्सपियर वा त्याचे समकालीन कुणीही जिवंत नाही. कुणाला ‘कॉपीराइट’चे पैसे देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. अब्जावधी प्रतींवर, आजपर्यंत सर्व भाषांमध्ये छापलेले, त्याचे नाव काढून टाकता येणार नाही. लोकांच्या संभाषणातून शेक्सपियरचे नाव काढून टाकता येणार नाही. शेक्सपियरचे विश्वकीर्त स्टॅटफोर्ड गाव व तेथील म्युझियम हलविणे शक्य नाही. हे सर्व त्या संशयात्म्यांना माहीत आहे. या संशोधनाने त्या बिचाऱ्या शेक्सपियरवर काहीही परिणाम होणार नाही, जसा क्लिओपात्रावरील संशोधनानेही होणार नाही. पण संशय, ‘सत्या’चा ऐतिहासिक शोध, उत्कंठा, अथांग कुतूहल आणि जिद्द यांनी झपाटलेली माणसे असे (नस्ते!) उद्योग करीत असतातच.या संशयात्म्यांच्या संशोधक गटाला (टोळीला!) नुकतेच नवे जीवदान प्राप्त झाले आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ज्येष्ठ न्यायाधीश जॉन पॉल स्टिव्हन्स यांनी या प्रश्नाबद्दल दिलेला ‘निवाडा’ संशयात्म्यांच्या बाजूचा आहे. स्टिव्हन्स यांच्या म्हणण्यानुसार, ही नाटके शेक्सपियरने लिहिली नसावीत, असे सिद्ध करण्याइतका परिस्थितीजन्य पुरावा आहे.हा परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे काय? न्यायमूर्ती स्टिव्हन्स यांच्या म्हणण्यानुसार, शेक्सपियरचे शिक्षण प्राथमिक शाळेच्या पुढे झालेले नव्हते. महाविद्यालयीन व कला-साहित्य क्षेत्रात त्यांना काही विशेष गती असल्याचा पुरावा त्या शाळेच्या रेकॉर्ड्समध्ये नाही. आई-वडील काही साहित्यादी क्षेत्रात असल्याचे आढळलेले नाही. वडील वा नातेवाईकांपैकी कुणीही नाटकप्रेमी नव्हते. विल ऊर्फ विल्यम विशेष हुशार मुलगा असल्याचा दाखला नाही.शेक्सपियरच्या नाटकांमधून गुंतागुंतीचे कौटुंबिक संबंध, प्रेम-विरह-मत्सर-हेवा-द्वेष यांतून निर्माण होणारे त्रिकोन-पंचकोन, सत्तास्पर्धा, संघर्ष, राजकारण, इतिहास याबरोबरच तत्त्वज्ञान, मनोविश्लेषण आणि अगदी व्यापार-अर्थव्यवहार अशा सर्व गोष्टी येतात. कार्ल मार्क्‍सपासून ते निआल फग्र्युसन (सध्या गाजत असलेल्या ‘द अ‍ॅसेंट ऑफ मनी’ या पुस्तकाचे लेखक व इतिहासकार) यांच्यापर्यंत आणि सिगमण्ड फ्रॉइडसारख्या मानसशास्त्रज्ञापासून ते अ‍ॅगाथा ख्रिस्तीसारख्या रहस्य कथालेखिकांपर्यंत आणि ऑस्कर वाइल्ड-जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्यापर्यंत कुणाचेही शेक्सपियरशिवाय ‘पान’ही हलत नाही. अशी साहित्यनिर्मिती करण्याची क्षमता शेक्सपियरकडे येणे शक्य नव्हते, तसा पुरावा नाही. त्यामुळे ती नाटके त्याची नसावीत, असे दर्जेदार, व्यासंगी व प्रगल्भ साहित्य लिहू शकणारे त्या काळात व परिसरात सर फ्रॅन्सिस बेकन यांच्याप्रमाणे ख्रिस्तोफर मार्लो, फुल्क ग्रेव्हिल, एडवर्ड द विर असे काही जण होते. त्यांच्यापैकी कुणीतरी ही नाटके लिहिली असावीत. शिवाय मूळ हस्तलिखिते जवळजवळ नाहीतच. कारण त्या काळात लेखकाने थेट संवाद सांगायचे, ते नट-नटय़ांनी मुखोद्गत करायचे, प्रयोग करताना त्यात थोडेफार बदल करायचे आणि नंतर ते नाटक कुणीतरी लिहून काढायचे. (खुद्द नाटककारानेच असे नाही) आणि पुढे प्रकाशित करायचे अशी पद्धत होती. छपाईचा शोध नुकताच लागून छोटेखानी ‘छापखाने’ उभे राहू लागले होते; परंतु ‘आवृत्त्या’ काढणे वगैरे तेव्हा शक्य नव्हते. छपाईकलेचा, यंत्रांचा विकास व विस्तार मुख्यत: शेक्सपियरच्या मृत्यूनंतर झाला आहे.तर अमेरिकेतील न्यायमूर्ती स्टिव्हन्स यांच्या मते या प्रकरणावर संशोधन करणे आवश्यक असून, सत्याचा शोध घ्यायलाच हवा. नेमके याच वेळेस शेक्सपियरच्या गावातील सेण्ट मेरीज् चर्चने गावातील संबंधित अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे, की फुल्क ग्रोव्हिल या तत्कालीन प्रसिद्ध व प्रतिभावान लेखकाचे थडगे (की समाधी?) उपसण्याची परवानगी साहित्य व इतिहास संशोधकांना दिली जावी, अशी परवानगी मागण्यापूर्वी या ‘हिस्टरी-लिटररी डिटेक्टिव्ज्’च्या गटाने अत्याधुनिक रडार तंत्रज्ञान, लेझर बिम्स, विशेष संगणकीय सॉफ्टवेअर इत्यादींच्या मदतीने, फुल्क ग्रेव्हिल यांच्या थडग्यात हाडांच्या सापळ्याव्यतिरिक्त कोणत्या गोष्टी आहेत, याचा शोध घेतला आहे. त्याचप्रमाणे फुल्क ग्रेव्हिल यांचे मृत्युपत्र वा तत्सम दस्तऐवज, त्या वेळचे इतर काही पुरावे गोळा करून या संशोधकांनी असे सतर्कपणे ‘सिद्ध’ केले आहे, की ग्रेव्हिल यांच्या थडग्यात, त्यांच्याबरोबर ज्या गोष्टी पुरल्या गेल्या आहेत, त्यात ‘अ‍ॅण्टनी अ‍ॅण्ड क्लिओपात्रा’ नाटकाची तत्कालीन प्रकाशित (संहिता) प्रत व इतरही काही साहित्य आहे. ग्रेव्हिल यांनी लिहिलेल्या साहित्याचा ‘शब्दश:’ (म्हणजे खरोखरच ‘अक्षरश:’) अभ्यास करून या संशोधकांनी दाखवून दिले आहे, की या नाटकाची शैली नेमकेपणाने त्या नाटकाच्या शैलीशी जुळते. त्या थडग्यात दोन-तीन लाकडी पेटय़ा आहेत आणि त्यात ते साहित्य ठेवलेले आहे. समजा, खरोखरच, ग्रेव्हिलचे हे थडगे उपसायला तेथील चर्चने आणि तेथील ‘ग्रामपंचायती’ने परवानगी दिली आणि त्यानंतर त्या लाकडी पेटय़ांमधून (शेक्सपियरचे!) ते साहित्य हाती लागले तर तो जवळजवळ अंतिम पुरावा ठरेल आणि बिचाऱ्या शेक्सपियरच्या किर्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. परंतु अमेरिकन न्यायालयात जो ‘पुरावा’ ठेवण्यात आला आहे त्यानुसार एडवर्ड द विर यांनी ती नाटके लिहिली आहेत. (म्हणजे ग्रेव्हिल यांच्या थडग्यात लाकडी पेटय़ा सापडल्या तरी त्यात ती नाटके मिळणार नाहीत!) हे एडवर्ड ऑक्स्फर्ड विद्यापीठातील ज्येष्ठ प्राध्यापक / विद्वान म्हणून ओळखले जात. त्यांचा राज्यशास्त्र, नीतीशास्त्र, साहित्य याचा दांडगा व्यासंग होता. तो व्यासंग, नाटकांमधील प्रसंगरचना आणि साहित्यशैली यांची अचूक सांगड बसते. त्यामुळे त्यांना चारशे वर्षांनंतर का होईना ‘न्याय’ मिळायलाच हवा आणि शेक्सपियरच्या नावावर ‘खपविली’ गेलेली नाटके एडवर्ड द विर यांच्या नावावर रीतसर सुपूर्द केली जावीत! शेक्सपियरसारख्या ‘सामान्य’ कुवतीच्या, ‘अल्पशिक्षित’ आणि आर्थिकदृष्टय़ा ‘गरीब’ तसेच सांस्कृतिक वातावरण नसलेल्या कुटुंबात अशी विलक्षण सर्जनशीलता असणे नाही. अशा निष्कर्षांला जे इंग्लंड-अमेरिकेतील संशयात्मे आले आहेत, त्यांनी एक वेबसाइट सुरू केली आहे आणि त्यावर यासंबंधात जोरदार चर्चा सुरू आहे. ती वेबसाइट आहे : www.Doubtaboutwill.org याव्यतिरिक्त ‘सायण्टिफिक अमेरिकन’ या विख्यात व प्रतिष्ठित विज्ञान-मासिकात स्तंभलेखन करणाऱ्या मायकेल शर्मर याचीही एक वेबसाइट आहे. www.skeptic.com परंतु शर्मर यांच्या मते ती नाटके शेक्सपियर यांचीच आहेत. जरी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकेतील सुप्रसिद्ध दैनिकाने सर्वोच्च न्यायाधीशांना अनुकूल लेख प्रसिद्ध केलेले असले तरी शेक्सपियरचे स्थान कायद्याने व इतिहास संशोधनाने / उत्खननानंतरही अढळच राहणार आहे.शेक्सपियर यांच्या थडग्याचे संशोधन पूर्वीच झाले आहे आणि स्ट्रॅटफोर्ड या गावातील संशोधन केंद्राने तर त्यांचे घर, शेत, शाळा, खेळायची जागा, मित्रमंडळींची नावे, सहकारी अभिनेते, निर्माते अशा अनेक संदर्भानिशी शेक्सपियरची ‘बाजू’ भक्कम केली आहे. या विषयावर बरेच लेखन (प्रबंध, शोधनिबंध, पुस्तके) झालेले असले तरी ‘द केस फॉर शेक्सपियर’ या २००८ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाने सर्व प्रकरणावर शेवटचा पडदा टाकला आहे.पण संशयात्म्यांचे ‘आत्मे’ शांत झालेले नाहीत. शेक्सपियरच्याच भाषेत सांगायचे तर त्याच्या सर्जनशीलतेवर, साहित्यिक कर्तबगारीवर हा ‘अनकाइंडेस्ट कट’ आहे. त्यामुळे शेक्सपियर ऊर्फ बार्ड (राजमान्य-लोकमान्य कवी) ‘यू टू ब्रुटस्’च्या चालीवर म्हणेल, ‘यू टू स्कॉलर्स!’कुमार केतकर

क्लिओपात्रा नावाचे गूढकाव्य!


काही दिवसांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली. क्लिओपात्रा या सौंदर्यवती व सम्राज्ञीचे इजिप्तमधील अलेक्झांड्रियाजवळील असलेले थडगे आता इतिहाससंशोधक अक्षरश: उपसून काढणार आहेत. हे संशोधक, उत्खननतज्ज्ञ आणि प्राच्यविद्या अभ्यासक आपल्या सर्व आयुधांनिशी सिद्ध झाले आहेत. त्यासाठी लागणारे सर्व परवाने त्यांनी मिळविले आहेत. क्लिओपात्राभोवती असलेल्या सर्व गूढांपासून तिचे चरित्र व चारित्र्य ‘मुक्त’ करण्याचा हा प्रयत्न तसा नवा नाही; पण आजपर्यंतचे प्रयत्न हे ऐतिहासिक दस्तऐवज, इतर संदर्भ आणि तत्कालीन वस्तू वा वर्णने यावर आधारित होते. आता प्रथमच पुरातत्व अभ्यास करणारे संशोधक या उत्खनन प्रकल्पाकडे अतिशय उत्कंठेने पाहात आहेत.
क्लिओपात्रा ही मूळची इजिप्शियन, की ग्रीक, गोरी, की कृष्णवर्णीय, आफ्रिकन वंशाची, की युरोपियन, असे अनेक प्रश्न आजवर उपस्थित केले गेले आहेत. ज्युलियस सीझर आणि नंतर मार्क अ‍ॅन्टनी या रोमन सम्राटांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी क्लिओपात्रा ही इजिप्शियन / ग्रीक मदनिका होती, की दिसायला सामान्य पण कर्तृत्वाने तेजस्वी होती?

क्लिओपात्राच्या व्यक्तिमत्वावर व सौंदर्य-कथांवर अनेक लेखक, कवी, नाटककारांनी कल्पनाविलास केला आहे. तिचे नाक जर धारदार, आकर्षक, तिरकस पण तेजस्वी नसते तर जगाचा, निदान त्या वेळचा इतिहासच बदलला असता, असे म्हणण्याची एक पद्धत आहे. महत्त्वाकांक्षी आणि कपटी, जिद्दी आणि स्वैराचारी पण कर्तबगार आणि लोकप्रिय अशी ती सम्राज्ञी होती आणि म्हणूनच एकूण २१ वर्षे तिने आपले साम्राज्य सांभाळले असेही मानले जाते.
ख्रिस्तपूर्व ६९ वर्षांपूर्वी, इजिप्तच्या टॉलेमी या राजघराण्यात जन्माला आलेली क्लिओपात्रा, हिंदुस्थानवर स्वारी करणाऱ्या अलेक्झांडर ऊर्फ सिकंदरच्या वंशजांपैकी. इजिप्तचा राजा, पहिला टॉलेमी हा अलेक्झांडरचा सेनापती. अलेक्झांड्रियामधील जगातील प्रसिद्ध व त्या दर्जाची पहिलीच लायब्ररी या टॉलेमीनेच उभी केली होती. (ही लायब्ररी पुढे एका युद्धात जाळून नष्ट केली गेली.) टॉलेमीचा मूळ वंश मॅलेडोनियन (म्हणूनच इजिप्शियन, की ग्रीक हा वाद) पण इजिप्तच्या ‘सिव्हिलायझेशन’चे एक प्रवर्तक. रोमन सत्तेने केलेल्या आक्रमणांमुळे इजिप्तला (टॉलेमी घराण्याला) रोमन साम्राज्यावर अवलंबून राहावे लागत असे.
क्लिओपात्रा २०३८ वर्षांपूर्वी मरण पावली, वयाच्या फक्त ३९ व्या वर्षी. पण ती कशामुळे आणि कशी मरणाधीन झाली? तिचा मृत्यू नैसर्गिक होता, की तिचा खून झाला? की तिने आत्महत्या केली? तिने आत्महत्या केली, असे म्हणणारे काही इतिहासकार लिहितात, की तिने एका अतिशय जहरी नागाला स्वत:च्या शरीरावर घेतले आणि त्याच्या दंशामुळे तिचा मृत्यू झाला किंवा तिने ओढवून घेतला! (विषयवासनेने झपाटलेल्या स्त्री-शरीरावर तसा सर्प वेढलेला दाखविण्याची ‘कलात्मकता’ क्लिओपात्रासंबंधातील या कथेवरून पुढे रूढ झाली असावी. आजही अनेक जाहिरातींमधून मादकता दाखविण्यासाठी याच प्रतिमेचा जगभर वापर केला जातो. असो.)
क्लिओपात्राला अशा दंतकथांच्या वेढय़ातून आता कायमचे ‘मुक्त’ केले जाणार आहे!
समजा या आर्किऑलॉजिस्ट टीमला, म्हणजे पुरातत्व संशोधकांना क्लिओपात्राचे थडगे अलेक्झांड्रियाजवळच्या टेकडीवर सापडले आणि ते तिचेच थडगे आहे, हेही सिद्ध झाले तरी पुढे काय? त्या थडग्यात हाडांचा जीर्ण सापळा मिळाला आणि तो कार्बन टेस्टिंग व अन्य प्रयोगांनी २०३८ वर्षांपूर्वीचा होता हेही सिद्ध झाले, तरी ती गोरी होती की कृष्णवर्णीय, ग्रीक की इजिप्शियन, सुंदर की ‘सामान्य’, आफ्रिकन वंशाची, की युरोपियन हे कसे ठरविणार? शिवाय तिचे ते जगप्रसिद्ध नाक- ते कसे होते हे त्या कवटीवरून कसे सिद्ध करणार? आणि तिचा मृत्यू सर्पदंशाने झाला हे तरी कसे निश्चित करणार?
आणखीही काही मुद्दे आहेत. हा सर्व अव्यापारेषु व्यापार, तोही काही लाख डॉलर्स खर्च करून, कशासाठी करायचा? त्याचा ‘उपयोग’ किंवा ‘फायदा’ काय? शिवाय त्या निर्जीव सापळ्यावरून क्लिओपात्रा ही खरोखरच तेजस्वी, तडफदार आणि कर्तबगार होती हेही कसे सिद्ध करणार? याहीपलीकडे एक प्रश्न आहे. गेली दोन हजार वर्षे, जगभर क्लिओपात्राबद्दलचे इतके आकर्षण का व कसे टिकून राहिले आहे? तिच्याबद्दलच्या दंतकथा, नाटके आणि आख्यायिकांद्वारे तिचा स्वभाव कसा होता याबद्दलच्या ज्ञानात कशी भर पडू शकेल?
क्लिओपात्राची ‘लेजंड’ पुनरुज्जीवित केली शेक्सपियरने. विशेषत: त्याच्या ‘अ‍ॅन्टनी अ‍ॅण्ड क्लिओपात्रा’ या नाटकामुळे. हे नाटक सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे. शेक्सपियरने लिहिलेल्या ‘ज्युलियस सिझर’ आणि ‘अ‍ॅन्टनी अ‍ॅण्ड क्लिओपात्रा’ या नाटकांसाठी त्याने काय ऐतिहासिक संशोधन केले होते? हल्लीच्या भाषेत शेक्सिपियरकडे ‘डेटाबेस’ काय होता?
शेक्सपियरने केलेले स्वभावचित्रण इतके प्रभावी होते, की ती नाटके हाच ‘खरा इतिहास’ असे मानले जाऊ लागले. पुढे त्या नाटकाची भाषांतरे झाली आणि युरोपियन साम्राज्याबरोबर क्लिओपात्राची ‘लेजंड’ही पसरली. असेही म्हणता येईल, की तिच्याबद्दलच्या दंतकथेपासून स्फूर्ती घेऊनच अनेक इतिहासकार सत्याच्या शोधात निघाले. जसजसा खरा इतिहास प्रकट होऊ लागला, तसतसा कलाकृतींमध्येही बदल होऊ लागला. क्लिओपात्राचे साम्राज्य आणि सौंदर्य हे पुढे हॉलीवूड चित्रपटांचे आवडते विषय झाले. एलिझाबेथ टेलरसारख्या विलक्षण देखण्या आणि कोणत्याही पुरुषाला आपल्या नजरेने व फॉर्मने ‘जायबंदी’ करणाऱ्या अभिनेत्रीने क्लिओपात्राची भूमिका केल्यापासून (१९६३) लिझ म्हणजेच क्लिओपात्रा ही प्रतिमा लोकमानसात ठसली. (‘मुगल-ए-आझम’ चित्रपटातील मधुबालामुळे अनारकलीची प्रतिमा आणि ‘लेजंड’ रुजली त्याचप्रमाणे!)
परंतु त्यापूर्वी आणि त्यानंतरही बरेच चित्रपट प्रकाशित झाले. व्हिव्हियन लीनेही (‘गॉन विथ द विंड’ची नायिका) १९४५ साली क्लिओपात्राची भूमिका केली होती. ती भूमिका करण्यासाठी हॉलीवूडमध्ये अहमहमिका असे आणि आजही आहे. लवकरच आता कोटय़वधी डॉलर्स खर्च करून ‘अ‍ॅन्टनी अ‍ॅण्ड क्लिओपात्रा’ नव्याने प्रदर्शित होणार आहे आणि त्याबद्दलचे कुतूहल पूर्वीपेक्षाही अधिक आहे.
नेमके याच सुमाराला अलेक्झांड्रियाजवळचे थडगे खणून क्लिओपात्राचा सापळा, तिच्या डोक्याची कवटी इतिहासकारांना सापडलेली असेल. त्यामुळे उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचलेली असेल. या संशोधकांना तिच्या कवटीबद्दल विशेष कुतूहल आहे.
इंग्लंडमध्ये एक संशोधक-अस्थितज्ज्ञ आहे. त्याची ख्यातीच अशासाठी आहे, की तो त्याला दिल्या गेलेल्या (वा मिळालेल्या) कवटीच्या रचनेचा अभ्यास करून तो त्यावर असलेल्या चेहऱ्याचे (बऱ्यापैकी) हुबेहूब चित्र काढू शकतो. त्याच्या या कौशल्याचा उपयोग इंग्लंडमधील स्कॉटलण्ड यार्ड, तेथील फोरेन्सिक लॅबोरेटरीज् आणि इतर संशोधकही करून घेतात.
काही वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये एक विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्याची ‘लाट’ आली होती. काही व्यक्ती (मुख्यत: तरुण मुली) एकदम गायब व्हायच्या. त्यांचे काय झाले, त्यांनी आत्महत्या केली, की त्यांचा खून झाला, की त्या देश सोडून कुठे निघून गेल्या हे पोलीस खात्याला कळत नसे. या ‘मिसिंग’ मुलींच्या शोधात असताना त्यांना कधीतरी, कुठेतरी एखादी ‘डेड बॉडी’ सापडत असे. बऱ्याच वेळा त्यांचा मृतदेह विस्कटलेला असे, डोक्यावर दगड मारल्यामुळे चेहरा समजत नसे आणि मृतदेह जुना झाल्यामुळे नीट ओळखणेही शक्य नसे.
गुन्हा अन्वेषण खात्याने त्या देहाचे शरीरविच्छेदन करताना, ती कवटी वेगळी करून या अस्थितज्ज्ञाकडे सुपुर्द करायला सुरुवात केली. त्याने त्या कवटीच्या आधारे त्या चेहऱ्याचे चित्र काढल्यानंतर, ते चित्र व हरवलेल्या मुलीचे / व्यक्तीचे चित्र किती मिळते जुळते आहे हे पाहून त्या मृत्यूबद्दल वा खुनाबद्दल खात्री केली जात असे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या संबंधितांशी संपर्क साधून हत्या झालेली व्यक्ती कुठच्या गावची, कोणाच्या परिचयातली, काय करीत असे इत्यादी माहिती मिळाल्यावर त्यानुसार संशयितांची एक यादी बनविली जात असे. त्यापैकी काही संशयित ताब्यात घेतल्यानंतर, त्यांच्यापैकी कुणीतरी कबुली देत असे. परंतु या अस्थितज्ज्ञाचे संशोधन नसते तर ही कबुली मिळू शकली नसती. साहजिकच आता या संशोधनाला बरीच शास्त्रशुद्धता आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
मुद्दा हा, की क्लिओपात्राची कवटी सापडल्यानंतर तिचा चेहरा चितारणे आता या विज्ञान-कलेला शक्य होणार आहे. ती कर्तबगार होती, की नव्हती, हे त्या सापळ्यावरून अर्थातच समजणार नाही. त्यासाठी इतिहासाची अन्य साधने वापरली गेली आहेत व जातील.
परंतु त्या ऐतिहासिक व्यक्तीची स्वभावशैली कशी होती हे कसे ठरवायचे? जवळजवळ सर्व इतिहासकार, उपलब्ध दस्तऐवजांच्या आधारे वा कल्पनाशक्तीच्या जोरावर इतिहासातील व्यक्तींचे स्वभाववर्णनही करतात. (म्हणूनच इतिहासकारांना ‘सर्जनशील’ असे संबोधले जात असावे.)
एखादी व्यक्ती एखाद्या प्रसंगी कशी वागते वा वागेल याचे ठोकताळे बांधून त्या ऐतिहासिक व्यक्तीच्या कृतींचा व स्वभावाचा वेध घेण्याची प्रथा आहे. किंबहुना त्याशिवाय निष्कर्षच काढता येत नाहीत. ‘महाभारत’ व ‘रामायण’ हे इतिहास आहेत, की महाकाव्य हा वाद दीर्घकाळ चालू आहे. अयोध्येला वा कुरुक्षेत्रावर थेट पुरावे मिळाले नसले तरी वाङ्मयीन ‘पुराव्यां’च्या आधारे त्या महाकाव्यांना इतिहासाचे स्थान प्राप्त झाले आहे. म्हणूनच रामायणातील व महाभारतातील सर्व जणांचे स्वभाववर्णन, मनोविश्लेषण, वृत्ती-प्रवृत्ती आजही अभ्यासल्या जात असतात.
इतिहास आणि मानसशास्त्र एकमेकांमध्ये इतके घट्टपणे गुंफलेले आहेत, की ते वेगळे करायचा प्रयत्न केला, की दोन्ही अर्थशून्य होतात. ती गुंफण, ती वीण, ते धागे जर नीट समजून घेतले तर आपले ‘सिव्हिलायझेशन’ हे एक ऐतिहासिक, रोमांचकारी नाटय़ होते. थरारनाटय़सुद्धा. त्याचप्रमाणे त्यातील वीण हलकेच सुईस्पर्श करून समजून घेण्याऐवजी, दाभण भोसकल्याप्रमाणे घुसवली तर ती गुंफण विस्कटू लागते. मग वर्तमानात नव्हे तर इतिहासातच अराजक माजते. इतिहासातले अराजक आपल्यावर वर्तमानात येऊन कसे हाहाकार माजवू शकते याची शेकडो उदाहरणे आहेत.
वर्तमानाला इतिहासाने अशा अजगरी विळख्यात अडकवून टाकावे हा ‘सिव्हिलायझेशनल मार्च’ला मिळालेला शाप असावा; पण शाप-उ:शाप जरा दूर ठेवू या.
इतिहासात असलेली मानसशास्त्रीय गुंफण समजून घेताना अभ्यासकाच्या ‘अहं’ची होणारी लुडबुड यामुळे अभिनिवेश आणि गोंधळ होतात. तो ‘अहं’ दूर केला आणि त्या ‘अहं’मधून येणारा गैरसमज काढून टाकला, की इतिहास हे चित्तथरारक काव्य होते. ते काव्य अशा थडग्यांचे उत्खनन करून कदाचित हाती लागणार नाही, पण तरीही क्लिओपात्राचा हा शोध हा मात्र चित्तथरारकच असेल.
कुमार केतकर