‘...विश्वाचा आकार केवढा - ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा!



‘...विश्वाचा आकार केवढा - ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा!
आपले जीवन क्षणभंगुर आहे, हे भान माणसाला काही हजार वर्षांपूर्वी आले; परंतु ‘क्षणभंगुर’ म्हणजे किती याचा अंदाज मात्र ‘सरासरी’नेच ठरवावा लागला. हे सरासरी आयुष्यमान अगदी युरोपातही तसे कमीच होते. ‘त्रिकाल’व्यापी शेक्सपियर (१५६४-१६१६) वयाच्या ५२ व्या वर्षीच मरण पावला. कवी शेली (१७९२-१८२२) तर फक्त ३० व्या वर्षी. शिवाजी महाराज-ज्यांच्या पुण्याईवर आणि दिगंत कीर्तीवर अजूनही महाराष्ट्र आपली अस्मिता जपतो-वयाच्या ५० व्या वर्षी (१६३०-१६८०) मरण पावले. केशवसुत वयाच्या ३९ व्या वर्षी (१८६६-१९०५) तर राम गणेश गडकरी वयाच्या फक्त ३४ व्या वर्षी (१८८५-१९१९). दीर्घ आयुष्य असलेली माणसेही असत-अगदी शतायुषीसुद्धा, पण तुलनेने कमी.
त्यामुळे सरासरी आयुष्यमान ४० ते ६० या पट्टय़ात असे। (साठी-एकसष्ठी करण्याची प्रथा त्यामुळे आली आणि निवृत्तीचे वयही प्रथम ५०, नंतर ५५, मग ५८ आणि अलीकडे ६० असे ठरत गेले।) आता जगभरच आयुष्यरेषा बरीच लांब होत गेली आहे. स्वातंत्र्यानंतर भारताचे सरासरी आयुष्यमान ४५-४८ वरून आता ६५-६८ च्या आसपास आले आहे. सध्या जे वैद्यकीय संशोधन चालू आहे, त्यानुसार सर्वसामान्य माणसाचे आयुष्यमान १०० च्या आसपास- अगदी सव्वाशे-दीडशेपर्यंतसुद्धा जाऊ शकेल, असे शास्त्रज्ञ सांगतात. (त्यामुळे निवृत्तीचे वय ८० किंवा ९० असावे असाही विचार काही आयुर्तज्ज्ञांनी मांडला आहे! साहजिकच काही मध्यमवयीन नोकरदार मंडळींची धाबी दणाणली आहेत!) म्हणजे एका बाजूला मोठय़ा प्रमाणावर नरसंहार कसा घडवून आणायचा यावर संशोधन चालू आहे. (अण्वस्त्रे- क्षेपणास्त्रे, जैविक व रासायनिक अस्त्रे) आणि दुसऱ्या बाजूला आयुष्यमान वाढविण्याचेही प्रयत्न चालू आहेत.मार्टिन रीज्सारखे जगद्विख्यात ब्रिटीश शास्त्रज्ञ तर अशी भीती व्यक्त करतात की ‘एरर वा टेरर’, म्हणजे चुकीने वा दहशतवादाने पृथ्वीचा विध्वंस होऊ शकतो- अगदी याच शतकातसुद्धा. कारण ‘विवेक विरुद्ध अविवेक’ या महायुद्धात विवेकाचाच विजय होईल असे विधिलिखितही नाही आणि तसे विज्ञानाने सिद्धही करता येणार नाही. विशेषत: ६०-७० वर्षांत, म्हणजे अणुस्फोटाची शक्ती लक्षात आल्यानंतर ही विध्वंसक शक्यता वाढतच गेली आहे. या घडीला जगात सुमारे २५ ते ३५ हजार अण्वस्त्रे-क्षेपणास्त्रे सुसज्ज स्थितीत आहेत आणि त्यांची क्षमता संपूर्ण पृथ्वीचा विध्वंस किमान १०० वेळा करण्याइतकी आहे. अर्थातच एकदा विध्वंस केल्यानंतर (वा झाल्यानंतर) उरलेली संहारक अस्त्रे वापरण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. गेल्या आठवडय़ात पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी यांनी म्हटले की, पाकिस्तानात तालिबान्यांची ताकद वाढते आहे आणि ते सत्तेवरही कब्जा करू शकतात. त्यांना असे सुचवायचे आहे की, पाकिस्तानची अण्वस्त्रे तालिबान्यांच्या हातातही पडू शकतात. अमेरिकेला वाटणारी भीतीही नेमकी तीच आहे. पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ आणि बॉम्बनिर्माते ए. क्यू. खान यांनी ते अणुज्ञान (आणि बॉम्ब) उत्तर कोरिया, इराण व इतर काही देशांना पुरविले असल्याचा पुरावा अमेरिकेकडे आहे. जर अतिरेक्यांच्या वा दहशतवाद्यांच्या हातात अण्वस्त्र सत्तेची सूत्रे पडली तर पृथ्वीचा विध्वंस होऊ शकतो ही मार्टिन रीज् यांनी (ड४१ो्रल्लं’ ऌ४१ह्ण या पुस्तकात) व्यक्त केलेली भीती सार्थ वाटू लागते. निराशावाद वा नियतिवाद वा प्रलयवाद यातून ती भीती आलेली नाही, तर वैज्ञानिक वास्तववादातून आली आहे.विज्ञानवादातील एक सूत्र काहीजण असे सांगतात की, प्रत्येक गोष्टीला जन्म, विकास आणि अंत असतो. त्यानुसारच माणसाला मर्त्यत्वाचे, क्षणभंगुरतेचे भान आले. अगदी प्राचीन मानवाला निद्रा आणि मृत्यू यातील फरक कळत नसे. (आजही संशोधनाचा एक मुद्दा हा आहे की सचेतन आणि अचेतन यात नक्की काय फरक आहे? गर्भावस्थेतील जीवात ‘प्राण’ कुठून शिरतो आणि तो जातो म्हणजे नक्की काय होते यावरचे चिंतन-संशोधन आता अगदी सूक्ष्मात गेले आहे!) सचेतन म्हणजे ‘कॉन्शस’ स्थिती; जिच्यात संवेदना, जाणीवा, प्रेरणा, स्मृती, विचार, भूत-वर्तमान-भविष्य स्थितीचे भान अशा गोष्टी आहेत. म्हणूनच आयव्हन इलिच यांच्यासारखे लेखक असा प्रश्न उपस्थित करतात की आयुष्यमान वाढविणे म्हणजे जीवन-क्षमता वाढविणे नव्हे. संवेदनाहीन, स्मृतिक्षीण आणि विचारहीन स्थितीत माणूस दीर्घकाळ जगू शकेल, पण त्याला अर्थ नाही. ‘मेडिकल नेमेसिस’ या ग्रंथात इलिच यांनी आयुष्यमान वाढविण्याच्या आणि वैद्यकीय निकषांनुसार वृद्धावस्था जपण्याच्या अतिरेकी वैज्ञानिक प्रयत्नांवर टीका केली आहे. त्यांच्या मते निसर्गक्रम ‘जन्म-विकास-अंत’ या चक्रातून जातो. तो क्रम जीवन आनंदमय करण्यासाठी उपयुक्त आणि उत्पादक करण्यासाठी जपणे वेगळे आणि केवळ शरीराचे आयुष्यमान वाढविणे वेगळे. इलिच हे नकारात्मक वा अस्तित्ववादीही नाहीत! पृथ्वी सिव्हिलायझेशन आणि मानव/जीवसृष्टी नष्ट होण्याची शक्यता व्यक्त करणारे मार्टिन रीज हे नियतीवादी वा प्रलयवादी नाहीत; त्याचप्रमाणे. हे दोघेही विचारवंत/ शास्त्रज्ञ प्रत्यक्षात जीवसृष्टी व पृथ्वी जपण्याच्या व वाचविण्याच्या प्रयत्नातून तो धोका सांगतात.माणसाला स्वत:च्या आयुष्यमानाचे/ मर्त्यत्वाचे भान काही हजार वर्षांपूर्वी आले, पण आपल्या पृथ्वीचे आणि सूर्यमालिकेचे भान येऊ लागले ते सुमारे पाचशे वर्षांत. कोपर्निकसने (१४७३-१५४३) पृथ्वी ग्रह सूर्याभोवती फिरतो, असे मांडून ख्रिश्चन धर्मगुरूंच्या श्रद्धा-सिद्धांताला आव्हान दिले होते. पण ते प्रत्यक्ष दुर्बिणीच्या मदतीने सिद्ध केले ते गॅलिलिओने, बरोबर चारशे वर्षांपूर्वी. साधारणपणे हाच काळ (१४०० ते १७००) ‘रेनेसाँ’ म्हणजे आधुनिक ज्ञानोदयाचा मानला जातो. याच काळात वैद्यकीय संशोधन, शस्त्रक्रिया, शरीरज्ञान या ज्ञानशाखांमध्येही झपाटय़ाने प्रगती झाली. आजचे मेडिकल क्षेत्रातील बहुतेक प्रयोग आणि रोगचिकित्सा या काळात सुरू झाल्यामुळेच अ‍ॅलोपथी-वैद्यकी भाषेतील बहुतेक मूळ शब्द त्यावेळचे आहेत.मुद्दा हा की माणसाप्रमाणेच पृथ्वीलाही जन्म, ‘विकास’ व अंत असणार, ही संकल्पना तेव्हा मूळ धरू लागली. ‘प्रोसेस ऑफ एजिंग’ म्हणजे प्रौढ व वृद्ध होण्याची प्रक्रिया माणसाची वेगळी आणि पृथ्वीची वेगळी. एकदा पृथ्वीला या प्रक्रियेत आणल्यानंतर आपल्या सूर्यमालिकेच्या जन्माचा, विकासाचा व अंताचा विचार सुरू झाला. साहजिकच त्यानंतर विश्वाच्या जन्माचा आणि अंताचाही!परंतु विश्वाला अंत नाही आणि जन्मही नाही, अशी एक ‘स्टेडी स्टेट थिअरी’ पुढे आली. ‘बिग बँग’ थिअरीने मात्र विश्वाचा जन्म १३ ते १५ अब्ज वर्षांपूर्वी झाला असे म्हटले आहे. बहुतांश खगोलशास्त्रज्ञ बिग बँग सिद्धांत मानतात. हा ‘बिग बँग’ ऊर्फ महाविस्फोट झाल्याबरोबर क्षणार्धात निर्माण झालेले हे अवघे विश्व किती आकाराचे होते? काही शास्त्रज्ञ म्हणतात, फक्त एका वाटाण्याएवढे! या ‘वाटाण्या’चा विस्तार होऊ लागला आणि त्यातून अथांग विश्व तयार झाले.केशवसुतांनी म्हटले आहे, ‘या विश्वाचा आकार केवढा-ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा.’ केशवसुतांना आधुनिक खगोलशास्त्र, बिग बँग वगैरे गोष्टी माहीत नव्हत्या. परंतु त्या अथांगाला आपल्या बुद्धीच्या कक्षेत सामावता येते असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी तशा ओळी लिहिल्या; परंतु आता काही शास्त्रज्ञ असे मानतात की, आपल्या बुद्धीच्या वा प्रज्ञेच्याही कक्षेत मावणे शक्य नाही इतका प्रचंड मोठा विस्तार या विश्वाचा आहे. म्हणजेच १३ ते १५ अब्ज वर्षांपूर्वीचा तो वाटाणा आता खरोखरच ‘इन्फिनाईट’ म्हणजे अथांग झाला आहे. इतका की, आता नव्या सिद्धांताप्रमाणे एकच नव्हे तर अनेक महाविस्फोट ऊर्फ ‘बिग बँग’ झाले आहेत. म्हणजेच एकच नव्हे तर अनेक विश्वे आहेत आणि ती सर्व विश्वे सतत विस्तारत आहेत. त्यामुळे या विश्वात किती अब्ज तारे, किती अब्ज ग्रह, किती अब्ज तारकापुंज, किती ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवरे आहेत, हे ‘निश्चित’ सांगता येणे अशक्य आहे. अवकाशात कितीही दुर्बिणी लावल्या, दूर दूर अथांगात कितीही अवकाशयाने सोडली तरी विश्वाचा आकार मानवी डोळ्याला कळणारच नाही.कदाचित म्हणूनच ‘स्टेडी स्टेट’ सिद्धांताचे फ्रेड हॉईल आणि डॉ. जयंत नारळीकर हे जनक असे मांडत आले होते की, विश्वाला ‘जन्म’ वगैरे असा नाहीच. हा सिद्धांत मानणाऱ्यांची संख्या कमी आहे म्हणून तो सिद्धांत मोडीत निघाला आहे असे मात्र नव्हे; परंतु प्रश्न होता तो जन्म-विकास-अंत या प्रक्रियेचा. जन्मच नसेल तर अंत कसा होणार? की जन्म नाही, पण अंत मात्र आहे?या विश्वात अब्जावधी सूर्यमालिका असतील तर अर्थातच त्याच प्रमाणाच पृथ्वीसदृश ग्रह असणार. म्हणजेच लाखो वा कोटी ग्रहांवर जीवसृष्टी आणि कदाचित मानवसदृश ‘प्रगल्भ’ प्राणीही असणार. कोटय़वधी प्रकाशवर्षे दूर असलेल्या या मानवसदृश प्रगल्भ प्राण्याशी आपला संपर्क होण्याची शक्यता फारच कमी. शिवाय तो आपल्याप्रमाणेच असेल असेही धरून चालता येणार नाही. कुणी सांगावे, तो जन्म-विकास-मृत्यू या फे ऱ्यातून सुटला असेल वा तशा फे ऱ्यात अडकलाच नसेल तर एखादा ‘अमर माणूस’ वा तत्सम प्राणीही असेल. मग त्याला डार्विनचे उत्क्रांती नियम लागू पडण्याचा प्रश्नच येणार नाही!परंतु पृथ्वीसदृश ग्रहावर जीवसृष्टी असेल तर मात्र हा फेरा चुकविता येणार नाही. याबाबत शास्त्रज्ञांचे एकमत आहे. फार तर त्या जिवांचे आयुष्यमान वेगळे असेल. कासव पाचशे वर्षे जगते, हत्ती शे-दीडशे वर्षे जगतो आणि माणूस शतायुषी होऊ शकतो, तशी इतर ग्रहांवरची जीवसृष्टी वेगवेगळ्या आयुष्यमानाच्या प्रक्रियेत असू शकते. आपण आपल्या दृष्टिकोनातून पृथ्वीच्या सापेक्षतेतून आणि या सूर्यमालिकेच्या संदर्भात विचार करतो, तेव्हा तो आपल्या ‘डोक्याएवढाच’ विचार असणार हे उघड आहे. साहजिकच त्या जन्म-विकास-मृत्यूला काळाचे परिमाणही त्यानुसारच ठरणार.आज जे ‘एजिंग प्रोसेस’वर संशोधन चालू आहे, त्याद्वारे वृद्धत्वापासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न आहे. (अमरत्व प्राप्त करण्याची संकल्पना तर अगदी महाभारतापासून ते आजच्या काही स्वप्नाळू संशोधकांनाही भारावून टाकत आली आहे. अमृत पेयाचा काल्पनिक ‘शोध’ त्यातूनच लागला.) परंतु वृद्धत्व लांबवले तरी ते व मरण अटळ आहे. म्हणजेच क्षणभंगुरत्वाची वैश्विक व्याख्या फारशी बदलणार नाही- आयुष्यरेषा दीर्घ केली तरीही.शिवाय पृथ्वी ग्रहाचीही निश्चित आयुष्यरेषा आहेच. ती बदलता येणार नाही. कारण आपल्या सूर्यातून जी ऊर्जा बाहेर पडते, तिच्या हिशेबानुसार सूर्याचे एकूण वय १० अब्ज वर्षे आहे. त्यापैकी अर्धे-अधिक सूर्य ‘जगाला’ आहे. जर माणसाने आपल्या ‘कर्माने’ पृथ्वीचा पुढील शंभर-एक वर्षांत विध्वंस केला नाही आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा योग्य व नैतिक उपयोग केला तर पृथ्वीला अजून दोन-तीन अब्ज वर्षे ‘मरण’ नाही. लोकसंख्या वाढ, अन्नधान्य, ऊर्जा व पाणी यांची संभाव्य टंचाई, ग्लोबल वॉर्मिग या सर्व समस्यांना वैज्ञानिक उत्तरे आहेत. गरज आहे ती त्या विज्ञानाला व जीवनाला विवेकाचे परिमाण देण्याची!


कुमार केतकर

No comments:

Post a Comment