खंत विवेकशून्य विचारवंतांची!











गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये एक चर्चासत्र आयोजित केलेले होते. विषय होता ‘विज्ञान, श्रद्धा आणि धर्म’. बहुतेक चर्चासत्रांप्रमाणे अर्थातच त्या चर्चेतून सर्वमान्य निष्कर्ष निघाले नाहीत. गेल्या महिन्याच्या ‘सायंटिफिक अमेरिकन’ अंकात लॉरेन्स क्रॉस या पदार्थविज्ञानशास्त्रज्ञाने त्या चर्चेसंबंधात जे निवेदन केले आहे ते पाहता अजूनही मतभेदांची कोंडी फुटलेली नाही. मतभेदांचा मुद्दा अर्थातच ‘परमेश्वर’ हा आहे. ‘देव आहे, की नाही’ या विषयावर गेली सुमारे तीन-चारशे वर्षे खडाजंगी चालू आहे. हा प्रश्न अर्थातच लोकशाही पद्धतीने, जनमताचा कौल घेऊन सोडविण्यात अर्थ नाही. प्रचंड बहुमताने ‘परमेश्वरवादी’ पार्टीचा विजय होईल आणि देवाचे अस्तित्व ‘लोकशाही’ने ‘सिद्ध’ झाले असे मानले जाईल. जगातील जवळजवळ सर्व राजकारणी व्यक्ती देवाचे अस्तित्व मानतात. भारतातले बहुतेक उमेदवार निवडणुकीपूर्वी शिर्डीच्या साईबाबांपासून सिद्धीविनायकापर्यंत आणि तिरुपतीच्या बालाजीपासून ते माऊंट मेरीपर्यंत सर्वाचे आशीर्वाद घेत फिरत असतात. त्यांची श्रद्धा इतकी दुर्दम्य असते, की निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांच्या श्रद्धेत तसूभरही फरक पडत नाही. त्यांच्या श्रद्धेला देवाच्या अस्तित्वाचा पुरावा लागत नाही.
खरे म्हणजे, ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी अशा श्रद्धावानांबरोबर वाद घालण्यात अर्थ नसतो; परंतु अनेक कट्टर नास्तिक, ठाम विज्ञानवादी आणि स्केप्टिक्स ऊर्फ शंका / संशयवादी ‘देव नाहीच’ हे सिद्ध करू पाहात असतात. फारच थोडे आस्तिक हे विचाराने नास्तिक झालेले आहेत. पंडित नेहरू हे विचाराने नास्तिक होते, वृत्तीने व व्यवहाराने १०० टक्के विज्ञानवादी होते; पण स्वभावाने सहिष्णू व उदारमतवादी असल्याने त्यांनी ‘परमेश्वरवाद्यां’ची टिंगल-टवाळी केली नाही वा त्यांच्या तोंडी ते लागले नाहीत. श्रद्धा व धर्म राजकारणात शक्यतो येऊ नयेत हा त्यांचा प्रयत्न होता.
‘नास्तिकांची नास्तिकवादावरची श्रद्धा आस्तिकांच्या देवावरच्या श्रद्धेपेक्षाही अधिक कडवी असते,’ असे नेहरूंनी एके ठिकाणी म्हटले आहे. बटर्रण्ड रसेल शंकावादी म्हणजे स्केप्टिक होते आणि देवाच्या मुद्दय़ावर ते ‘अ‍ॅग्नॉस्टिक’ ऊर्फ अज्ञेयवादी होते, ‘एथीइस्ट’ म्हणजे निरीश्वरवादी नव्हते. त्यांनी तर ‘मी ख्रिश्चन का नाही’ (हँ८ क ंे ल्ल३ ं उँ१्र२३्रल्ल) या विषयावर प्रबंधरूपी पुस्तिका लिहून इंग्लंडमध्ये खळबळच माजविली होती; पण रसेल यांनीच ‘मी कम्युनिस्ट का नाही’ (हँ८ क ंे ल्ल३ ं उे४ल्ल्र२३) अशीही पुस्तिका लिहून डाव्या मंडळींमध्ये एक सुरुंग पेरला होता. त्यामुळे रसेल असोत वा नेहरू, या दोघांबद्दल बोलताना कम्युनिस्ट मंडळी कधी बुद्धिवादी अहंतेने तर कधी तुच्छतेने बोलतात. पण गंमत म्हणजे जेव्हा ईश्वरवाद्यांशी वाद घालायचा प्रसंग येतो तेव्हा रसेलच्या तर्कवादी मांडणीचाच आधार घेतात.

कार्ल मार्क्‍स अर्थातच निरीश्वरवादी; परंतु स्वयंभू कम्युनिस्टांच्या अरेरावीला व दुराग्रहीपणाला कंटाळून त्यांनी ‘थँक गॉड, आय अ‍ॅम नॉट अ मार्क्‍सिस्ट!’ असे उद्गार काढले होते. मुद्दा हा, की नास्तिक-आस्तिक- शंकावादी यांच्यातील वाद पूर्णपणे मिटणे अशक्य आहे. शिवाय आयझ्ॉक न्यूटनपासून अनेक वैज्ञानिकच देववादी (आणि दैववादीही) असल्यामुळे नास्तिकवाद्यांची थोडीशी पंचाईत होते. परंतु न्यूटनचा तथाकथित आस्तिकवाद हा श्रद्धा वा रूढिवादी नव्हता. समुद्राच्या किनाऱ्यावर बसून अथांग पसरलेल्या पाण्याकडे आणि वर आकाशाकडे पाहून, तो म्हणत असे, की येथील वाळूच्या एका कणाइतकीही आपली अस्तित्व-खूण नाही; पण त्या अथांगतेचा गणिती थांग लावण्याचा त्याने अखेपर्यंत प्रयत्न केला. ‘परमेश्वरनिर्मित’ सृष्टीचे रहस्य शोधून काढणे हेच आपल्याला त्याने दिलेले काम (ध्येय) आहे, अशा स्वरूपाची त्याची विचारसरणी होती. म्हणूनच झाडावरून खाली पडणाऱ्या सफरचंदात त्याला गुरुत्वाकर्षणाचे भौतिकशास्त्रीय नियम सापडले. नाहीतर लाखो वर्षे सफरचंदे व अन्य फळे वरून खाली पडत होतीच- फक्त इंग्लंडमध्येच नव्हे तर भारतातही! न्यूटन जर विज्ञानमार्गाऐवजी भक्तिमार्गाने गेला असता तर या विश्वाच्या अथांगाचा थांग लागायला तेव्हा सुरुवात झाली नसती. एका अर्थाने न्यूटन-गॅलिलिओंनीच देव वा धर्मविरोधी काहीही थेट भाष्य न करता त्यांच्या अस्तित्वाला व श्रद्धावादाला मूलभूत आव्हान दिले. किंबहुना विज्ञानवाद्यांमध्ये आणि वैज्ञानिकांमध्ये देव ‘अवतरला’ तो तेव्हापासूनच. (नास्तिक विज्ञानवाद्यांनी तेव्हापासून परमेश्वराविरुद्ध एक आघाडी उभी केली आहे. जे परमेश्वरवादी त्या वादात उतरतात, त्यांची पंचाईत होते, कारण त्यांना सिद्ध काहीच करता येत नाही; पण अशा सिद्ध न करता येण्यासारख्या, न दिसणाऱ्या, प्रयोगात न बसणाऱ्या अनेक गोष्टी जर आपण मानतो तर देवाचे अस्तित्व मानायला काय हरकत आहे, अशा प्रकारचे अतक्र्य तर्कशास्त्र ते सांगतात. याउलट विज्ञानवादी जवळजवळ प्रत्येक गोष्ट तर्काने, गणिताने, प्रयोगशीलतेने सिद्ध करण्याच्या मागे असल्यामुळे त्या दोघांमध्ये संवाद असंभवनीयच असतो. त्यामुळे सहिष्णुता आणि परस्परांबद्दलचा सांस्कृतिक आदरभाव इतकेच संदर्भ त्यांच्या चर्चेला असतात वा उरतात. धर्मवादी / देववादी आस्तिक आणि विज्ञानवादी नास्तिक यांच्यातील विसंवाद वा असंवाद समजण्यासारखा आहे, परंतु कला-संस्कृतिवादी आणि विज्ञानवादी यांच्यात अक्षरश: उभा दावा असावा हे मात्र न मानवण्यासारखे वाटते. परंतु अशी स्थिती युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर उद्भवली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व नंतर विज्ञानाचाच नव्हे तर विज्ञानवादाचा प्रभाव खूपच वाढला होता. विद्यापीठांमध्ये, अगदी शाळांमध्येसुद्धा, तसेच सामाजिक जीवनात ‘आर्ट्स’ शाखांकडे जाणारे बुद्धीने दुय्यम दर्जाचे आणि विज्ञान शाखा निवडणारे ‘हुशार’, ‘हाय आयक्यू’ असणारे असतात असे मानण्याचा कल वाढला होता. (आपल्याकडेसुद्धा ९० टक्क्यांच्यावर मार्क मिळविणाऱ्यांनी सायन्सला जायचे- इंजिनीअरिंग, मेडिकल, सॉफ्टवेअर वगैरे- आणि ५० टक्क्यांच्या आसपास मार्क्‍स मिळविणाऱ्यांनी ‘आर्ट्स’ला जायचे ही प्रथा गेली ३० वर्षे आहेच.)
युरोपमध्ये तर १९३० ते १९६० या काळात लेखक, कवी, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ इत्यादी ‘ह्युमॅनिटीज्’ किंवा ‘आर्ट्स’ शाखांमधले ‘विचारवंत’ एका बाजूला आणि वैज्ञानिक, गणिती, तंत्रज्ञ दुसऱ्या बाजूला असे उभे दोन तटच पडले होते. इतके, की जगद्विख्यात फिजिसिस्ट रुदरफोर्ड आणि ख्यातनाम गणिती जी.एच. हार्डी काहीसे छद्मीपणे उद्गारले, की ‘आम्ही विज्ञान-गणित क्षेत्रात काम करतो त्यामुळे आम्हाला ‘इंटेलेक्च्युअल’ म्हणून संबोधण्याची प्रथा नाही. आम्ही ‘सायन्टिस्ट!’- इण्टेलेक्च्युअल नाही.. विचारवंत फक्त सॉक्रेटिस आणि शेक्सपियर, वा शेली आणि शॉपेनहॉवर यांचा अभ्यास करणारे प्राध्यापक वा तत्सम कुणी.. आम्ही अणुसंशोधन, जीवसृष्टीतील कूट प्रश्न, गणितातील जटिल समस्यांचा अभ्यास करणारे लोक.. आम्हाला इंटेलेक्च्युअल कसे म्हणणार?’ म्हटले तर ही खंत होती, म्हटले तर तथाकथित ‘विचारवंतां’वरचे स्पष्ट भाष्य! समाजातला वा राजकारणातला वा अर्थकारणातला कोणताही प्रश्न असो- मग तो युद्धविषयक असो, औद्योगीकरणाचा असो वा नव्या उत्पादन तंत्राचा- त्यासाठी हे कवी, लेखक, विचारवंत कामाचे नसतात, तेव्हा त्यांना आमची गरज भासते, असे त्यांना म्हणायचे होते.
‘कलावादी’ आणि ‘विज्ञानवादी’ यांच्यातील परस्परविरोधी भावना इतक्या पराकोटीला गेल्या होत्या, की त्या वेळेस इंग्लंडमध्ये ‘विचारवंत’ म्हणून प्रसिद्ध असलेले सी. पी. स्नो यांनी ‘द टू कल्चर्स’ नावाचे एक छोटेसे पुस्तकच लिहिले. या विषयावरील त्यांच्याच एका भाषणाचा आधार घेऊन. त्यांचे ते भाषण सर्वार्थाने ऐतिहासिक ठरले. त्याचे एक कारण स्नो हे स्वत: ज्येष्ठ वैज्ञानिक होते आणि सर्जनशील लेखकही होते. दोन्ही ‘गटां’मध्ये त्यांना प्रतिष्ठा होती, पण त्या दोन गटांमधील मंडळींमध्ये संवाद घडवून आणण्यात ते अयशस्वी ठरले होते. आपण या प्रयत्नात का अयशस्वी ठरलो हे सांगण्याचे निमित्त करून ‘आर्ट्स’ आणि ‘सायन्स’ या दोन्ही शाखा सर्जनशील आहेत. माणसाला, समाजाला त्यापैकी केवळ एकाच्याच आधारे जीवन जगणे आनंददायी होणार नाही, असे साधे पण विलक्षण वेधक व भेदकपणे मांडलेले ते मुक्त चिंतन होते. ‘सायंटिफिक अमेरिकन’च्या ज्या अंकाचा वर संदर्भ दिला त्या अंकाने, त्या भाषणाला बरोबर ५० वर्षे झाली म्हणून पुन्हा या वैचारिक यादवीचा आढावा घेतला आहे.
सी. पी. स्नो यांनी जे दोन तट / गट संवादी करायचा प्रयत्न केला, त्यात देव वा धर्म हा मुद्दा अजिबात नव्हता. कारण कित्येक ‘विचारवंत’ (‘आर्ट्स’ वा ‘ह्युमॅनिटीज्’वाले) हे नास्तिक होते आणि कित्येक वैज्ञानिक हे धर्माला वा देवाला मानणारे होते. त्यामुळे वैज्ञानिक हा आपसूकच निरीश्वरवादी असतो, असे मानण्याला थारा नव्हता. परंतु कोणत्याही गणितसूत्रापेक्षा (गणितज्ज्ञापेक्षा) शेक्सपियर वा शेली व त्यांची नाटके व कविता सांस्कृतिकतेच्या अधिक ‘उच्च स्तरावर’ आहेत, असे बहुसंख्यांचे मत होते आणि वैज्ञानिक हे मुख्यत: माणसांच्या ऐहिक गरजा भागवू पाहणारे लोक आहेत, असा ग्रह होता. (साधारणपणे ‘भाकरी की फूल’ वा ‘भावना की ज्ञान’ या चालीवर!)
परंतु वस्तुस्थिती अशी नव्हतीच. अनेक वैज्ञानिक असे होते की, जे शेक्सपियरचे, संगीताचे, बॅले व ऑपेराचे, उत्कृष्ट चित्रांचे, शिल्पकलांचे चाहते होते, रसिक होते आणि संग्राहकही होते. त्यांच्या मनात सर्जनशील कलेविषयी ग्रहपूर्वग्रह नव्हते, पण लेखक-कवींना मात्र विज्ञानाविषयी काहीही माहिती नसताना ते बिनदिक्कत नवीन संशोधनांविषयी, शास्त्रज्ञांविषयी बोलत असत. त्यामुळे प्रश्न तथाकथित ‘इंटेलेक्च्युअल’ भासणारा आणि अलंकारिकपणे व्यक्त होणारा ‘भाकरी का फूल’ असा नव्हताच.
त्यानंतरच्या काळात, ‘सायंटिफिक अमेरिकन’ने म्हटल्याप्रमाणे ‘टू कल्चर्स’ची जागा ‘थ्री कल्चर्स’ने घेतली. अनेक वैज्ञानिक थेट कथा-कविता-कादंबऱ्याच लिहू लागले. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषयांवर अतिशय उत्तम दर्जाचे लेखन करू लागले. फक्त ‘विज्ञान साहित्य’ नव्हे. बट्र्राण्ड रसेल यांच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला. ‘मॅरेज अ‍ॅण्ड मॉरल्स’ हा सामाजिक विषयावरचा वादग्रस्त प्रबंध प्रकाशित झाला. रसेल हे विलक्षण प्रतिभेचे गणिती होते; पण त्यांची ख्याती दिगंतात पसरली ती सामाजिक विचारवंत म्हणून. बिगर-विज्ञान क्षेत्रातल्या लोकांसाठी त्यांनी अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत सुलभपणे समजावून सांगणारा ‘एबीसी ऑफ रिलेटिव्हिटी’ हा छोटेखानी ग्रंथ लिहिला. (रसेल तर गंमतीने म्हणत, की तो सिद्धांत फक्त आइनस्टाईनला व त्यांनाच समजला होता. जगाला समजला तो रसेल यांच्या त्या पुस्तिकेमुळेच!) स्वत: स्नो तर लेखक होतेच. ५० वर्षांत हे ‘थर्ड कल्चर’ प्रचंड प्रमाणावर विस्तारले आहे. आयझ्ॉक अ‍ॅसिमोवसारख्या लेखकांनी (त्यांनी एकूण ५०० पुस्तके लिहिली) केवळ विलक्षण ‘विज्ञान कादंबऱ्या’च लिहिल्या नाहीत तर शेक्सपियर, बायबल आणि समाजशास्त्रविषयक लेखन केले. त्यांच्या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. ऑर्थर सी क्लार्क, कार्ल सगान ते अगदी होमी भाभा व जयंत नारळीकर व यशपाल अशा सर्वानीच आपली सर्जनशीलता दाखवून दिली. भाभा स्वत: उत्कृष्ट चित्रकार होते आणि त्याची कलादृष्टी ही तर भल्या भल्या समीक्षकांपेक्षा कितीतरी पटींनी प्रगल्भ होती.
काही वर्षांत या तटबंदी बऱ्याच प्रमाणात कोसळून पडल्या आहेत. आता शेक्सपियरच्या नाटकांवर (म्हणजे त्यातील अनेक नैसर्गिक व मानसशास्त्रीय संदर्भावर) वैज्ञानिक मंडळी संशोधन करीत आहेत आणि कित्येक विज्ञानविषय हे सहजगत्या साहित्यविषय झाले आहेत. जॉन ल कार यांच्या गुप्त हेरकथा / (ी२स्र््रंल्लंॠी ल्ल५ी’२) किंवा टॉम क्लान्सी यांच्या युद्ध व शस्त्रास्त्र संशोधन कादंबऱ्यांमध्ये इतके विज्ञान असते आणि तरीही त्या कथा-कादंबऱ्यांना आपण विज्ञान-साहित्य म्हणू शकत नाही.
स्नो यांनी देव / धर्म / श्रद्धा यांच्या विरोधात व खिल्ली उडविणारे काहीही लिहिले नाही. त्यांच्या मते सर्जनशील साहित्यात आणि विज्ञानात, देवाला तसे फारसे स्थान नाही. त्याबद्दल वारही घालायची गरज नाही. माणसाला या भूतलावर पडणारे प्रश्न (किंवा माणसानेच निर्माण केलेले प्रश्न) येथेच सोडवायचे आहेत. ते सोडवायला देव प्रत्यक्ष अवतरणार नाही हे अगदी कट्टर परमेश्वरवाद्यांनाही माहीत असते; पण त्यांच्या श्रद्धेला तडा जाईल या भीतीने ते स्वत:शीसुद्धा तसे बोलत नाहीत. ‘संभवामि युगे युगे’ ही फक्त बोलण्यापुरते असते.
बट्र्राण्ड रसेल यांनी एका निबंधात म्हटले होते, की देवाचे अस्तित्व कुठच्याही अनुभवातून (साक्षात्कारींचा स्वयंभू अनुभव वगळता) वा तर्कशास्त्रात बसत नाही; पण असे असूनही हजारो वर्षे लोक देव आणि दानव, भूत-पिशाच्च आणि देवदूत अशा संकल्पनांवर विश्वास ठेवत आले आहेत. प्रश्न हा आहे, की त्यांची अशी तर्कशून्य श्रद्धा कशातून निर्माण होते? रसेल यांनी पुढे म्हटले, की याचे एक मुख्य कारण माणूस हा पूर्णपणे ‘इरॅशनल अ‍ॅनिमल’ म्हणजे विवेक / तर्कशून्य प्राणी आहे आणि तरीही तितक्याच अतार्किकपणे त्याने स्वत:लाच ‘रॅशनल अ‍ॅनिमल’ ऊर्फ सुज्ञ-विवेकी प्राणी असे म्हणवून घेतले आहे.


कुमार केतकर
शनिवार, १७ ऑक्टोबर २००९

क्रॉसरोड्स् : टेक्नॉलॉजी आणि राजकारण

आपण कितीही हसत-खिदळत असलो, गप्पा मारत असलो, सिनेमा- नाटक- टीव्ही पाहत असलो, ऑफिस वा अन्य कुठच्या घरगुती वा व्यावसायिक कामात मग्न असलो, क्रिकेट मॅच पाहात असलो तरी, खोल कुठेतरी मनाच्या गाभाऱ्यातील मिट्ट अंधारात, एका अनामिक शंकेने, भीतीने वा अस्वस्थतेने ग्रस्त असतो.
कुठच्याही विशिष्ट गोष्टीची ती भीती नसते. अनेकदा त्या अस्वस्थतेला निश्चित कारणही नसते आणि त्या अव्यक्त शंकेचे उत्तरही आपण फार मोठय़ा उत्साहाने शोधतो असे नाही. खरे म्हणजे एक प्रकारे बरेच की ती भीती वा शंका वा अस्वस्थता मनाच्या खोल गाभाऱ्यातील मिट्ट अंधारात असते. जर ती सतत भेडसावत राहिली तर जगणेच अशक्य होईल- आनंद, मजा वगैरे दूरच राहो. हल्ली असे म्हणण्याचीही एक प्रथा आहे की, आजच्या तरुणांना फक्त ‘धमाल’च हवी आहे, कशाचे गांभीर्य म्हणून त्यांना नाही. मुद्दा धमाल वा मजेचा वा आनंदाचा नाही, त्याचप्रमाणे भीतीचा वा शंकेचा नाही. ज्यांना अनामिक वा काल्पनिक भयाने ग्रासलेले असते त्यांना आपण ‘पॅरॅनॉइड’ म्हणून संबोधतो.
शिवाय चिंता आणि भीती या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे ‘धम्माल’ आणि ‘बेपर्वाई’ किंवा ‘धीटपणा’ आणि ‘बिंधासपणा’ याही वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्ती आहेत. तसेच एखादी वृत्ती सरसकट सर्व तरुण-तरुणींच्या माथ्यावर मारणेही गैरच. कारण जसे बेपर्वा व धम्मालवादी तरुण आहेत, तसेच संवेदनशील आणि अभ्यासू वृत्तीचेही आहेत. त्यामुळे तशा सामूहिक निष्कर्षांपासून दूर राहूनच या प्रकरणाचा विचार करायला हवा.
‘प्रकरण’ म्हणजे जागतिक स्तरावर दिसत आणि भासत असलेले र्सवकष अरिष्ट-ग्लोबल वॉर्मिगपासून ग्लोबल रिलेशनपर्यंतचे, दहशतवादापासून ते संभाव्य अणुयुद्धाचे, अतिरेकी व्यक्तिवादापासून बेभान चंगळवादापर्यंतचे, दुरभिमानी अस्मितावादापासून (धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक) ते अमर्याद लोभाचे (संपत्तीचा, प्रतिष्ठेचा, सत्तेचा).
या व अशा समस्यांवर उंदड साहित्य प्रसिद्ध होत आहे, चर्चा-परिसंवाद घडविले जात आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या जात आहेत आणि तरीही सुमारे १०० वर्षांत प्रत्येक समस्या अधिकाधिक जटिल होताना आपण पाहात आहोत आणि प्रश्न सुटण्याऐवजी त्यांना नवनवीन फाटे फुटताना आपण पाहतो आहोत.
त्यामुळेच सर्वाच्या मनात, खोल कुठेतरी गर्द भीतीचे आणि अनामिक अस्वस्थतेचे काहूर माजलेले असते. आपल्या दिनचर्येच्या व्यग्रतेत आपण ते विसरायचा प्रयत्न करतो किंवा निदान त्याची वाच्यता करीत नाही, परंतु म्हणून ती भीती पूर्ण नाहीशी होत नाही. ती मनात घोंघावत राहातेच.

अशी भीती सार्वत्रिक असते वा तसे रूप धारण करते तेव्हा दहशतवाद वा हुकूमशाही प्रवृत्ती समाजावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करतात वा मिळवितात. ती भीती म्हणजेच हुकूमशहांचे मुख्य साधन असते. सत्ता मिळविण्याचे वा टिकविण्याचे साधन. परंतु, असे सर्व हुकूमशहा स्वत: सतत भयग्रस्त असतात, कारण त्यांना निदान मनातून माहीत असते की, आपली सत्ता प्रशासकीय हुकूमशाहीवर टिकून आहे आणि आपल्याला कुणीतरी दगाफटका करण्याची शक्यता आहे. म्हणूनच दगाफटक्याची शंका जरी आली तरी असे हुकूमशहा अटकसत्र सुरू करतात, देहान्ताच्या शिक्षा ठोठावतात आणि ‘षड्यंत्र’ मोडण्यासाठी ‘प्रती-षड्यंत्र’ तयार करतात. हिटलरने ते केले. मुसोलिनीने केले. विचारसरणीच्या उदात्त नावावर स्टॅलिनने केले, माओने केले, पोल पॉटने केले. आज सौदी अरेबिया, लिबियातच नव्हे, तर इस्राएलमध्येही लोकशाहीचा आभास असला तरी प्रत्यक्ष सत्ता उग्रवादी झायोनिस्टांनी ‘मोसाद’ या त्यांच्या गुप्तहेर यंत्रणेमार्फत ताब्यात घेतली आहे. याच मोसादने अप्रत्यक्षपणे आता बराक ओबामांनाही धमक्यावजा इशारे द्यायला सुरुवात केली आहे.
एक काळ असा होता (काही प्रमाणात आजही आहेच) की सत्ता व प्रशासन हेच समाजकल्याणाचे व सिव्हिलायझेशनचे मुख्य (वा एकमेव) साधन आहे, असे मानले जात असे. चाणक्य (कौटिल्य) असो वा कन्फ्युशियस, मॅकीवेली असो वा लेनिन, अशोक असो वा औरंगजेब यांना असेच वाटत असे. त्यांचा दृष्टिकोन त्या त्या काळानुसार व्यापक असे. त्याला आजच्या अर्थाने ‘वैश्विक’ म्हणता येणार नाही, कारण तेव्हा विश्वज्ञानच तसे अपुरे होते.
परंतु आता निदान बहुतांश पृथ्वीचा, सिव्हिलायझेशनचा व प्रस्तुत समस्यांचा वेध आल्यानंतरही जगात सर्वत्र प्राबल्य व प्राधान्य आहे ते सत्ताकारणाचे म्हणजेच राजकारणाचे! अजून तरी राजकारणाला पर्यायी, र्सवकष अशी ‘पद्धती’ किंवा ‘नियंत्रणशक्ती’ निर्माण झालेली नाही.

साहजिकच पर्यावरणाच्या झपाटय़ाने होणाऱ्या ऱ्हासापासून ते आर्थिक मंदीपर्यंतचे सर्व प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या माध्यमाद्वारेच सोडवायचा प्रयत्न सुरू आहे. परंतु व्यक्तिगत जीवनातील प्रश्न, श्रद्धा, नातेसंबंध, जीवनशैली, नैतिकता हे मुद्देही ‘राजकीय’ झाले आहेत.
विवाह आणि घटस्फोट (गे मॅरेज वा लेस्बियन रिलेशनशिप्स), धर्म आणि श्रद्धा, विज्ञान आणि संस्कृती, कायदा व न्याय असे सर्व काही राजकारणाच्याच व्यापक छत्राखाली येतात. मग ते राजकारण लोकशाही पद्धतीने सिद्ध झालेले असो वा सौदी वा तालिबानी वा कम्युनिस्ट पद्धतीचे. म्हणजेच आपले जीवन (आपल्या इच्छेव्यतिरिक्त) प्रस्थापित राजकारणाच्या कक्षेतच येत राहते. व्यक्तिगत जीवनात या ‘राजकीय हस्तक्षेपा’चा अडथळा होतो, कधी तो अडथळा राजकीय मार्गानेच दूरही होतो. पण गंमत म्हणजे राजकारणाची ‘एनओसी’ मिळाल्याशिवाय प्रश्न सुटायला मदत होत नाही.
अनेक विचारवंत मंडळी ज्याचा ‘सिस्टीम’ म्हणून उल्लेख करतात, ती ‘सिस्टीम’ म्हणजे त्या अमूर्त भासणाऱ्या राजकारणाची चौकट. माणसाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक/सांस्कृतिक समस्या जितक्या गुंतागुंतीच्या होत चालल्या आहेत, तितक्या प्रमाणात राजकारण नावाची ‘सिस्टीम’ त्या प्रश्नांना वा संभाव्य अरिष्टांना आवाक्यात घेऊ शकत नाहीत, असे जाणवू लागल्यामुळे एकूणच वीण उसवते आहे की काय, असे लोकांना वाटू लागले आहे आणि दुसरा कोणताच ‘आधार’ नसल्याने अनामिक भीती व अस्वस्थतेचे प्रमाण जगभर वाढते आहे.
परंतु यातून दोन प्रश्न उपस्थित होतात. पहिला म्हणजे अशा प्रकारची अनामिक भीती वा अस्वस्थता माणसाला कधीपासून वाटू लागली? आणि दुसरा प्रश्न- राजकारणाने/ सत्ताकारणाने एकूण सामाजिक- आर्थिक- सांस्कृतिक जीवनावर कब्जा कधी प्रस्थापित केला? हे दोन्ही प्रश्न अर्थातच केवळ राजकारणाशी निगडित नाहीत, तर थेट व्यक्तिगत जीवनमरणाशी निगडित आहेत.
उदाहरणार्थ, स्वेच्छामरण या संकल्पनेला कायद्याचा विरोध आहे. स्वेच्छामरणासंबंधी विधेयके जगभर चर्चेला आली आहेत आणि अगदी मोजके अपवाद वगळता (तेही अनेक पूर्वअटी घालून) त्याला सर्वत्र ‘राजकीय विरोध’ झाला आहे. स्वेच्छामरण आणि आत्महत्या या दोन्हीत फरक आहे. आत्महत्येला (म्हणजे अर्थातच आत्महत्येच्या प्रयत्नाला) गुन्हाच मानले जाते. स्वेच्छामरण आणि प्रायोपवेशन (म्हणजे आपणहून अन्न-पाणी पूर्ण सोडून देऊन मरणाला कवटाळणे) यातही फरक आहे. विनोबा भावे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रायोपवेशन केले होते. (त्याबद्दल काही अतिउत्साही मंडळींनी कायदेशीर आक्षेपही घेतले होते.) म्हणजेच जन्म आपल्या पूर्वसंमतीने झाला नसला तरी मरण आपल्या इच्छेनुसार यायला कायद्याची- म्हणजे संसदेची, कारण तेच कायदेमंडळ आहे- परवानगी नाही. पुन्हा आड आले ते राजकारणच.
अलीकडेच गर्भपाताविषयी जी प्रचंड चर्चा झाली (आणि अमेरिकेतही ती अहमहमिकेने चालू आहे.) त्यात ‘जन्म’ हाच मुद्दा राजकीय बनला आहे. गर्भपात ही ‘हत्या’ केव्हा म्हणायची? गर्भ चौथ्या महिन्यात असताना की त्याही अगोदर? नक्की मूल म्हणजे नवीन ‘जीव’ कधी जन्माला आला हे कुणी ठरवायचे? आणि कशाच्या आधारावर? गर्भपाताचा ‘हक्क’ आईचा की डॉक्टरांचा की संसदेचा की चर्चचा की मुल्ला-मौलवींचा की सासूचा की नवऱ्याचा? याचेही निर्णायक अधिकार राजकीय सत्तेकडेच आहेत.
काही वर्षांपूर्वी एका व्यक्तीने वृत्तपत्रातून असे जाहीर केले होते की, ती व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाला सवाल विचारणार आहे : मी जन्माला ज्या कुटुंबात आलो त्यानुसार माझी जात, धर्म इतकेच नव्हे तर नागरिकत्वही ठरविण्याचा अधिकार शासनाला कुणी दिला? माझी जन्मपूर्व संमती यापैकी कशालाच नव्हती.
मी सुजाण झाल्यानंतर धर्म बदलू शकतो. देश सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्वही घेऊ शकतो. मग मी माझा स्वत:चा, स्वेच्छेने देश-धर्म बदलू शकतो, तर तोपर्यंत माझी ओळख फक्त ‘माणूस’ इतकीच का असू नये? एक वेळ धर्म बदलणे तुलनेने सोपे आहे, पण देश बदलताना दुसऱ्या देशाने नागरिकत्व दिले तरच ते बदलता येणार. ते नाही मिळाले तर जन्माला आलो तोच देश! आपल्या स्वातंत्र्याचा तो अधिक्षेप आहे, असे त्याचे मत होते.
संकल्पनेच्या पातळीवर विनोबा भावे, जे. कृष्णमूर्तींपासून बट्र्राड रसेल यांच्यापर्यंत सर्वानी स्वत:ला ‘जागतिक नागरिक’ म्हणवून घेतले असले, तरी तसे नागरिकत्व आज जगात उपलब्ध नाही. जगातील सर्व म्हणजे १९६ देश अशा ‘वर्ल्ड सिटिझनशिप’ संकल्पनेला मान्यता देत नाहीत, तोपर्यंत ते सिद्ध होणार नाही. आताची जगाची स्थिती पाहता ते या शतकात संभवत नाही. काही वैज्ञानिक व विचारवंत तर मानतात की या शतकाच्या अखेरीपर्यंत जगाचे अस्तित्व टिकले तरी खूप झाले. जागतिक नागरिकत्व दूरच राहो. कारण काही सुरक्षातज्ज्ञ म्हणतात की दहशतवाद्यांच्या हातात अण्वस्त्रे वा रासायनिक वा जैव अस्त्रे पडली तर या जगाचा विध्वंस होईल. मार्टिन रीज्सारखे वैज्ञानिक-तत्त्वज्ञ मानतात की जग बचावलेच तर ‘अपघातानेच’ बचावेल. जेम्स लव्हलॉक यांच्या मते ‘ग्लोबल वॉर्मिग’ आणि ‘क्लायमेट चेंज’च्या तडाख्यात जग सापडले, तर महाप्रलयात सापडेल. जेम्स लव्हलॉक हा इशारा गेली सुमारे ५० वर्षे देत आले आहेत.
यावरून हे स्पष्ट होईल की, व्यक्तीला आणि जगाला सतत कसली ना कसली तरी व्यापक, अनामिक भीती भेडसावते आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याच्याजवळ नाही. ‘टेक्नॉलॉजी (अ‍ॅन्ड आर्ट) आर लिबरेटिंग फोर्सेस्’ आणि ‘पॉलिटिक्स इज अ‍ॅन ऑप्रेसिव्ह फोर्स!’ अशा व्याख्या जन्माला आल्या.
परंतु मार्शल मॅक्लुहान यांच्यासारखे विचारवंत म्हणू लागले होते की, मीडिया-टेक्नॉलॉजी (माध्यम तंत्रज्ञान) आल्यापासून माणूस अधिकाधिक बंधनात जाऊ लागला. राजकारण्यांनी तंत्रज्ञानावरच कब्जा करून ते सत्ताकारणासाठी वापरायला सुरुवात केली. नोकरशाही, न्यायव्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि मीडिया हे सर्व ‘सत्तेचे घटक’ आहेत आणि त्यांनी माणसाचे सहज-स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे, पण मॅक्लुहानचे हे विवेचन सत्तरीच्या दशकातले होते.
आज सायबर-स्वार झालेले नव-तंत्रज्ञानवादी म्हणतात की टेक्नॉलॉजीच्या माध्यमातूनच स्वातंत्र्य विस्तारत जाणार आहे. हुकुमशाह्या विस्कटल्या जाणार आहेत, दहशतवादाशी सामना करणे शक्य होणार आहे आणि तर्कशून्य नीतिव्यवस्था, कालबाह्य धर्मव्यवस्था आणि जाचक राजसत्ता खिळखिळी होत जाणार आहे.
सुरुवातीला हे जुने जग कोसळताना अस्वस्थ वाटेल, पुढे काय होणार याबद्दलची भीती वाटेल, न सुटणाऱ्या शंका मनात काहूर करू लागतील, पण प्रत्यक्षात माणसाच्या ‘स्वतंत्र इच्छाशक्ती’चा प्रवास आताच तर खरा सुरू झाला आहे. अर्थातच कोणतीही एकटी व्यक्ती स्वतंत्र होत नाही. नाहीतर ते स्वातंत्र्य आजही हिमालयात जाऊन वा घनदाट जंगलात जाऊन निर्मनुष्य वातावरणात कुणालाही मिळू शकतेच, पण त्याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत. ‘To be in Wilderness is not Freedom’ भणंगपणाला स्वातंत्र्याचे परिमाण असते, पण स्वतंत्र असणे म्हणजे भणंगपणा नव्हे. हे जग धिक्कारून वा नाकारून ते स्वातंत्र्य प्राप्त होत नाही. ते जगात राहूनच मिळवायचे असते. टेक्नॉलॉजी आणि पॉलिटिक्स, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान व राजकारण/सत्ताकारण यांच्यातील संबंध व तोल बदलूनच ती ‘फ्री विल’ साध्य करता येईल.

कुमार केतकर

शनिवार, १० ऑक्टोबर २००९

‘तर्कशून्य’ भासे मजला..



एखादी व्यक्ती एकदम खुषीत दिसली, की असं विचारायची पद्धत आहे, ‘काय, एकदम काय झाले. अगदी मजेत?’ किंवा कुणी घुश्शात वा ‘मूड ऑफ’ स्थितीत दिसले, की पहिला प्रश्न मनात येतो, ‘आज, काहीतरी बिनसलेलं दिसतंय!’ प्रत्येक गोष्टीला ‘कारण’ असलेच पाहिजे, कोणता तरी ‘कार्य-कारण भाव’ असलेला घटनाक्रम असलाच पाहिजे, असे आता आपण सर्वजण गृहीत धरतो.
त्यामुळे आपण तर्कशास्त्राने, कारण-मीमांसेने आणि त्या अनुषंगाने झालेल्या घटनाक्रमाच्या संगतीने बांधलेले आहोत. एखाद्या व्यक्तीने खून ‘का’ केला असावा, एखाद्या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय ‘का’ घेतला असेल, कुणीतरी आत्महत्या ‘का’ केली असेल येथपासून ते अमूक एखाद्या राजकीय पक्षाचा पराभव ‘का’ झाला असेल, एखादा संप वा लॉकआऊट, एखादे आंदोलन वा एखादी दंगल ‘का’ झाली असेल अशा प्रश्नांबद्दल सर्वजण सातत्याने विचार करीत असतात. ही कारणमीमांसा करण्याची विचारपद्धती आता इतकी रुजली आहे की एखाद्या कादंबरीतील वा नाटकातील पात्र एका विशिष्ट पद्धतीने का वागले याबद्दलही लेखक-दिग्दर्शक आणि समीक्षक-प्रेक्षक यांचे तीव्र मतभेद असतात. वास्तवात असलेल्या लोकांनाच नव्हे तर कल्पनेने निर्माण केलेल्या पात्रांनाही तर्कशास्त्राच्या बेडय़ा घातलेल्या असाव्यात असे ‘सिव्हिलाईज्ड’ जगात गृहित धरले गेले आहे. (‘उंबरठा’ चित्रपटात शेवटी स्मिता पाटील घर सोडून जाते. विजय तेंडुलकरांच्या मूळ संहितेत तसे नव्हते. दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी तो बदल सुचवून, चर्चा व वाद करून, तसा शेवट केला. नंतर तेंडुलकरांनाही तो आवडला.)
धूर दिसला तर आग, विस्तव वा जाळ असायलाच हवा- या साध्या सूत्रावर ‘कारण-मीमांसा-शास्त्र’ उभे आहे. गुन्हा-अन्वेषण खात्याचे संशोधन तर मुख्यत: याच निकषांवर होत असते. परंतु कित्येक वेळेला (खरे म्हणजे बहुतेक वेळेस) अनेक गोष्टींचे कारण सापडतच नाही, मीमांसा दूरच राहो. हा प्रश्न विशेषकरून जटील होतो तो माणसाच्या वागण्यालाही ‘शुद्ध’ कार्यकारणभाव असला पाहिजे असे आपण मानल्यामुळे.
तो कार्यकारणभाव सापडत नाही, तर्काच्या कात्रीत एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, एखादी घटना, एखादा प्रसंग पकडता येत नाही, एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येत नाही वा कोणताही आगापिछा- वा घटनाक्रम सांगता येत नाही, तेव्हा मती कुंठीत झालेले आपण सर्वजण, आश्चर्य व्यक्त करून म्हणतो, ‘काही कळत नाही हेच खरं, अगम्य आहे त्याचं/तिचं वागणं, स्वभावाला औषध नाही, हे सारं आपल्या बुद्धिपलिकडले आहे. वा अर्थशून्य आहे सगळं!’
म्हणजेच जे आपल्या तर्कसंगतीत बसत नाही ते अगम्य वा अर्थशून्य आहे असा निष्कर्ष काढला जातो. गंमत म्हणजे अक्षरश: दररोज आपण इतक्या प्रसंगांमधून जातो आणि बहुतेक वेळा तर नेहमी भेटणाऱ्या माणसांनाच भेटतो. (नवरा-बायको, आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिण, ऑफिसातील रोज भेटणारे सहकारी वगैरे) आणि तरीही त्या परिचित माणसांच्या वागण्याची ‘शुद्ध’ तर्कसंगती आपल्याला लागत नाही.
वैज्ञानिक विचारपद्धती प्रामुख्याने तर्कशास्त्रावर, कारणमीमांसेवर, सुसंगत घटनाक्रमावर आधारलेली आहे. गणित तर तर्कशास्त्रावरच आधारलेले आहे आणि अमूर्त गणिती संकल्पना या तितक्याच ‘अ‍ॅब्स्ट्रॅक्ट लॉजिक’वर अवलंबून असतात, असे सर्व गणिती सांगतात. प्रयोग करणे, त्याची सिद्धता करणे, निष्कर्ष काढणे, तो पुन्हा तपासून पाहणे इत्यादी ‘शास्त्रशुद्ध’ गोष्टी ‘कार्यकारणभाव-शास्त्रा’वरच आधारलेल्या आहेत.
जर मनाचे व्यवहार जाणण्याचे शास्त्र, म्हणजे ‘मानसशास्त्र’, असेल तर तेही अशाच निकषांवर बेतलेले असायला हवे. मग माणसांचे स्वभाव अगम्य, अर्थशून्य, गूढ, बुद्धिपलिकडचे का वाटतात?
या प्रश्नाची दोनच उत्तरे संभवतात. एक : मानसशास्त्र हे शास्त्रच नाही आणि दोन : सर्व घटनांना, व्यक्तींना, व्यवहारांना तर्कसंगतीच्या कठोर निकषात बसविणे हे मुळातच चूक आहे! त्याच्या पुढे जाऊन कुणी म्हणेल की, ज्ञान, आकलन, प्रश्नाची उकल हे सर्व तर्कशास्त्राने व ‘कार्यकारणभाव’ संगतीनेहोते, ही मांडणीच सदोष आहे.
एकाच गोष्टीचे किती परस्परविरुद्ध आणि तरीही तर्कशुद्ध विवेचन करता येते, हे आपण मागील लेखात ‘राशोमान’ चित्रपटाच्या उदाहरणाने पाहिले होते. फ्योदोर दोस्तवस्कीच्या ‘क्राइम अ‍ॅण्ड पनिशमेंट’ या कादंबरीत तर्कशास्त्राच्या मर्यादाच वेशीवर टांगल्या आहेत. वाचकाला गुन्हेगाराबद्दल सहानुभूती वाटू लागते आणि न्यायसंस्थेबद्दल नफरत!
त्यामुळे असा विचार पुढे आला की, पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र या शाखांना तर्कसंगती व कार्यकारणभाव लागू पडतो. पण समाजशास्त्र वा मानसशास्त्र या ज्ञानशाखांना नाही. अलिकडच्या काळात तर एकूण विज्ञानातही तर्कशास्त्राच्या अधिष्ठानाला आव्हान दिले जाऊ लागले आहे. ‘बिग बँग’ ऊर्फ ‘महास्फोट’ का झाला? त्या लहान बिंदूएवढय़ा अणु-रेणूमध्ये ती स्फोटक ऊर्जा का व कशी निर्माण झाली? (त्यामागची प्रेरणा काय?) जीवसृष्टी का व कशी जन्माला आली, या मूलभूत प्रश्नांकडे वळल्यावर कारणमीमांसेच्या आधारेच ‘तर्कशास्त्र’ तोकडे पडू लागल्याचे दाखवून दिले जाऊ लागले. ‘कॉन्शियसनेस स्टडीज्’मध्ये तर तर्कशास्त्र फारच अपुरे पडते, असे आता मानले जाऊ लागले आहे. त्याचप्रमाणे सौंदर्यशास्त्रात. (एखादी गोष्ट सुंदर आहे, एखादे चित्र अप्रतिम आहे, एखादे चित्र भिकार आहे हे तर्काने सिद्ध करता येत नाही. एखाद्याला विशिष्ट चित्र, शैली, गायक वा गायनशैली आवडेल तर दुसऱ्याला अजिबात आवडणार नाही.) नीतीशास्त्रातही तर्कशास्त्र उपयोगी पडत नाही. एकेकाळी घटस्फोट ही बाब एक प्रकारे ‘अनैतिक’ मानली जात असे. आता न्यायालयांनी आणि कौटुंबिक समुपदेशकांनी (फॅमिली कौन्सेलर्स) असे म्हणायला सुरुवात केली आहे की, इच्छेविरुद्ध आणि प्रेम नसताना, केवळ सामाजिक संकेत वा नियम म्हणून पती-पत्नींनी एकत्र राहणे हेही ‘अनैतिक’च आहे. म्हणून घटस्फोट हा नैतिक आहे!
हिंसा अनैतिक आहे; पण शत्रूचे निर्दालन करणे मात्र नैतिक आहे! साक्षात भगवान कृष्णच अर्जुनाला नातेवाईक, गुरू, ज्येष्ठ-वरिष्ठ या गोष्टींकडे न पाहता त्यांच्यावर शरसंधान करण्याचे आदेश देतात. म्हणजेच मूळच्या अर्जुनाच्या नैतिक भूमिकेपेक्षा श्रीकृष्णाची ‘अनैतिक’ शिकवण ही नैतिक ठरते. म्हणजेच युद्धात वा राजकारणात आणि सौंदर्यशास्त्रात व नीतीशास्त्रात त्याचप्रमाणे अर्थातच मानसशास्त्रात ‘तर्क’ हे सत्याचे, योग्य-अयोग्यतेचे आकलनाचे साधन ठरत नाही.
परंतु ही सर्व तत्त्वचर्चा बाजूला ठेवू या.
प्रत्येकाने स्वत:च्या मनाशी, रोज रात्री झोपण्यापूर्वी विचार करावा आणि दिवसभरात आपण केलेली कामे, विचार, व्यवहार हे किती तर्कशुद्ध होते म्हणजे ‘रॅशनल’ होते, हे स्वत:लाच सिद्ध करून दाखवावे! बहुतेकांच्या हे लक्षात येईल की, तर्कापलिकडे (रॅशनॅलिटीपलिकडे) काहीतरी ‘शक्ती’ आहे की, जी आपल्याकडून अनेक ‘अतक्र्य’ किंवा तर्काने ‘अशुद्ध’ अशा गोष्टी करून घेत असते. राजकारणातील उदाहरण द्यायचे तर असे म्हणता येईल की, सगळ्या माणसांचे एकच तर्कशास्त्र असते तर इतके राजकीय पक्ष लागलेच नसते; किंवा जरी ते असते तरी सर्वानी (उर्वरित सर्वानी) एकाच पक्षाला वा व्यक्तीला निवडून दिले असते. (परंतु प्रत्येक व्यक्तीचे तर्कशास्त्र हे त्या त्या व्यक्तीच्या मूळ विधानावर वा गृहितकावर उभे राहात असल्यामुळे परस्परविरोधी सत्यही त्याच तर्कपद्धतीतून पुढे येते. त्यामुळे मूळ विधानच जर चुकीचे, अपूर्ण, अप्रमाणित वा अर्थशून्य असेल तर त्या अनुषंगाने लढविला जाणारा तर्क तसाच असणार. एकाच गृहितकावरही अनेक तर्कटे बांधता येऊ शकतात.
आजही अमेरिकेत एक संस्था आहे, जिचे नावच मुळी ‘फ्लॅट अर्थ सोसायटी’ असे आहे. या संस्थेच्या सदस्यांचे मत आहे की, पृथ्वी गोल नाही- ती सपाट आहे. शिवाय पृथ्वी सूर्याभोवती आणि स्वत:भोवतीही फिरते. ही वैज्ञानिकांनी पसरवलेली अफवा आहे! गंमत म्हणजे १५ व्या शतकापर्यंत युरोपातही बहुतेकांचे हेच मत होते. किंबहुना पृथ्वी गोल आहे, ती इतर ग्रहांप्रमाणे स्वत:भोवती व सूर्याभोवती फिरते हे गणित, दुर्बिणीद्वारे निरीक्षण आणि गतीनियमांच्या आधारे सिद्ध केल्यानंतरही चर्चच्या धर्ममरतडांना मान्य झाले नव्हते.
त्याचप्रमाणे आजही एका गटाचे म्हणणे आहे की, माणूस चंद्रावर उतरला ही एक ‘नासा’ संस्थेने ठोकलेली लोणकढी थाप आहे. अशा लोकांसमोर तर्कशास्त्र, वैज्ञानिक विचारपद्धती, प्रयोगशीलता वगैरे गोष्टी सांगणे व्यर्थ असतो. विशेष म्हणजे ही मंडळीसुद्धा त्यांचा मुद्दा ‘तर्काच्या’ आधारेच सांगत असतात. (म्हणजे त्यांचा दावा व त्यांची मांडणी तशी असते.)
तर्कशास्त्राच्या आधारे सत्य समजण्यासाठी मूळ विधान/मूळ गृहीतक ‘शुद्ध’ असायला पाहिजे. विज्ञान-विचार पद्धतीची महतीच ही आहे की तिच्याच फक्त निष्कर्षच नव्हे, तर प्रयोगसिद्धता आणि मूळ विधानही पुन्हा पुन्हा तपासले जाते. म्हणूनच काही वैज्ञानिक निष्कर्ष त्याच विज्ञान-तर्काने बादही ठरविले जाऊ शकतात. परंतु अशी विज्ञान-तर्कसंगती ही मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, कायदा, न्यायशास्त्र अशा क्षेत्रांमध्ये अजून तरी निर्विवाद ठरलेली नाही आणि नजीकच्या काळात तर्कशास्त्राने या गोष्टींचे पूर्ण आकलन होण्याची शक्यताही नाही.
आडाखे म्हणजे निष्कर्ष नव्हेत. जरी ते आडाखे ‘डिडक्टिव वा इंडक्टिव लॉजिक’च्या कक्षेत बसत असले तरीही! स्टॉक मार्केटमधील सेन्सेक्सचे चढउतार का होतात, याबाबत बरेच तार्किक संबंध जोडले जातात. परंतु चार-दोन वेळा ते आडाखे बरोबर आले तरी त्यांना ‘निष्कर्षां’चे तर्कशुद्ध स्थान देता येत नाही.
कम्युनिस्ट पक्षांमध्ये तार्किकतेचे असेच अ-तार्कीक निष्कर्ष काढण्याची प्रथा आहे. ‘ऑब्जेक्टिव्ह रिअ‍ॅलिटी’ म्हणजे ‘साक्षेपी स्थिती’ नावाची संकल्पना आहे. समाजातील राजकीय-आर्थिक परिस्थितीचे ‘अचूक’ निदान करून त्यानुसार क्रांतीची वेळ-तारीख नेमकेपणाने ठरविता येते, असा ‘शास्त्रोक्त’ भ्रम अनेक वेळा कम्युनिस्टांना होत असतो. या ‘ऑब्जेक्टिव्ह रिअ‍ॅलिटी’चे वर्णन व निदान केवळ तर्कशास्त्राच्या आधारेच नव्हे तर ‘डायालेक्टिक’ तर्कपद्धतीनुसार करता येते असे त्यांना वाटते. या शास्त्रानुसार भारतात आजपर्यंत किमान ५० ‘क्रांतीसमय’ येऊन गेले असावेत. पण भारतात क्रांती मात्र झालेली नाही. सध्या देशात सुमारे २०० ठिकाणी माओवादी क्रांतीकारक कार्यरत आणि शस्त्रसज्ज आहेत. त्यांच्याही दृष्टिकोनातून अनेक ऑब्जेक्टिव्ह ‘क्रांतीक्षण’ येऊन गेले आहेत. पण क्रांती अजून दूरच आहे!
शिवाय परिस्थितीचे वस्तुनिष्ठ व अचूक मापन जर त्या ‘ऑब्जेक्टिव्ह रिअ‍ॅलिटी’च्या संकल्पनेत अभिप्रेत असेल तर इतके कम्युनिस्ट पक्ष कशाला? ‘ऑब्जेक्टिव्ह रिअ‍ॅलिटी’ तर एकच असायला हवी! म्हणजेच त्या परिस्थितीचे मापन हे ‘सब्जेक्टिव्ह’ म्हणजे व्यक्तीसापेक्ष केले जाते आणि प्रत्येक कम्युनिस्ट गटाचे / पक्षाचे / व्यक्तीचे ‘सब्जेक्टिव्ह’ मापन वेगळे झाल्याने ‘ऑब्जेक्टिव्ह रिअ‍ॅलिटी’चे निदान चुकते! परंतु कम्युनिस्ट विचाराचे लोक त्यांच्या तर्कपद्धतीला ‘डायलेक्टिकल’ म्हणजे द्वंद्वात्मक किंवा विरोध-विकासात्मक परिमाणही जोडतात आणि कोणत्याही परिस्थितीत, कॉम्रेड लेनिनच्या सूत्रानुसार हस्तक्षेप करून ती स्थिती बदलतात वा बदलू पाहतात. खरे म्हणजे त्यांच्या सिद्धांतानुसार जगात कुठेही क्रांती झालेली नाही! परवा (१ ऑक्टोबर रोजी) चिनी क्रांतीला ६० वर्षे पूर्ण झाली, परंतु तीसुद्धा लेनिनप्रणीत सिद्धांतानुसार झाली नाही, असे इतर बऱ्याच कम्युनिस्ट विचारवंतांना व पक्षांना वाटते.
मुद्दा हा, की ज्यांना ‘ह्युमन सायन्सेस्’ म्हणून ओळखले जाते त्या समाजशास्त्र-अर्थशास्त्र- मानसशास्त्र इ. शाखांमध्ये तर्कशास्त्र फारसे उपयोगी पडत नाही; परंतु विचारपद्धतीला ‘शुद्ध’ ठेवण्यासाठी अजून तरी तर्कशास्त्राइतकी दुसरी अधिक पद्धत उपलब्ध नाही.
न्यायालयात दोन वकील एकमेकांविरुद्ध अटीतटीने बाजू मांडतात, आरोपी हा गुन्हेगार आहे वा पूर्ण निर्दोष आहे, हे अहमहमिकेने सांगतात तेव्हा ते दोघेही शास्त्रोक्त निकषांनुसार पुरावे व तर्क यांचाच आधार घेतात. न्यायाधीशही तर्कशास्त्राच्या आधारेच निर्णय देतात, असे असूनही खालच्या न्यायालयातील निर्णयाच्या विरोधात वरचे न्यायालय निकाल देते आणि विशेष म्हणजे त्याला ‘न्याय’ म्हणते. एखादी व्यक्ती गुन्हेगार म्हणून सिद्ध झाल्यानंतर वरच्या कोर्टात निर्दोष सिद्ध व्हावी याचा अर्थच तर्कशास्त्र अपुरे आहे किंवा न्यायाधीश पक्षपाती आहेत, असे म्हणावे लागेल.
तर्कशास्त्र एक विचारपद्धती म्हणून मानवी व्यवहारात रुजू होईपर्यंत आधुनिक अर्थाने ‘सिव्हिलायझेशन’ला सुरुवात झाली नाही. तर्कशास्त्राची, घटनाक्रमांची संगती लावण्याची आणि कार्यकारणभाव शोधण्याची गरज इतर कोणत्याही प्राणिमात्राला भासत नाही. (परंतु त्यांच्या शिकार करण्याच्या पद्धतीत, जगण्याच्या खटपटीत आणि अन्न-पाणी शोधण्याच्या प्रयत्नात एक ‘जेनेटिक’ आणि ‘इन्स्टिक्टिव’ तर्कशास्त्र असते, हा भाग वेगळा.) माणसाने त्या तर्कशास्त्राचे एक भव्य असे विचारांचे दालनच निर्माण केले आहे. हा तार्किकतेचा प्रवास सुमारे पाच हजार (वा कमी) वर्षांचा असावा, असे मानले जाते. (बुद्धिबळ हा खेळ तर पूर्णत: तर्कशास्त्र आणि मानसशास्त्रावर आधारलेला आहे. त्याचा प्रसार मुख्यत: पाचशे वर्षांत झाला आहे.)
भाषाशास्त्रज्ञ असेही मानतात, की तर्कशास्त्र आणि भाषा व नंतर लिपी यांचा घनिष्ठ संबंध आहे. भाषेत व विचारात एक तर्कसंगती असते. ती नसेल तर माणसाचे अस्तित्व, व्यवहार आणि विकास असे सर्वच धोक्यात येईल. परंतु केवळ तर्क आणि कार्य-कारणशास्त्र यावरच जर ‘सिव्हिलायझेशन’ अवलंबून राहिले तर त्या आधारेच ती मानवी संस्कृती नष्टही होईल.
जॉन रॅल्स्टन सॉल या ब्रिटिश तत्त्वज्ञाच्या म्हणण्यानुसार ‘सिव्हिलायझेशन’च्या विकासातच त्या सदोष तर्कपद्धतीमुळे विनाशाची मुळे आहेत. ‘ग्लोबल वॉर्मिग’ असो वा अण्वस्त्रनिर्मिती, शस्त्रास्त्रस्पर्धा असो वा युद्ध- हे सर्व त्याच ‘रिझन’ ऊर्फ कार्यकारणपद्धतीतून जन्मले आहे. त्याच्याच शब्दांत सांगायचे तर-

``Reason is a narrow system
swollen into ideology.
with time and power it has
become a dogma, devoid of
direction and disguised as
disinterested inquiry.
Like most religions, reason
presents itself as the solution
to the problems it has created’’

कुमार केतकर
शनिवार, ३ ऑक्टोबर २००९

ही प्रेरणा येते कुठून?



सुमारे ३० वर्षांपूर्वी, बीबीसी टेलिव्हिजन चॅनलवर एक वैज्ञानिक-वैद्यकीय मुलाखत मालिका झाली होती. त्या मालिकेचे नाव होते- ‘द बॉडी इन क्वेश्चन.’ म्हणजे आपले शरीर आणि त्यातील सुप्त-गुप्त हालचाली. त्या मुलाखती घेतल्या होत्या, डॉ. जोनाथन मिलर या ब्रिटिश डॉक्टरने. हा ब्रिटिश डॉक्टर निष्णात वैद्य आणि शल्यविशारद होताच, पण वैज्ञानिकही होता.
शरीरशास्त्राचा अभ्यास पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि अर्थातच वनस्पती आणि जीवशास्त्र यातील संशोधनाशिवाय पूर्ण होणे शक्य नाही, असे त्यांना वाटत होते. त्यांनी ज्यांच्या मुलाखती घेतल्या, ते सर्वजण जगद्विख्यात वैज्ञानिक/शरीरशास्त्रज्ञ होते.
त्या मुलाखतीपूर्वी जे प्रास्ताविक निवेदन त्यांनी केले होते, त्यात एक वेगळाच प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. गर्भधारणेनंतर त्या जीवाला गर्भातून बाहेर यायची आणि जगण्याची प्रेरणा कुठून येते. जर त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी असे दिले असते की ती सर्व देवाची किमया आहे, तोच गर्भधारणा घडवून आणतो, गर्भातून बाहेर यायची प्रेरणा देतो आणि जगण्याचीही; तर या उत्तरानंतर सर्व वैज्ञानिक चौकशा व प्रयोग पूर्णपणे थांबले असते. कारण अवघ्या विश्वाचा प्रेरणास्रोत तो परमेश्वरच आहे असे म्हटल्यानंतर त्या रहस्याचा अधिक खोल शोध घेण्याची काय गरज? पण गंमत म्हणजे पूर्वीचे अनेक वैज्ञानिक (आयझ्ॉक न्यूटनसकट) देवावर विश्वास ठेवत असत (आजही तसे अनेक शास्त्रज्ञ आहेत) आणि तरीही त्या परमेश्वराने निर्माण केलेल्या विश्वाचा आणि जीवसृष्टीचा शोध, त्या देवाची परवानगी न घेता ते करीत असत. देव, धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि विज्ञान या गोष्टी एकमेकांपासून दूर व अलिप्त ठेवणे त्यांना शक्य झाले, कारण अचाट कुतूहल, अफाट जिज्ञासा आणि वैज्ञानिक विचारपद्धतीवर असलेला त्यांचा ठाम विश्वास. (याच ‘वैज्ञानिक श्रद्धे’मुळे भारतीय वैज्ञानिकांना चंद्रावर असलेल्या पाण्याच्या शक्यतेचा अपूर्व शोध लागला आहे. बरोबर चाळीस वर्षांपूर्वी माणूस प्रथम चंद्रावर उतरला, तेव्हाही नील आर्मस्ट्राँगला याच पाण्याच्या शोधाची तहान लागली होती, असो.)
तर आपण चर्चा करीत होतो ती डॉ. जोनाथन मिलर यांच्या वैज्ञानिक मुलाखत मालिकेची. त्या चर्चेमधून तेव्हा एक असा प्रश्न उपस्थित झाला होता, की इतर कोणत्याही प्राण्याला माणसाप्रमाणे विश्वाविषयीचे, जीवसृष्टीबद्दलचे कुतूहल का वाटले नाही. जगणे, खाणे-पिणे आणि पुनरुत्पादन करणे या प्राथमिक क्रिया करताना जे कुतूहल, साहस आणि ‘प्रयोग’ही त्या प्राण्यांना करावे लागतात, त्या पलीकडे बाकी प्राणीमात्राची मजल गेली नाही. प्राण सर्वच प्राण्यांना प्रिय आहे, पण माणूस मात्र अक्षरश: जिवावर उदार होऊन या सृष्टीचे रहस्य शोधायला त्या जगण्या-पुनरुत्पादनाच्या सापळ्यातून बाहेर पडला. म्हणजेच प्राणापेक्षाही सत्यशोध त्यांना अधिक प्रेरणादायी वाटला. पण पुन्हा तो प्रश्न उरलाच! त्या प्रेरणेचा उगम कुठे आहे?
शरीरावर शस्त्रक्रिया करणाऱ्यांना, अगदी मेंदूवर उपचार करणाऱ्यांना किंवा इतर प्राण्यांचे शरीरविच्छेदन करताना या संशोधकांना ‘मन’ नावाचा अवयव सापडलेला नव्हता. ज्या रुग्ण व्यक्तीवर काही महिने उपचार चालू होते आणि जो आजारी माणूस त्या डॉक्टरबरोबर हसत-खेळत गप्पा मारत असे, त्याच्या आठवणी, त्याची स्वप्ने, त्याच्या आकांक्षा, त्याने केलेल्या कविता वा मनात योजलेल्या नाटक-कादंबऱ्यांचे ‘प्लॉट्स’ कथन करीत असे, कधी त्या डॉक्टरबरोबर चर्चाही करीत असे, असा तो माणूस एकदम एखाद्या पहाटे प्राण गमावतो, सचेतनचा अचेतन होतो म्हणजे नक्की काय होते याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. प्राण, कॉन्शियसनेस, जाणिवा-नेणिवा, संवेदन, चेतना, प्रेरणा हे काहीही त्या शरीरविच्छेदनात वा उपचाराच्या माध्यमातून उमजलेले नव्हते. म्हणून डॉ. जोनाथन मिलर यांनी बीबीसी चॅनलवर आणखी एक मुलाखत-मालिका घेण्याचे ठरविले.
त्याचे नाव ‘बॉडी इन क्वेश्चन’च्या चालीवरच ‘माइंड इन क्वेश्चन’ असे द्यायचा पहिला विचार होता, पण शेवटी बीबीसीच्या निर्मात्यांनी त्या मालिकेचे नाव ‘स्टेट्स ऑफ माइंड’ म्हणजे ‘मनाच्या (विविध) अवस्था’ असे ठरविले. ही मालिका सादर होऊनही आता सुमारे २८ वर्षे होत आली आहेत. (असे किती कार्यक्रम आपल्या चॅनल्सवर होतात? असो.)
त्या मुलाखती सादर झाल्या, तेव्हा ग्लोबल टीव्ही नेटवर्क नव्हते, इंटरनेट प्रचलित नव्हते, इतकेच काय फॅक्ससुद्धा नव्हता, मोबाइल फोन नव्हते, ‘इन्फॉर्मेशन हायवे’ नव्हते, त्यामुळे ‘नॉलेज एक्स्चेंज’ म्हणजे आजच्यासारखी हायटेक वैचारिक देवाणघेवाणही नव्हती. त्यावेळेस या सर्व वैज्ञानिक-संशोधक-विचारवंतांची वैचारिक देवघेव मुख्यत: आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येच होत असे. हा ‘इन्फॉर्मेशन एक्स्चेंज’चा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आज एखाद्या व्यक्तीने एखादे संशोधन केले, कल्पना मांडली, हायपोथिसिस ऊर्फ अंदाज सिद्धांत मांडला, इतकेच काय, कादंबरीचा वा नाटकाचा प्लॉटसुद्धा त्या व्यक्तीला सुचला, तर त्याचे ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट’च्या कायद्यानुसार रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते, पेटंट घेतले जाऊ शकते. ‘आयडियाज आर प्रायव्हेट प्रॉपर्टी’ म्हणजे कल्पना वा संशोधन हे स्थावर-जंगम प्रॉपर्टीप्रमाणे आहे. ही पद्धत तेव्हाही होती, पण तेव्हा संशोधनातील मुद्दे अधिक खुलेपणाने चर्चिले जात.
डॉ. जोनाथन मिलर यांनी ‘स्टेट्स ऑफ माइंड’ मालिकेत घेतलेल्या महा-दिग्गजांच्या मुलाखती म्हणजे भविष्यातील मूलभूत संशोधनाच्या रूपरेषा आहेत. आज मन, मेंदू, कॉन्शियसनेस, स्मृती, संवेदना इ. संबंधातील सुरू असलेले चिंतन व संशोधन सुमारे ३० वर्षांपूर्वीही किती प्रगत अवस्थेत होते, याचा अंदाज त्या मुलाखतींमधून येतो. (डॉ. मिलर यांच्या ‘बॉडी इन क्वेश्चन’ आणि ‘स्टेट्स ऑफ माइंड’ या दोन्ही मुलाखत-मालिका आता पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत.)
शरीरशास्त्र आणि पदार्थ विज्ञानशास्त्र (म्हणजे फिजिऑलॉजी आणि फिजिक्स) या दोन्ही ज्ञानशाखांचा विकास रेनेसाँच्या काळात, १५ व्या शतकात विशेषत: झपाटय़ाने होऊ लागला. पण ‘मानसशास्त्र’ उदयाला आले, ते १८ व्या शतकाच्या अखेरीस आणि त्याचा विकास होऊ लागला एकोणिसाव्या शतकापासून.
अगदी सुरुवातीला ‘मेन्टल फिलॉसॉफी’ म्हणून या शाखेला संबोधले जात असे. केवळ चिंतन व तत्त्वज्ञान या निकषांवर ‘मानसशास्त्रा’चा विचार केला तर ते मात्र आपल्याकडे अगदी रामायण-महाभारतात किंवा नंतर बुद्धाच्या तत्त्वज्ञानात वा ज्ञानेश्वरी-दासबोधातही आढळते. पण ‘मेन्टल फिलॉसॉफी’ किंवा ‘मनाचे तत्त्वज्ञान’ आधुनिक-वैज्ञानिक पद्धतीने संशोधन क्षेत्रात आले ते शरीरशास्त्र आणि पदार्थविज्ञानशास्त्र रुजल्यानंतर. म्हणजेच मनाचा शोध किंवा प्रेरणेचा, चैतन्याचा शोध शरीरात, भौतिक विश्वात सुरू झाला तेव्हापासून. परंतु, इतर विज्ञानशाखांमध्ये ती वस्तू किंवा ते शरीर प्रयोगशाळेत असू शकते. एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचे निदान त्याच्या शरीराचे तापमान, रक्तदाब, साखरेचे रक्तातील प्रमाण, नाडी, छातीचे ठोके इत्यादी बाबींचे मोजमाप करून ठरविता येते.
परंतु, मन ही चीज प्रयोगशाळेत आणणे कठीण होते. म्हणूनच ज्यांना मानसिक रुग्ण म्हणून ओळखले जात असे, त्यांची यथासांग पाहणी करणे म्हणजेच मनाची प्रायोगिक छाननी करणे असे मानले जाऊ लागले. परंतु, एखादी व्यक्ती मानसिक रुग्ण आहे हे कुणी ठरवायचे?
डॉ. जोनाथन मिलर यांनी त्या मुलाखतींमध्ये डॉ. थॉमस झाझ या हंगेरियन-अमेरिकन मानसशास्त्रज्ञाची घेतलेली मुलाखत म्हणजे सायकॉलॉजिस्ट्स्, सायकिअ‍ॅट्रिस्ट्स् कौन्सेलर्स, बिहेवियर कन्सल्टंट्स् यांना दिलेले आव्हान होते.
शारीरिक आजार असलेल्या व्यक्तींना ज्या प्रकारे उपचार दिले जातात, गोळ्या, इंजेक्शन्स इ. दिले जाते, त्याप्रमाणे तथाकथित मानसिक रुग्णांना उपचार देणे हे अतिशय घातक आहे, असे त्यांचे मत होते. त्यांनी म्हटले की, कुठच्या ना कुठच्या प्रकारची ‘अ‍ॅबनॉर्मेलिटी’ सर्वामध्येच असते -कमी-अधिक प्रमाणात, म्हणून प्रत्येकजण मनोरुग्ण ठरत नाही. तसे असते तर जवळ जवळ सर्वच माणसे मनोरुग्ण ठरू शकतील. (‘दासबोधा’तील मूर्खाची लक्षणे लावून मूर्खाचा शोध घ्यायचे ठरविले तर जगात एकही सुज्ञ वा शहाणा नाही असे वाटू लागते त्याचप्रमाणे! परंतु, ‘अ‍ॅबनॉर्मल सायकॉलॉजी’चा उदय आणि विकासही तशाच गृहितकावर आधारलेला आहे. विल्यम मॅक्डुगल या मानसशास्त्रज्ञाच्या या विषयावरील महाग्रंथाचा अभ्यास करणाऱ्यांनाही प्रत्येक माणूस- अर्थातच आपण स्वत: वगळून- हा अ‍ॅबनॉर्मलच वाटतो!)
थॉमस झाझ यांनी तर अशी मांडणी केली की, सायकिअ‍ॅट्रिस्ट्स् (किंवा सकायट्रिस्ट्स्!) हे उपचाराच्या नावाखाली त्या तथाकथित मनोरुग्णाच्या सर्जनशीलतेला दडपून टाकतात, त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्या व्यक्तीला उपचाराच्या वा प्रयोगांच्या निमित्ताने स्वत:च्या कह्यात घेतात, त्याला मानसिक गुलाम करतात. त्याचे अस्तित्व, त्याची अस्मिता आणि आत्मप्रतिष्ठाच नष्ट करतात.
स्वत: मानसशास्त्रज्ञ असूनही सायकिअ‍ॅट्रिस्ट्स्वर असा प्रखर हल्ला चढविल्यामुळे डॉ. झाझ यांनी शेकडो तज्ज्ञांचे शत्रुत्व ओढवून घेतले. परंतु, त्यांच्या त्या वैज्ञानिक बंडखोरीमुळे ‘क्रिएटिव्हिटी’ ऊर्फ सर्जनशीलता, ‘ओरिजिनॅलिटी’ म्हणजे उपक्रमशीलता आणि वेगळेपण म्हणजे ‘आयडेंटिटी’ या संकल्पनांवर पुन्हा संशोधन होऊ लागले. (क्रिएटिव्हिटी, ओरिजिनॅलिटी, आयडेंटिटी.) हे संशोधन तत्कालीन मानसशास्त्राच्या सीमारेषा ओलांडून पुढे गेल्यावर, पुन्हा एकदा मानसशास्त्रीय संशोधन न्यूरॉलॉजी, न्यूरोबायॉलॉजी, न्यूरोलिंग्विस्टिक्स्च्या क्षेत्रात आले. साहजिकच भाषा कशी निर्माण होते, लहान मूल बोलायला कसे शिकते, विचार कुठून येतात, गणित कसे सुचते, संगीतरचना मनात कशा तयार होतात, स्वर-सूर-ताल-लय यातील सांगीतिक सौंदर्य कसे निर्माण होते, रंगसंगती, गंधसंगती व एकूणच सौंदर्यशास्त्र मनात आकार कसे घेते, येथपासून माणसांचे स्वभाव कसे बनतात या विषयांकडे वैज्ञानिकांचे पुन्हा लक्ष वेधले आहे. त्यातूनच आधुनिक समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रही आता अभ्यासले जात आहे. ‘बिहेविअरल इकॉनॉमिक्स’ (ज्याचा संदर्भ यापूर्वीच्या लेखात सूचित केला होता) ही अर्थशास्त्रातील शाखा आता रूढ झाली आहे.
पूर्वी समाजशास्त्राचा अभ्यास करताना जात, धर्म, भाषा, प्रांत, वर्ग, वंश इत्यादींचे निकष घेऊन केला जात असे. आजही ते निकष आहेतच. परंतु, आता इंडिव्हिज्युअल ऊर्फ व्यक्ती हाही समाजशास्त्राचा घटक झाला आहे. समाज हा अनेक- असंख्य- व्यक्ती एकत्र आल्यामुळे तयार होतो की व्यक्ती हे वास्तव आहे आणि समाज ही एक अभिरूप संकल्पना आहे, हा एक वाद आहेच. ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ असा व्यक्तिवादाचा- कधी कधी व्यक्तिवादी अभिनिवेशाचा आविष्कार उग्रपणे प्रकट होतो, तर कधी कधी एखादी व्यक्ती स्वत:ला समाजात, कुटुंबात, पक्षात, संघटनेत इतक्या सहजपणे विलीन करून टाकते, विरघळवून टाकते की, तिची ओळखही पुसून जाते.
समाजातील बहुसंख्य माणसे तसे ‘ओळखहीन’ आयुष्यच जगत असतात. मुंबईच्या लोकलगाडीत गच्चपणे भरलेल्या त्या गर्दीत, माणूस जशी स्वत:ची ओळख असूनही त्या कोंबलेल्या दाटीत विलीन झालेला असतो, त्याप्रमाणे.
परंतु, तीच व्यक्ती घरी, ऑफिसात वा आपल्या वस्तीत गेली की, तिला ‘आयडेंटिटी’ म्हणजे स्वत:ची ओळख व अस्मिता प्राप्त होऊ लागते. ती अस्मिता हीच त्याच्या जीवनाचा मानसिक आधारही बनते. ती अस्मिता कधी मराठी वा तामिळ वा बंगाली म्हणून प्रकट होते, कधी हिंदू वा मुस्लिम वा ख्रिश्चन वा शीख म्हणून व्यक्त होते, तर कधी भारतीय, पाकिस्तानी, अमेरिकन, चिनी अशी अभिव्यक्त होते.
म्हणूनच काही आधुनिक मानसशास्त्रज्ञ असे मानतात की, राजकारण, युद्ध, जागतिक व्यापार-उद्योग या सर्व गोष्टी मुख्यत: ‘मानसिक’ आहेत. परंतु, तरीही मूळ प्रश्न उरतोच- ही सर्व प्रेरणा येथे कुठून?
कुमार केतकर
शनिवार, २६ सप्टेंबर २००९